मोहिते पाटलांना जनतेसाठी लढणारा नव्हे, तर लोटांगण घालणारा लोकप्रतिनिधी हवा!
गावपातळीवरील संस्थांसह संसदीय राजकारणात जनतेने पाठविलेल्या लोकप्रतिनिधीने जनहिताची विकासकामे केली पाहिजेत, त्यांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. मात्र रणजितसिंह मोहिते पाटलांसारखे काही प्रस्थापित राजकारणी लोकप्रतिनिधींना आपल्या तालावर नाचवून जनहितापेक्षा स्वहिताचाच अधिक विचार करतात. म्हणून तर एससीच्या कोट्यातून आमदार झालेल्या लोकप्रतिनिधीचे सही केलेले कोरे लेटरहेड शिवरत्न बंगल्यावर ठेवून घेतले जात होते. परंतु जनहिताची जाण असलेले लढवय्ये नेतृत्व रामभाऊ सातपुते आमदार झाल्यानंतर त्यांनी आपले कोरे लेटरहेड शिवरत्न बंगल्यावर न देता जनतेच्या विविध समस्या सोडविण्याबरोबरच आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला. हीच बाब रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या डोळ्यात सलू लागल्याने ते भाजपाचे आमदार असतानाही आपणांस डोईजड होऊ लागलेल्या रामभाऊ सातपुते यांना राजकारणातून संपविण्याचे कटकारस्थान त्यांनी रचले. यावरुनच त्यांना जनहितासाठी लढणारा नव्हे, तर लोटांगण घालणारा लोकप्रतिनिधी हवा हेच दिसून येते.
भारत देश स्वतंत्र होऊन १९५० साली लोकशाहीप्रधान देश म्हणून अस्तित्वात आला. मात्र मोहिते पाटलांच्या डोक्यातून सरंजामी वृत्ती गेली नाही. म्हणूनच त्यांनी सरपंचापासून आमदारांनाही आपली कटपुतली बनविले. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेपर्यंत कुणीही सत्ता उपभोगली तरी त्यावर मोहिते पाटलांचेच कंट्रोल असावे हाच अट्टाहास त्यांना खड्ड्यात घेऊन गेला. सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांनी वेळ बघून २००९ साली पंढरपूरात मोहिते पाटलांचा सुपडा साफ केला, तेव्हापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला घरघरच लागली. आपण अस्तित्वहीन झालो असलो तरी आपल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील आमदार सांगकाम्याच असावा म्हणून मुंबईत स्थायिक असलेल्या स्व. हनुमंतराव डोळस यांना सलग दोन टर्म आमदार केले. डोळस आमदार असले तरी सहीपुरतेच धनी होते. तीच परंपरा मोहिते पाटलांना आणखी १५ वर्षे ठेवायची होती. मात्र लढवय्या आमदार रामभाऊ सातपुते यांनी त्यास छेद देत जनहिताच्या कामांना प्राधान्य देऊन विकासकामांच्या जोरावर मोहिते पाटलांच्या अस्तित्वालाच सुरुंग लावायला सुरुवात केली. एससी समाजातील आमदारांना लोकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्याची संधी मिळावी म्हणून संविधानिक तरतुदीनुसार माळशिरस विधानसभा मतदारसंघ एससीसाठी राखीव झाला. त्यापैकी दहा वर्षे माजी आमदार स्व. हनुमंतराव डोळस यांनी मोहिते पाटलांच्या तालावर नाचण्यातच घालवली. मग दहा वर्षानंतर रामभाऊ सातपुते यांना आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी मोहिते पाटलांच्या घाण्याचा बैल म्हणूनच काम करायचे का? रामभाऊ सातपुते यांनी आपल्याकडे सही करुन कोरी लेटरहेड दिली नाहीत व ते आपल्या विरोधकांच्याही गावांचा कायापालट करीत असल्यामुळेच रामभाऊ सातपुते मोहिते पाटलांना नकोसे झाले. परिणामी सत्तेचा अंकुश आपल्याकडून हिरावून घेतला जात असल्याने उत्तम जानकरांशी समझोता करुन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांना आमदार केले. मात्र यादरम्यान त्यांना पक्ष हितापेक्षा शरद पवार अधिक जवळचे वाटल्याने त्यांच्यावर पक्षीय पातळीवर कारवाई होईलच! पण यानिमित्ताने मोहिते पाटलांना जनहिताचे प्रश्न सोडविणारा नव्हे, तर आपल्यासमोर लोटांगण घालणारा आमदार हवा होता हे दिसून आले.
गौतम भंडारे, संपादक, साप्ताहिक बंडखोर, मो. 9529602295/7498827350