मोक्का केस कलम ३०२ मधील आरोपी सिध्दांत ताकतोडे यांना सुप्रीम कोर्टातून जामीन
उर्वरित आरोपींना लवकरच जामीन मंजूर करण्याचा प्रयत्न करू – ॲड. संदीप मगर
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): अक्षय चंदनशिवे खूनप्रकरणी गेल्या चार-पाच वर्षांपासून मोक्काअंतर्गत कलम ३०२ प्रमाणे अटकेत असलेल्या सात आरोपींपैकी सिध्दांत नानासाहेब ताकतोडे या आरोपीस सर्वोच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला आहे. याबाबत ॲड. संदीप दत्तात्रय मगर व ॲड. आनंद दिलीप लांडगे यांनी विशेष प्रयत्न केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, १४ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ४:०० च्या सुमारास अक्षय चंदनशिवे याच्यावर खूनीहल्ला झाल्यानंतर रात्री डॉ. एम. के. इनामदार यांच्या हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. तेव्हा फिर्यादी आदर्श दीपक गायकवाड याच्या तक्रारीवरून सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या आकाश उर्फ आण्णा राजेंद्र कोळेकर, तुषार राजेंद्र काटे, सोमनाथ बिरुदेव रुपनवर, विकास महादेव शिंदे, नितीन उर्फ पप्पू बाळू पवार, सिध्दांत नानासाहेब ताकतोडे, रहिमान उर्फ सुलतान दिलावर बागवान यांच्यावर भादंवि कलम ३०२, ३२४, ३४१, ३२३, ५०४, ५०६, १४७, १४८, १४९, ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये ३ (२), ३ (२ va) गुन्हा दाखल झाला होता. हद्दपार असताना या आरोपींवर कलम ३०२ अंतर्गत विविध गुन्हे दाखल झाल्याने त्यांना मोक्का लागला होता. तेव्हापासून ते येरवडा कारागृहात आहेत. यादरम्यान त्यांनी जामिनासाठी वारंवार प्रयत्न करुनही त्यांचे जामीन फेटाळले जात होते. तेव्हा ॲड. संदीप दत्तात्रय मगर व ॲड. आनंद दिलीप लांडगे यांनी जामिनासाठी विशेष प्रयत्न करुन सातपैकी सिध्दांत नानासाहेब ताकतोडे या एका आरोपीला सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर केला आहे. तर उर्वरित आरोपींना लवकरच जामीनावर मुक्त करु असे यावेळी साप्ताहिक बंडखोरशी बोलताना ॲड. संदीप दत्तात्रय मगर यांनी म्हटले.