जयसिंह मोहिते पाटलांच्या विरोधात गौतम भंडारे यांची माळशिरस न्यायालयात ॲट्रोसिटीची तक्रार दाखल
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता करीत असताना साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतम आप्पा भंडारे यांनी सबळ पुराव्यांच्या आधारे “सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अपहार व अनियमिततेबाबत एसआयटी चौकशी करण्याची मागणी” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. याबद्दल संपादक गौतम आप्पा भंडारे यांच्याकडे तत्कालीन प्राचार्य इंद्रजीत यादव यांनी दिलेले पुरावे उपलब्ध असतानाही ते हिंदू महार या जातीचे आहेत हे माहिती असताना सुद्धा त्यांना जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्याच्या हेतूने संस्थेचे जातीयवादी अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी ठराव करुन गौतम भंडारे यांचेवर माळशिरस न्यायालयात एक कोटीचा दावा दाखल केला होता. त्यामुळे जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्यासह सूचक रावसाहेब विठोबा मगर, अनुमोदक रामचंद्र तु. सिद व कार्यालयीन अधीक्षक शब्बीर अब्बास शेख यांच्याविरुद्ध गौतम आप्पा भंडारे यांनी माळशिरस न्यायालयात अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ सुधारित कायदा २०१५ चे कलम ३(१)(p) प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा यासाठी तक्रार दाखल केली आहे.
गेल्या १३ वर्षांपासून समाजामध्ये घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवून साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतम आप्पा भंडारे हे त्यांच्या साप्ताहिकामधून समाजातील वाईट प्रवृत्तीवर आघात करीत असतात. तसेच ते त्यांचे वृत्तपत्राचे माध्यमातून अनेक घोटाळे समाजासमोर आणून जनजागृतीचे काम करीत असतात. गौतम आप्पा भंडारे हे जातीने हिंदू-महार असून तालुकाभर त्यांच्या ओळखी असल्याने तालुक्यातील सर्व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील लोकांना तसेच वाचकांना देखील गौतम भंडारे यांच्या जातीची माहिती आहे. त्याचबरोबर जयसिंह मोहिते पाटलांनाही गौतम भंडारे हे हिंदू-महार आहेत हे माहिती आहे. तरीदेखील जयसिंह मोहिते पाटलांनी गौतम भंडारे यांना जाणीवपूर्वक व खोडसाळपणाने त्रास देण्याच्या हेतूने त्यांचेवर आपल्या काही लोकांच्या संगनमताने माळशिरस न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. वास्तविक पाहता सर्व माहितीच्या आधारे साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतम आप्पा भंडारे यांनी त्यांच्या साप्ताहिक बंडखोरच्या दि.१८/०३/२०२४ ते २४/०३/२०२४ या कालावधीत प्रसिध्द झालेल्या पान नं. ३ वर “सहकारमहर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अपहार व अनियमिततेबाबत एसआयटी चौकशी करण्याची मागणी या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. ती पूर्णत: खरी व बरोबर असताना व सदर बातमी ही मिळालेल्या माहितीनुसार व उपलब्ध कागदपत्रांची खात्री करुन Pure opinion म्हणून कोणताही पूर्वग्रहदूषितपणा मनात न ठेवता लोकांच्या हितासाठी प्रसिध्द केली आहे. सदर बातमीमुळे कोणत्याही प्रकारची बदनामी झालेली नसताना वर नमुद संस्थेचे अध्यक्ष श्री. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी त्यांच्या शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टच्या कार्यकारी मंडळाच्या दि.२०/०४/२०२४ रोजीच्या सभेमध्ये ठराव क्र. ३ करुन फिर्यादीवर चुकीची व बदनामीकारक बातमी छापून प्रसिध्द केली म्हणून माळशिरस दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणेबाबत ठराव पास करुन घेतला. सदर ठरावास सूचक श्री.रावसाहेब विठोबा मगर, तर अनुमोदक श्री.रामचंद्र तु. सिद यांची नावे असून सदर ठरावाच्या अनुषंगाने संस्थेच्या वतीने कार्यालयीन अधिक्षक श्री.शब्बीर अब्बास शेख, रा.अकलूज, ता.माळशिरस, जि.सोलापूर यांनी संपादक गौतम आप्पा भंडारे यांच्याविरुध्द ते जातीने हिंदू-महार (अनूसूचित जातीतील) असल्याचे माहित असताना देखील माळशिरस येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालयात स्पे.मु.नं.१०८/२०२४ हा दावा अब्रु नुकसान भरपाईची रक्कम वसुल होऊन मिळण्यासाठी खोटा दावा दाखल केलेला आहे. मूळात सदरचा दावा हा पूर्णतः खोटा व खोडसाळपणाने केलेला असून त्यामध्ये काहीएक तथ्य नाही. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ सुधारित कायदा २०१५ चे कलम ३ (१) (p) नुसार गैरअनुसूचित जातीतील व्यक्तींनी अनुसूचित जातीतील व्यक्तींवरती खोटा व बनावट स्वरुपाचा खोडसाळपणाने केलेला दावा हा कायद्याने गुन्हा असून त्यास तुरुंगवास व दंडात्मक स्वरुपाच्या शिक्षेची तरतुद आहे. त्याप्रमाणे संपादक गौतम आप्पा भंडारे यांनी सदरच्या संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी अकलूज पोलिस ठाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचेकडे लेखी अर्ज दिला होता. तरी सुध्दा पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने गौतम भंडारे यांनी सदरची फिर्याद मे. कोर्टात दाखल केली आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.