अपमान सहन न झाल्यामुळेच आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अब्रू वेशीला टांगली
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): अकलूज येथे दौऱ्यावर आलेले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्त्यावर स्वागतासाठी उभे राहिलेल्या आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटलांना बेदखल केले. अकलूजच्या भूमीत अकलूजच्या मोहिते पाटलांचा घोर अपमान, अश्वत्थाम्यासारखी भळाळलेली अपमानाची जखम घेऊन जगताना आमदार रणजितसिंह माढ्याची निवडणूक संपण्याची वाट पाहत होते. माढ्याची निवडणूक संपली आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेबद्दल खुनशी राजकारणाच्या बातम्या प्रसारमाध्यमाद्वारे प्रसारित करुन त्यांची अब्रू वेशीला टांगण्याचे काम आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले. त्यामुळे भाजपाच्या गोटातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
वास्तविक पाहता निरा उजवा कालव्यातून माळशिरस, सांगोला, पंढरपूर येथील उन्हाळी आवर्तन दुरूस्तीसाठी बंद केलेले आहे. माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर हे महायुतीचे बालेकिल्ले आहेत. या तिन्ही तालुक्यात महायुतीचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या बालेकिल्ल्यात असे खुनशी राजकारण करतील का? दरम्यान पाण्याची गळती रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय होता. सांगोला तालुक्याच्या जनतेला हक्काचे दोन टीएमसी पाणी देणारे, ऐन उन्हाळ्यात माण नदीत टेंभूचे पाणी आणणारे, सांगोल्याच्या सिंचनासाठी ८०० कोटीचा निधी मंजूर करण्यासाठी योगदान असणारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्यांच्या योजना कल्पना सत्यात उतरविण्यासाठी पाठीशी उभे राहणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांना अजून समजलेच नाहीत का? माळशिरस तालुक्याच्या भूमीतील २२ गावांचा पाणीप्रश्न तळमळीने सोडविण्यासाठी परिश्रम घेणारे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार रणजितसिंह यांना समजले नाहीत का? सदरचे आंदोलन शेतकऱ्यांच्या हितापेक्षा आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांच्या स्व अस्तित्वासाठीच असल्याचा वास येत होता. पुण्यातील निवडणुकीमध्ये विरोधकांना तुतारीला फायदा मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे खा. शरद पवारांनी शिवरत्नला आंदोलनाचे आदेश तर दिले नाहीत ना? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडल्याशिवाय राहत नाही.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाचे आमदार आहेत. भाजपात त्यांना काहीच स्थान नाही का? हा प्रश्न जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊनही सुटला असता. कृष्णा खोरे विकास प्रकल्प हाती घेऊन त्या पट्ट्यातील आमदार निवडून आणून त्यांचे नेतृत्व करायचे स्वप्न आमदार रणजितसिंह यांचे होते. या प्रकल्पावर नियंत्रण खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असल्याने फार मोठे स्वप्न ठेवले आणि दुसऱ्यांनी स्वप्न पूर्ण केल्याचे दुःख आमदार रणजितसिंहांना आहे. अकलूजमध्ये नाकारलेला गुच्छ, झालेला अपमान, भाजपाकडून लवकरच पक्षविरोधी कारवायांसंदर्भात काढली जाणारी कारणे दाखवा नोटीसनंतर होणारी आपली हकालपट्टी हे समजल्यामुळेच आपलेही अस्तित्व आहे हे दाखविण्यासाठी केलेला फार्स म्हणजे सदरचे आंदोलन आहे असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.
धैर्यशील यांचा झालेला राजकारणातील वरचष्मा आणि आपण कुठेतरी पाठीमागे पडत आहोत याचे अंतःकरणात असणारे शल्य आमदार रणजितसिंह यांच्यात निर्माण झाले आणि अचानक ते बिळातून बाहेर येऊन अस्तित्व दाखविण्यासाठी धडपड करू लागले असे मानणारा एक वर्ग आहे. मात्र या आंदोलनात सोंगट्या हलविणारे स्वयंघोषित जाणते राजे कुठे गायब झाले? तेच जनतेला कळेना. तसेच आजारी असणाऱ्या विजयदादांचा वापर बंद करून स्वत:च्या हिंमतीवर रणजितसिंहांनी आंदोलनाला माणसं जमवावीत असे जनतेतून बोलले जात आहे. दरम्यान या आंदोलनात उत्तमराव जानकर शिवरत्नचे उत्तम हितचिंतक, उत्तम कार्यकर्ते म्हणून नावारूपाला येत आहेत असे दिसून येत आहे.