डोळसचा संकल्प पूर्ण होणार? ‘गरुड’ भरारी घेणार? की बौध्द, मातंगांचा आमदार होणार?
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): काही महिन्यांतच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. माळशिरस विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या ठिकाणाहून जातचोर उत्तम जानकर यांनी बनावट जातीच्या दाखल्याआधारे दोनवेळा निवडणूक लढवली. तर तिसऱ्या वेळीही ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत. तसेच दोन टर्म आमदारकी उपभोगलेल्या स्व. हनुमंतराव डोळस यांच्या मृत्युनंतर त्यांचे सूपुत्र संकल्प डोळस हेही आमदारकीच्या बोहल्यावर चढले आहेत. मात्र बोगस जातीच्या दाखल्याआधारे अनुसूचित जातीमध्ये घुसखोरी करणाऱ्या जातचोर उत्तम जानकर यांच्याविरोधात बौध्द व मातंग समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे, तर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून सलग तीन टर्म चर्मकार या एकाच जातीचा आमदार झाल्याने यावेळी तरी बौध्द व मातंगांना आमदारकीची संधी मिळावी यासाठी या दोन्ही जाती आक्रमक झाल्याने विधानसभा निवडणुकीत डोळसचा संकल्प पूर्ण होणार? ‘गरुड’ भरारी घेणार? की बौध्द मातंगांचा आमदार होणार? अशी चर्चा माळशिरस तालुक्यातील राजकीय गोटात होताना दिसत आहे.
माळशिरस तालुका हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. या तालुक्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील इतर जातींपेक्षा बौध्द व त्या खालोखाल मातंग समाजाची लोकसंख्या जास्त आहे. तरीही गेल्या १५ वर्षांपासून या दोन्ही जाती आमदारकीपासून उपेक्षितच राहिल्या आहेत. माळशिरस विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त असल्याने भारतीय संविधानानुसार हा मतदारसंघ २५ वर्षांसाठी अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. मात्र त्यापैकी सलग तीन टर्म चर्मकार या एकाच जातीला माळशिरसची आमदारकी मिळाल्याने बौध्द व मातंग समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तर जातचोर उत्तम जानकर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसऱ्यांदा निवडणूक लढण्यासाठी जोरदार तयारी करीत आहेत. मोहिते पाटलांच्या मदतीने आमदार होण्यासाठीच उत्तम जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांच्याशी हातमिळवणी केली. पण ही हातमिळवणी मोहिते पाटील विरोधकांना अजिबात न पटल्याने त्यांच्या विरोधात विरोधकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. एकीकडे उत्तम जानकर आमदारकीच्या बोहल्यावर बसण्याची तयारी करीत असतानाच दुसरीकडे संकल्प डोळस त्यांचा दाखला रद्द करण्यासाठी धडपड करीत आहेत. त्यांचे हे काम अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अत्यंत मोलाचे आहे, पण जानकरांचा दाखला रद्द करून जर संकल्प डोळसची आमदार होण्यासाठी धडपड असेल तर त्यांना कुणीही स्वीकारणार नाही हे मात्र निश्चित आहे. कारण आता माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या फक्त दोनच टर्म राखीव राहिल्या आहेत. या दोन्ही टर्ममध्ये बौध्द व मातंग समाजाला संधी मिळालीच पाहिजे यासाठी या दोन्ही समाजातील नेते व कार्यकर्त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटात सक्रीय असलेले बाळासाहेब धाईंजे माळशिरसची आमदारकी लढविण्यासाठी इच्छुक आहेत. उत्तम जानकरांच्या विरोधात ते सध्या आक्रमक झाले आहेत. कारण आपल्या हक्काचा मतदारसंघ असतानाही या मतदारसंघातून बौध्द समाजाला संधी मिळाली नाही. तर भाजपाकडून अतुल सरतापे यांच्या नावाची चर्चा आहे. अतुल सरतापे हे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे अत्यंत विश्वासू आहेत. त्याचबरोबर ते भाजपातील बड्या नेत्यांच्या चांगलेच संपर्कात आहेत. तर पीआरपी महायुतीत असल्याने पीआरपीचे महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनीही आपल्या उमेदवारीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनीही अल्पावधीत जनसंपर्क वाढवून आपल्या उमेदवारीची जोरदार तयारी सुरू केली आहे. विविध आंदोलने, बैठका यामाध्यमातून किरण साठे यांनी समाजाशी चांगलीच नाळ जोडली आहे. यांच्यासह आंबेडकरी चळवळीत अनेक लढाऊ स्वाभिमानी नेतृत्वं असतानाही सत्तेपासून ते उपेक्षितच राहिले आहेत. संकल्प डोळस यांच्याबरोबरच जातचोर उत्तम जानकरांच्या मुलाचा व सूनेचा धनगर-खाटिक या बोगस जातीच्या दाखल्याच्या पडताळणीला तीव्र विरोध करणारे लालासाहेब अडगळे हे सुध्दा मोहिते पाटील यांच्या कृपाशीर्वादाने आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत. माळशिरस तालुक्यात पावसाळी छत्र्यांप्रमाणे न उगवणारे, नेहमी आंबेडकरी चळवळीत सक्रीय राहून सामाजिक कार्य करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांच्यापैकी कुणी आमदार झाला तर समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकेल. पण स्वतःच्या स्वार्थासाठी जात बदलणारे जातचोर उत्तम जानकर व मुंबईतच तळ ठोकून बसणारे संकल्प डोळस यांना जनहिताची कामे न करता स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठीच आमदार व्हायचे आहे असा सूर माळशिरस तालुक्यातील जनतेतून निघत आहे. दरम्यान कुठल्याही पक्षाने बौध्द किंवा मातंग यांना वगळून इतरांना उमेदवारी दिली तर त्यांना चांगलीच किंमत मोजावी लागेल हे मात्र निश्चित आहे असे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.