मोहिते पाटलांचा दहशतवाद मूळासकट उपटून काढू- खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
माळीनगर (बंडखोर वृत्तसेवा): ऐन निवडणुकीत चुकीच्या पध्दतीने डॉक्टरांकडून लाखो रूपयांचे कलेक्शन केले जात आहे. वैद्यकीय क्षेत्रातीलच काही लोकांच्या माध्यमातून डॉक्टरांकडून कोट्यवधी रूपयांची खंडणी गोळा करण्याचे काम सुरू केले आहे ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. ज्यांना पतसंस्था चालवता येत नाही, ज्यांना कारखाना चालवता आला नाही ते देश चालवायला निघालेत. मोहिते पाटलांचा प्रचंड मोठा दहशतवाद हा रणजितसिंह नाईक निंबाळकर मूळासकट उपटून काढू शकतो, ती ताकद माझ्यात आहे असे वक्तव्य खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माळीनगर येथील रंजनभाऊ यांच्या बंगल्यावर आयोजित केलेल्या बैठकीत केले.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार अकलूज परिसरातील मोहिते पाटलांची दहशत मोडीत काढण्याचा विडाच उचलला आहे. यावेळी पुढे बोलताना निंबाळकर म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राबवली तर अकलूजमधून चप्पलही चोरीला जाणार नाही. निवडणुकीनंतर ही कायदा व सुव्यवस्था आपल्याला व्यवस्थित राबवावी लागणार आहे. झिपऱ्या सोडलेल्या पैलवानांच्या झिपऱ्या कट कराव्या लागतील. त्यांचाही योग्य बंदोबस्त केला जाईल. प्रत्यक्षात सोडा, फोनवरून सुध्दा कुणी धमकी द्यायची हिंमत करणार नाही. मोहिते पाटलांनी ज्या पध्दतीने मोदींसोबत विश्वासघात केला, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासघात केला, माझा विश्वासघात केला, अशा डॉक्टरांकडून खंडणी गोळा करणाऱ्या या लोकांना आपल्याला स्वतः गाडावे लागणार आहे. अग्निचा राहिलेला तुकडा, कर्जाचा राहिलेला भाग आणि यांच्यासारखे महाभाग राजकारणातून समूळ नष्ट केले पाहिजेत. सुखशांती व्यवस्थित नांदवायची असेल तर या भस्मासूराला आजच बाटलीत बंद करायचे ठरवले पाहिजे. भविष्यात माळीनगरच्या कारखान्याला पाच-दहा टनापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जाईल. गाळप क्षमता व नेतृत्व क्षमता वाढविण्याचे आम्ही ठरविले आहे. दहशत युक्तीने मोडीत काढा. जर कुणी केसाला धक्का लावला तर त्याच्या डोक्याला एकही केस राहणार नाही. आम्ही जशास तसेपेक्षा पूर्ण बाराखडी वाचून दाखवत असतो. जोवर कुलूप लावत नाही तोपर्यंत बंद करत नाही हे देवेंद्र फडणवीस व आमचं ठरलंय. त्यामुळे आता तुम्हीही कुणाला खासदार करायचं हे ठरवलं पाहिजे असे यावेळी बोलताना निंबाळकर म्हणाले.
दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर रंजनभाऊ गिरमे म्हणाले की, गेल्या ७० वर्षांपासून मोहिते पाटलांनी प्रचंड दहशत माजवली. मी कॉलेज जीवनापासून या मोहिते पाटलांची दहशत बघतोय. त्यांनी ऊस पेटवला होता, सुनील पाषाणकरला मारले होते तेव्हा त्यांची अतिशय दहशत होती. पण आता घाबरण्याचे काही कारण नाही. दहशत डोक्यातून काढून टाका व प्रत्येकाने दहा-दहा मते गोळा करा. माळशिरस तालुक्यातून आपल्याला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दहा हजारांचे लीड द्यायचे आहे. त्यामुळे जे कामानिमित्त बाहेर गेले आहेत त्यांना बोलवा. आपला माळीनगर कारखाना बंद पाडणे हेच मोहिते पाटलांचे लक्ष्य आहे हे लक्षात ठेवून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी जोमाने कामाला लागा असे यावेळी बोलताना गिरमे म्हणाले.
शिवसेना शिंदे गटाचे माळशिरस तालुकाध्यक्ष राजकुमार हिवरकर म्हणाले की, मोहिते पाटलांची जुलमी राजवट असल्यामुळे आता ठोशास ठोसा देण्याची तयारी ठेवली पाहिजे. निवडणुकीच्या नावाखाली अकलूजमधील हॉस्पिटलमधून होत असलेल्या कोट्यवधी रूपयांच्या वसुलीची चौकशी केली पाहिजे. यावेळी एड. बी. वाय. राऊत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी होम टू होम प्रचारयंत्रणा राबविण्याची जबाबदारी स्वंयस्फूर्तीने उचलली.