अकलूजला पुन्हा येण्यासाठी पोलिस कर्मचारी सुहास क्षीरसागर यांना कुठला ‘देव’ पावला?
सोलापूरला बदली झाल्यानंतर दोन-तीन महिन्यांतच पुन्हा अकलूजला रुजू
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): शासकीय अधिकाऱ्यांची तीन ते पाच वर्षानंतर बदली होतच असते. मात्र अकलूजचे पोलिस कर्मचारी सुहास क्षीरसागर हे अकलूजमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून नोकरी करीत आहेत. मध्यंतरी टेंभुर्णीला बदली झाल्यानंतर अवघ्या दोनच वर्षांत ते पुन्हा अकलूजला आले होते. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन-तीन महिन्यांपूर्वीच सुहास क्षीरसागर यांची सोलापूरला बदली झाल्यानंतर ते पुन्हा अकलूजला आले आहेत. त्यामुळे पुन्हा पुन्हा अकलूजला येण्यासाठी सुहास क्षीरसागर यांना कोणता ‘देव’ पावत आहे? असा प्रश्न अकलूजकरांतून उपस्थित केला जात आहे.
पोलिस कर्मचारी सुहास क्षीरसागर हे गेल्या काही वर्षांपासून अकलूज व परिसरातून अवैध धंदेवाल्यांकडून वसूली करीत होते. त्याचबरोबर त्यांचीही काही धंद्यांमध्ये पार्टनरशीप असल्याचे बोलले जात आहे. मात्र यात किती तथ्य आहे हे सांगता येत नसले तरी त्यांना अकलूजचा मोह काही सुटत नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुहास क्षीरसागर यांची अकलूजहून सोलापूरला बदली केली होती. मात्र दोन ते तीन महिन्यांतच अशी कुठली जादूची छडी फिरली की सुहास क्षीरसागर पुन्हा अकलूजला रुजू झाले. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तीन ते पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एका ठिकाणी नोकरी करु नये असा शासनाचा नियम असताना सुहास क्षीरसागर गेल्या पंधरा वर्षांपासून अकलूजलाच ठाण मांडून कसे बसले आहेत? याप्रकरणी योग्य चौकशी करणे गरजेचे आहे. मात्र वरमाईच शिंदळ म्हटल्यावर वऱ्हाडाकडून काय अपेक्षा ठेवणार? असे अकलूजमधील काही कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे. दरम्यान पोलिस कर्मचारी सुहास क्षीरसागर यांची अकलूजहून बदली झाल्यानंतर ते पुन्हा लगेच माघारी कसे येतात? याप्रकरणी त्यांना कुणाचा कृपाशीर्वाद आहे? याची योग्य चौकशी करण्यासाठी अकलूजमधील काही कार्यकर्ते सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) व पोलिस प्राधिकरणाकडे तक्रार करणार असल्याचे समजते.
पोलिस कर्मचारी सुहास क्षीरसागर यांच्याबरोबर सोलापूरला कुणाकुणाची बदली झाली होती? त्यांच्याबरोबर अकलूजला पुन्हा कोण कोण आले? त्यांची अकलूजमध्ये किती वर्षे सेवा झाली होती? हे पुढच्या अंकात लवकरच…