स्वतःचा पेट्रोलपंप विकणारे जयसिंह मोहिते पाटील सहकारमहर्षी कारखान्यालाही दिवाळखोरीत काढतील?
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): पेट्रोलपंपात भरपूर नफा असल्यामुळे अनेक लोक हा पंप सुरू करण्यासाठी धडपडताना दिसतात. मात्र श्रीपूरमध्ये सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचा पेट्रोलपंप असताना तो चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा, मुलगी व नातू यांना चालवायला येत नसल्याने त्यांनी हा पंप विकला आहे. त्यामुळे ज्यांना आपला पेट्रोलपंप चालवता येत नाही ते जयसिंह मोहिते पाटील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्यालाही दिवाळखोरीत काढतील काय? असा प्रश्न सभासद शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यात सहकारी संस्थांचे जाळे विणून सहकारक्रांती घडवली. परंतु त्यांच्या वारसांना सहकाराचा हा डोलारा टिकवता आला नाही. मोहिते पाटलांनी संस्थांचे हित न बघता स्वहित पाहिल्याने सुमित्रा सहकारी संस्था, स्वरुपराणी सहकारी पतसंस्था, शंकरराव मोहिते सहकारी सूतगिरणी, शिवकृपा सहकारी संस्था, राजहंस सहकारी पोल्ट्री, जवाहर को ऑपरेटीव्ह सहकारी संस्था या सहा सहकारी संस्था बंद पडल्या. आता जयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना ही एकमेव संस्था राहिलीय. मोहिते पाटलांनी बंद पडलेल्या शंकरराव मोहिते सहकारी सूतगिरणीची पिसेवाडीतील ४२ एकर जमीन विकली, शिवकृपा सहकारी संस्थेची खुडूस व निमगांव येथील ३० एकर जमीन विकली. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याची ९ एकर जमीन विकली. त्याचबरोबर सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे इंदापूर तालुक्यातील चारही गट सेंटर विकायला काढले आहेत, त्यापैकी एक गट सेंटर विकला गेलाय. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी निर्माण केलेल्या सहकारक्षेत्राला त्यांच्या वारसदारांनी मोडीत काढल्याने सभासदांतून दबक्या आवाजात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पण ‘हत्तीसंगे दांडू कोण खेळणार?’ म्हणून नाईलाजास्तव त्यांनी अळीमिळी गुपचिळीची भूमिका घेतली आहे.
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याने गेल्या पंधरा वर्षातून चौदा वर्षे शेतकऱ्यांना एफआरपीच्या वर एक रूपया दिला नाही. गेल्या वर्षी पहिल्यांदाच मार्च २०२४ अखेर कारखान्याला ६ कोटीचा नफा झाला. सगळं कर्ज पूर्ण नील झालं, पण चेअरमन जयसिंह मोहिते पाटलांच्या मिस मॅनेजमेंट व अकार्यक्षमतेमुळे गेली ६४ वर्षे चालणारा व गतवर्षी नफ्यात आलेला कारखाना ३१ मार्च २०२५ अखेर २५ ते ३० कोटीच्या आसपास तोट्यात जाण्याची शक्यता सभासद शेतकऱ्यांतून वर्तवली आहे. महाराष्ट्रातील १५३ सहकारी साखर कारखान्यांपैकी सर्वात कमी दर देणारा सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना असल्यामुळे या कारखान्याला ऊस न घालता सभासद शेतकरी इतर तालुक्यातील कारखान्यांना ऊस घालत आहेत. त्यामुळे त्यांना नोटीस पाठवून कारखान्याकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली जात आहे. इतर कारखान्यात व सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊसदरामध्ये ३०० ते ५०० रूपयांचा फरक आहे. त्यामुळे शेतकरी जिकडे जादा दर तिकडेच ऊस घालणार ना! माळशिरस पूर्व भागातील १४ गावातील शेतकरी अभिजीत पाटलांच्या कारखान्याला ऊस घालत होते, पण मोहिते पाटलांनी त्यांना या शेतकऱ्यांचा ऊस घेऊ नये असे सांगितले आहे. दरम्यान कमी ऊसदरामुळे शेतकरी सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याला ऊस घालत नसल्याने यावर्षी पाच लाखही क्रशिंग होणार नाही असे सभासद शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. त्यामुळे गतवर्षी नफ्यात आलेली ही संस्था परत रिव्हर्स गिअर टाकण्याची शक्यत वर्तवली जात असून दोन-तीन वर्षात या कारखान्याची अवस्था शंकर कारखान्यासारखी होईल अशी भीती सभासद शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. वास्तविक पाहता हा कारखाना कुणाच्या मालकीचा नाही, तर तो सभासदांचा आहे. त्यामुळे कारखान्याला वाचविण्यासाठी सभासदांनी जागृत राहिले पाहिजे. पेट्रोलपंप विकणारे जयसिंह मोहिते पाटील सहकारी संस्था कसे टिकवतील? याचा विचार करून सोमेश्वर व माळेगावसारखा ऊसदर हवा असेल तर त्यासाठी चेअरमन बदलावा लागेल व तो शंकरनगर सोडून असावा असा सूर सभासद शेतकऱ्यांतून उमटत आहे.