बार्टीचे महासंचालक व निबंधक यांच्याविरोधात जनावरांच्या डॉक्टराकडून व तत्कालीन महासंचालकांकडून भीमसैनिकांचा वापरच!
पुणे (बंडखोर वृत्तसेवा): बार्टी ही संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू असल्याने या संस्थेला वाचविण्यासाठी बार्टीतील कथित अनागोंदी कारभाराच्या विरोधात फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, धार्मिक कार्यकर्त्या कविताताई गाडगे, महानंदाताई डाळिंबे, शकुंतलाताई शेलार व त्यांच्याबरोबर साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतम भंडारे यांनी सलग चार ते पाच महिने आंदोलन केले. यादरम्यान पूर्वी जनावरांचे डॉक्टर व सध्याचे आयबीपीएस विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण आणि तत्कालीन महासंचालक गजभिये यांनी जातीचे भांडवल करून आम्हाला जाणीवपूर्वक बार्टीतील महासंचालक व निबंधक यांचेकडून टार्गेट केले जात असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी निबंधक यांच्याविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या पत्रव्यवहारांच्या साक्षांकित प्रती देऊन व महासंचालकांनी येरवडा येथील समतादूतांच्या कार्यशाळेत ‘राधेशाम शाम गोविंद बोलो, हरि गोपाल बोलो’ या गाण्यावर डान्स करून बार्टीला हिंदुत्वाच्या दिशेने कसे नेले जात आहे? असे वरील भीमसैनिकांना पटवून दिले. त्यामुळे बार्टीला वाचविण्यासाठी या चौघांनी मुंबई व पुण्यात खूप मोठा लढा उभा केला. तेव्हा त्यांनी पावसाचीही तमा बाळगली नाही. मात्र निबंधक यांनी तत्कालीन महासंचालकांच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताच व आयबीपीएस विभागप्रमुखाला मलईचे खाते मिळताच या दोघांनीही कातडी बचाव भूमिका घेतली. तेव्हा एकंदरीत त्यांच्या वागण्यावरून या दोघांनीही समाजाचे भांडवल करून आपली पोळी भाजण्यासाठी भीमसैनिकांचा केवळ वापरच केला असे दिसून येत आहे.
तत्कालीन महासंचालकांनी निबंधकांना टार्गेट करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील लढाऊ कार्यकर्त्यांना काही लोकांमार्फत त्यांच्या विरोधातील तक्रारी दिल्या. त्यानुसार भीमसैनिकांनी वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध करून आंदोलन केल्यामुळे यांचे आक्रमक आंदोलन पाहून बार्टीमध्ये दहशत निर्माण झाली होती. हे भीमसैनिक बार्टीत गेले की लगेच सिक्युरिटी गार्ड यांच्या मागेमागे येत असत. यांच्या आंदोलनामुळे निबंधक यांची विभागीय चौकशी सुरू झाली. त्यामुळे सगळे हादरून गेले होते. यादरम्यान महासंचालक व निबंधक यांनी या चौघांच्या विरोधात पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली. तेव्हा तत्कालीन महासंचालकांचे कायदेशीर सल्लागार यांनी गौतम भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांना थोडे दिवस थांबायला सांगितले. त्यामुळे काहीकाळ त्यांनी थांबून पुन्हा काम सुरू करायचे का म्हणून विचारले असता त्यांनी थांबायलाच सांगितले. कारण तत्कालीन महासंचालकांचे काही आक्षेपार्ह मॅसेज अस्वार यांच्या मोबाईलमध्ये असल्याने त्यांनी या महासंचालकाच्या विरोधात पोलिस स्टेशनला तक्रार केली असल्याचे आम्हाला निबंधकांच्या जवळील व्यक्तीकडून समजले. म्हणूनच त्यांनी रिव्हर्स गिअर टाकला होता. यादरम्यान आमचा केवळ वापर करण्यात आला. तसेच तत्कालीन महासंचालकांनी दोन्ही जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आयएएस अधिकारी असल्याने व ते या आंदोलनकर्त्यांना अत्यंत तळमळीने सांगत असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असल्याने बार्टी या संस्थेला वाचविण्यासाठी कविताताई गाडगे, महानंदाताई डाळिंबे, शकुंतला शेलार व गौतम भंडारे यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपला लढा प्रामाणिकपणे सुरू ठेवला. त्याचे साक्षीदार आमचे धम्मबंधू सुनील ओवाळ हे आहेत. आता पूर्वीच्या जनावरांच्या डॉक्टराला व सध्याच्या आयबीपीएस विभागप्रमुखाला मलई पाहिजे. तर आंबेडकरी चळवळीचा बुरखा पांघरुण नको तो उद्योग करणाऱ्या तत्कालीन महासंचालकांचीही गोची झाली आहे. लिडकॉम येथीलही तत्कालीन महासंचालकांचे काही किस्से कानावर येत आहेत. वास्तविक पाहता जनावरांचे डॉक्टर राहिलेले व तत्कालीन महासंचालक यांच्यासारखे महाभाग आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आंबेडकरी चळवळीचा केवळ वापरच करताना दिसून येतात. पुण्यातील आमच्या मित्र परिवाराने तुमची समाजाप्रती असलेली तळमळ वाखाणण्याजोगी आहे, परंतु आपलेच अधिकारी व काही नेते नालायक आहेत असे म्हटले आहे. त्यामुळे आता आपला परका असा दुजाभाव न करता आम्ही सत्य वस्तुस्थिती समोर आणून यापुढे बार्टीला शिस्त लावण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. गौतम भंडारे पदरमोड करून पुणे, मुंबई हेलपाटे मारत होते. त्यामुळे हे चौघे आंदोलनकर्ते कुणाचेच मिंधे नाहीत. संधीसाधूंच्या मदतीशिवाय आता बार्टीतील घाण साफ करण्यासाठी आरपारची लढाई असेल. तसेच जे सोबत येतील त्यांना घेऊन पुन्हा एकदा बार्टीला संधीसाधूंच्या विळख्यातून वाचविण्यासाठी लढा उभा करणार आहे असे यावेळी बोलताना आंबेडकरी चळवळीतील लढाऊ कार्यकर्त्यांनी सांगितले.