खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना बदनाम करण्यासाठी आ. रणजितसिंहांची नौटंकी- अनुप शहा
फलटण (बंडखोर वृत्तसेवा): निरा उजवा कालव्याचे लिकेज थांबविण्यासाठी अंशतः कालवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथे कार्यकर्त्यांची व शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो अत्यंत चुकीचा असून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बदनाम करण्यासाठीच त्यांची ही नौटंकी आहे असे प्रतिपादन भाजपाचे फलटण शहराध्यक्ष व माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केले आहे.
सोमवार दिनांक १३ मे रोजी फलटण येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना टार्गेट करणाऱ्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समाचार घेताना ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना शहा म्हणाले की, लिकेजमुळे पाणीगळती थांबविण्यासाठी प्रशासनाने उजनी कालवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला असताना केवळ राजकीय आकसापोटी आणि आपल्या भावाचा होणारा पराभव पचनी पडत नसल्यामुळे, तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना कुठेही बदनाम करता येत नसल्यामुळे असे खोटेनाटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र तुम्हाला शेतकऱ्यांचा इतका कळवळा येत असेल तर तुम्ही त्यांची बिले का बुडवली? ऊसाचे पेमेंट का केले नाही? कारखाने का मोडून खाल्ले? पतसंस्था मोडून खाताना तुमचे ठेवीचे पैसे परत घ्या असे शेतकऱ्यांना का बोलला नाही? लोकसभा निवडणूक लढवायला तुमच्याकडे पैसे आहे, पण शेतकऱ्यांचे पैसे द्यायला नाहीत का? सर्वात महत्वाचे म्हणजे खरंच पाणी कमी पडलंय की सयाजीराजे वॉटरपार्कमधून इन्कम कमी मिळायला लागलाय? वास्तविक पाहता रणजितसिंहांनी खोटेनाटे आरोप करण्याऐवजी विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकाळात जेव्हा कालवा समितीची बैठक झाली तेव्हा आपले पाणी बारामतीला देताना सही तुमच्याच वडिलांनी केली होती हे लक्षात ठेवावे. तेव्हा तुम्ही का गप्प बसला? तेव्हा का तुम्हाला सुचले नाही? आणि आता पाणी कमी पडतंय म्हणून तुम्ही शेतकऱ्यांच्या नावावर नौटंकी करताय का? मात्र आता जनता अडाणी राहिली नसून तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही. त्यामुळे वेळीच सावध व्हा, आणि योग्य भूमिका घ्या. चुकीचे वागत असाल तर तुम्हाला उघडं केल्याशिवाय राहणार नाही. आणि राहिला प्रश्न खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा. तर मागच्या वेळेस खासदार झाल्यानंतर पंधराच दिवसातच त्यांनी बारामतीचे पाणी पुन्हा आपल्या भागात आणले, म्हणूनच त्यांना जलनायक म्हणतात. आपण जर खरंच पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करीत असाल तर माळशिरस पश्चिम भागातील २२ गावं पाण्यापासून वंचित राहिली होती त्या गावांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाच वर्षात पाणी मिळवून दिलं. तुम्ही उपमुख्यमंत्री असताना, मंत्री असताना, आमदार असताना हे काम का केले नाही? याचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उत्तर देतील का? दरम्यान त्यांची शेतकऱ्यांबद्दलची ही भूमिका सवंग प्रसिध्दीसाठी असून जनतेला त्यांचे शेतकरी व जनतेबद्दलेच प्रेम किती कोडगे आहे हे कळतेच असे यावेळी बोलताना अनुप शहा म्हणाले.