एमआयडीसीचे राजकीय भांडवल करणारे मोहिते पाटील पन्नास वर्षे झोपा काढत होते का?
मुंबई-बेंगलोर कॉरिडॉरमध्ये गारवाडचा समावेश झाल्यानंतरच मोहिते पाटलांना सुशिक्षित बेरोजगारांचा पुळका!
मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांशी हातमिळवणी केल्यानंतर सगळेच नकली विरोधक आहेत अशी लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. मात्र माळशिरस तालुक्यात खंडकरी शेतकऱ्यांच्या ६००० एकर जमीन व महाराष्ट्रात २७००० एकर जमीन वाटपाचा विषय, यामुळे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये खंडकरी संघटनेची नोंद झाली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते खंडकरी प्रतिनिधी म्हणून ॲड. सोमनाथ वाघमोडे यांना गौरविण्यात आले. त्याचबरोबर ॲड. सोमनाथ वाघमोडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून फलटण-पंढरपूर रेल्वे सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न, एमआयडीसीसाठी केलेले प्रयत्न, पालखी महामार्गाच्या भूसंपादनात वाढीव मोबदला मिळावा म्हणून उभारलेला लढा, शेती महामंडळाच्या मिळालेल्या जमिनींचे वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये रुपांतर करण्यासाठी केलेले प्रयत्न अशी माळशिरस तालुक्यातील असंख्य कामे मार्गी लावली. केवळ विरोधाला विरोध न करता ॲड. सोमनाथ वाघमोडे यांनी विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहिल्याने ती कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे शिवरत्नचा कधीही उंबरठा न ओलांडलेले, विकासासाठी धडपडणाऱ्या ॲड. सोमनाथ वाघमोडे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाकडे मोहिते पाटील विरोधक म्हणून या नवीन चेहऱ्याकडे लोक आशेने पहात आहेत.
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): आपल्या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी उपजीविकेसाठी पुणे, मुंबई गाठल्यानंतर माळशिरस तालुक्यात एमआयडीसी व्हावी यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून ॲड. सोमनाथआण्णा वाघमोडे प्रयत्नशील होते. कोथळे-कारूंडे याठिकाणी मंजूर झालेल्या एमआयडीसीला स्व. आमदार हनुमंतराव डोळस यांच्या माध्यमातून मोहिते पाटलांनी खो घातला, तेव्हा मुंबई-बेंगलोर कॉरिडॉरमध्ये तरी माळशिरस तालुक्यातील गारवाड या गावाचा समावेश व्हावा यासाठी ॲड. सोमनाथआण्णा वाघमोडे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत व माजी मंत्री महादेव जानकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याचे फलित म्हणून नुकतीच औद्योगिक विकास महामंडळाच्या पथकाने गारवाड येथील जमिनीची पाहणी करून कार्यवाहीला सुरुवात केली. त्यानंतर याचे श्रेय विरोधकांना जाऊ नये म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सदाशिवनगर येथील शेतीमहामंडळाच्या जमिनीवर मिनी औद्योगिक वसाहत मंजूर करावी असा उद्योगमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून सुशिक्षित बेरोजगारांसाठी आमचा कसा पाठपुरावा सुरू आहे हे लोकांना दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबई-बेंगलोर कॉरिडॉरमध्ये गारवाडचा समावेश झाल्यानंतरच मोहिते पाटलांना सुशिक्षित बेरोजगारांचा पुळका का आला? असा प्रश्न उपस्थित करून एमआयडीसीचे राजकीय भांडवल करणारे मोहिते पाटील पन्नास वर्षे झोपा काढत होते का? असा खडा सवाल सुशिक्षित बेरोजगारांतून विचारला जात आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा २००९ चा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पराभव वगळता गेल्या पन्नास वर्षांपासून माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांची अनिर्बंध सत्ता होती. २००९ साली माळशिरस विधानसभा मतदारसंघ एससीसाठी राखीव झाला तरीही तालुक्यात त्यांचीच मक्तेदारी होती. केवळ माळशिरस तालुकाच नव्हे, तर सोलापूर जिल्हा मोहिते पाटलांच्या इशाऱ्यावर नाचत होता. तेव्हा मोहिते पाटील ठरवतील तीच दिशा होती. माळशिरस तालुक्यासाठी ते काहीही करू शकले असते. मात्र सुशिक्षित बेरोजगारांची बेकार टीम राजकारणात आपल्याला वापरता यावी यासाठी मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यात एमआयडीसी होऊ दिली नाही. आपल्या तालुक्यातील मुलांना शिक्षणसंस्था, कारखाना, दूधसंघ, पतसंस्थेत तुटपुंज्या पगारावर कामाला लावले, जेणेकरून ते आपल्या इशाऱ्यावर नाचतील. पण भावी पिढीचे कल्याण होईल याचा कधीही विचार केला नाही. विजयसिंह मोहिते पाटील हे सलग ३५ वर्षे मंत्री होते. त्यांच्याकडे खूप मोठमोठी खाती होती. मंत्रालयात त्यांचा शब्द कुणीही मोडला नसता. पण त्यांच्या सुवर्णकाळात मोहिते पाटलांनी भावी पिढीचे भले केले नाही. तर आपल्या अनिर्बंध सत्तेच्या जोरावर बहुतांशी विरोधक व जनतेवर त्यांनी अन्यायच केला. मात्र भाजपाच्या विरोधात बंड करुन खासदार झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी आता सदाशिवनगर येथील शेतीमहामंडळाच्या जमिनीवर मिनी औद्योगिक वसाहत मंजूर करावी अशी मागणी केली असली तरी त्यास कारणही तसेच आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲड. सोमनाथ वाघमोडे यांना मुंबई-बेंगलोर कॉरिडॉरमध्ये माळशिरस तालुक्यातील गारवाड गावाचा समावेश करण्याचा जो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळला. गारवाडची जमीन पाहण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाचे पथक येऊन गेले आणि इकडे खासदार महोदयांनी मिनी औद्योगिक वसाहत मंजूर करावी असे पत्र दिले. जेणेकरून जे होईल ते केवळ आमच्यामुळेच असे मोहिते पाटलांना लोकांना दाखवून द्यायचे आहे. वास्तविक पाहता माळशिरस तालुक्यात एमआयडीसी आणणे हे सत्ताधारी मोहिते पाटलांचे काम होते. परंतु ते आपल्या तालुक्यात जाणीवपूर्वक एमआयडीसी आणत नसल्याने ॲड. सोमनाथ वाघमोडे यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून यासाठी संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. कुणावर कसलीही टीका न करता ॲड. सोमनाथ वाघमोडे यांनी विकासकामांवर भर दिला. त्यांच्या कष्टाचे फळ माळशिरस तालुक्यातील लोकांना लवकरच मिळेल यात वाद नाही. मात्र आपल्याला जे जमले नाही ते काम एखादा विरोधक तडीस नेतोय याचा पोटशूळ उठल्यानेच मोहिते पाटलांची एमआयडीसीबद्दलच्या पत्रकबाजीची नौटंकी आहे, बाकी काही नाही असे माळशिरस तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांतून बोलले जात आहे.