अस्तित्व गमाविण्याच्या भीतीने पुण्यातील स्वयंघोषित नेत्यांचे भारत बंदला अडथळे – सतीश गायकवाड
पुणे (बंडखोर वृत्तसेवा): सर्वोच्च न्यायालयाने एससी प्रवर्गात वर्गवारी करुन क्रिमिलेयर लागू करण्याचे मत व्यक्त केल्याच्या निषेधार्थ फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आम्ही पुण्यातील आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, संघटनांना सोबत घेऊन पुणे बंद करण्यासाठी पुण्यातील बुध्द विहारांना भेटी देऊन भारत बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन करीत असताना पुण्यातील काही स्वयंघोषित नेते आपले अस्तित्व गमाविण्याच्या भीतीने भारत बंदला अडथळे निर्माण करीत आहेत असे वक्तव्य बंडखोरशी बोलताना आंबेडकरी चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते सतीश गायकवाड यांनी केले.
यावेळी बोलताना सतीश गायकवाड म्हणाले की, भारत बंदच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे नेतृत्व निर्माण होईल असा काही संधीसाधू नेत्यांचा समज झाला आहे. मात्र आमची लढाई ही नेतृत्वासाठी नसून संविधानिक हक्क आणि अधिकारासाठी आहे. त्यामुळे ज्यांनी आंबेडकरी चळवळीचा केवळ धंदा केला त्यांनी आपल्या चाकोरीतून बाहेर येऊन संविधानिक लढ्यात सामील होता येत नसेल तरी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करु नये. आमची लढाई ही ऐतिहासिक लढाई आहे. त्यामुळे यामध्ये आमचा प्राण गेला तरी आम्ही मागे हटणार नाही. पण जे आंबेडकरी चळवळीचा धंदा करतात ते मात्र यानिमित्ताने लवकरच उघडे पडणार आहेत. पुणे शहरात आंबेडकरी चळवळीत प्रामाणिकपणे काम करणारे अनेक लढवय्ये कार्यकर्ते आहेत. यामध्ये महिलांचाही लक्षणीय सहभाग आहे. मात्र आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी संधीसाधू नेत्यांनी त्यांना वलय निर्माण करु दिले नाही. परंतु आता या लढवय्या कार्यकर्त्यांनी व महिलांनी कुणालाही न जुमानता आपल्या कर्तृत्वाला वाव द्यावा. आपले संविधानिक हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला आता लढावेच लागणार आहे. त्यासाठी कुठल्याही प्रसंगांना सामोरे जावे लागले तरी घाबरायचे नाही. समाजासाठी काहीतरी भोगावेच लागणार आहे. त्यामुळे पुण्यातील लढवय्या भीमसैनिकांनी २१ ऑगस्टच्या भारत बंदमध्ये बहुसंख्येने सामील व्हावे असे आवाहन सतीश गायकवाड यांनी केले आहे.