भीमा कोरेगावचा इतिहास सांगणाऱ्यांनी जातीत घुसखोरी करणाऱ्याला प्राणपणाने विरोध करावा..!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): एससी समाजातील नेत्यांना विधानसभेत जाण्याची संधी मिळावी म्हणून संविधानिक तरतुदीनुसार माळशिरस विधानसभा मतदारसंघ एससीसाठी राखीव झाला. मात्र या मतदारसंघात धनगर समाजातील उत्तम जानकरांनी आमदारकीसाठी हिंदू खाटीक हा बोगस दाखला काढून एससी समाजात घुसखोरी केल्याने भीमा कोरेगावचा इतिहास सांगणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांनी एससीतील घुसखोरी थांबविण्यासाठी प्राणपणाने विरोध करावा असा सूर भीमसैनिकांतून निघत आहे.
एससी समाजावरील अन्याय अत्याचार असो, आरक्षणाचा मुद्दा असो, इतकेच नव्हे तर मंडल आयोगाची लढाई असो यामध्ये प्रामुख्याने आंबेडकरी चळवळीतील भीमसैनिकांनी पुढाकार घेऊन लढे उभे केले आहेत. त्यामुळे आपल्या अस्तित्वावरील कुठलेही अतिक्रमण असेल तर यामध्ये आंबेडकरी चळवळीतील लढाऊ कार्यकर्त्यांचाच पुढाकार असतो. एससी आरक्षणाचा लाभ एकूण ५९ जाती घेतात. पण याच्या संरक्षणासाठी बौध्दांसह मातंग समाजातील काही सुजाण कार्यकर्तेच रस्त्यावरची लढाई लढत असतात. तरीही माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राजकीय आरक्षणापासून या दोन्ही जातींना गेल्या पंधरा वर्षांपासून वंचित रहावे लागत आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघ एससीसाठी राखीव झाल्यानंतर उत्तम जानकरांनी २००९ व २०१९ साली हिंदू खाटीक या बोगस जातीच्या दाखल्याआधारे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. २०१४ साली सुध्दा उत्तम जानकरांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी जोरदार प्रयत्न केला होता. परंतु माजी आमदार स्व. हनुमंतराव डोळस यांनी त्यांचा जातीचा दाखला रद्द केल्याने अनंत खंडागळे यांनी त्यांच्या जागेवर निवडणूक लढवली होती. मात्र स्व. हनुमंतराव डोळस यांच्या निधनानंतर त्यांच्या बोगस दाखल्याला इतका प्रभावीपणे विरोध झाला नाही. त्यामुळे उत्तम जानकरांच्या बोगस दाखल्याची केस मुंबई हायकोर्टात सुरू असल्याने पैशाच्या व राजकीय वरदहस्ताच्या जोरावर २०१९ नंतर २०२४ सालीही उत्तम जानकर विधानसभा निवडणूक लढविण्यास यशस्वी ठरत आहेत. यादरम्यान एससी समाजातील अनेक बाजारबुणगे उत्तम जानकरांचे समर्थन करीत असले तरी ते समाजाशी खूप मोठी बेईमानी करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे राजकीय आरक्षण मिळवून दिले त्यात घुसखोरी करणाऱ्यांना मदत करुन संधीसाधू दलाल कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीशी द्रोह करीत आहेत. आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी या बाजारबुणग्यांनी स्वतःच्या गळ्यात पट्टा बांधला असला तरी आंबेडकरी चळवळीतील स्वाभिमानी भीमसैनिकांनी आपल्यातील वैयक्तिक मतभेद बाजूला सारून जातचोर उत्तम जानकरांचा पराभव करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या आरक्षणातील घुसखोरी थांबविण्यासाठी प्राणपणाने विरोध करण्याबरोबरच आपल्यातील वकिलांना एकत्रित करुन न्यायालयीन लढाईसाठी सुध्दा सज्ज झाले पाहिजे. पूर्वीची लढाई ही तलवारीची होती. आता पेन आणि ब्रेनची कायदेशीर लढाई लढून आपल्या हक्क आणि अधिकारांवर गंडांतर आणणाऱ्या जातचोर उत्तम जानकरांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी भीमसैनिकांनी सज्ज झाले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘गुलामांना गुलामीची जाणीव करून दिली तरच तो बंड करून उठेल’. आत्मपरीक्षण करा, आपण गुलामांच्या श्रेणीत तर गेलो नाही ना याचा विचार करा व थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी रस्त्यावर उतरून घुसखोरांना त्यांची जागा दाखवा असा सूर भीमसैनिकांतून निघत आहे.