धैर्यशील यांना तुतारीऐवजी “खंजीर” हे चिन्ह अधिक शोभले असते!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): माढा लोकसभा मतदारसंघात बारामतीकरांसमोर अगतिक लाचार होऊन, हांजी हांजी करून, पवारांचे पाय धरून आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी मोहिते पाटलांनी तुतारी हातात घेतली. मात्र शिवरत्नचे आजपर्यंतचे राजकारण पाहता धैर्यशील यांना तुतारीऐवजी खंजीर हेच चिन्ह अधिक शोभले असते असे जनतेतून बोलले जात आहे.
दहा वर्षापूर्वीच्या शिवरत्नच्या राजकारणाचे सिंहावलोकन केले तर विजयदादांना सर्वसंमतीने उमेदवारी देऊन आमदार बबनराव शिंदे व स्वर्गिय आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी तन, मन, धनाने प्रचार यंत्रणा राबविली होती असे दिसून येईल. या नेत्यांनी विजयदादांना विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला. मात्र त्यांनी याचे श्रेय आपल्या सहकाऱ्यांना दिले नाही, तर स्वतःकडेच घेतले. त्यानंतर पाच महिन्यात विधानसभा आली, तेव्हा या दोघांच्या विरोधात प्रचार करुन शिवरत्नने आमदार बबनराव शिंदे आणि स्वर्गिय आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या पाठीत खंजीर खुपसला.
२०१९ ला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना निवडून आणताना मोहिते पाटलांसोबत उत्तमराव जानकरांसह इतर विरोधकांनी खा. निंबाळकरांना माळशिरस तालुक्यातून लाखांचे लिड मिळवून दिले. मात्र शिवरत्नने पुन्हा एकदा आपला कपटी, खुनशी, कावेबाजपणा दाखविला. खा. निंबाळकरांना आमच्यामुळेच लिड मिळाले असे सभा, मिडीयातून सांगायला त्यांनी सुरूवात केली. उत्तम जानकरांसह ज्यांनी ज्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खासदार होण्यासाठी मदत केली त्यांच्या पाठीत मोहिते पाटलांनी इथेही “खंजीर” खुपसला. श्रेयवादाची जागतिक ऑलंम्पिकमध्ये स्पर्धा ठेवली तर मोहिते पाटील पहिले येतील.
धनगर समाजातील जुनी जाणती माणसे, तसेच विरोधी पक्षातील जुनी माणसे म्हणतात, “जानकर हे भोळे भाबडे आहेत. मोहिते पाटील त्यांना कुठे गुंडाळून टाकतील? हे सुध्दा समजणार नाही. बैल दूध देतो यावर सोलापूर जिल्ह्यातील राजकारणी विश्वास ठेवतील, परंतु मोहिते पाटलांवर राजकारण्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचा विश्वास राहिलेला नाही. २०२४ ला माढा लोकसभा मतदारसंघातून सहा विद्यमान आमदारांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर धैर्यशील यांना तीव्र विरोध केला. त्यामुळे भाजपाने उमेदवारी नाकारली. पण मोहिते पाटलांना उमेदवारीसाठी पाचव्यांदा पक्ष बदलावा लागला. त्यांनी पवारांच्या पक्षात प्रवेश करुन हाती तुतारी घेतली.
२०१४ मध्ये खासदार म्हणून निवडून आल्यानंतर विजयदादांनी हायमास्ट दिवे आणि पिकअपशेड, त्यावर आपली नावे या पलीकडे केले तरी काय? माळशिरस तालुक्यात एमआयडीसी आणता आली नाही. त्यांनी सत्तेच्या जोरावर शिवरत्न केंद्रित अर्थव्यवस्था निर्माण करण्याची दक्षता घेतली. मात्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न सोडविण्याबरोबरच पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्गही मार्गी लावला आहे. त्याचबरोबर त्यांनी सत्तेच्या माध्यमातून आपल्या सहकारी व कार्यकर्त्यांना सक्षम करण्याचे काम केले.
जयसिंह व धैर्यशील या काका पुतण्यांनी गोरगरीबांच्या पतसंस्था खाल्ल्या. या बकासूरांनी एवढं खाऊन साधी ढेकर सुध्दा दिली नाही. खुनशीपणाने अनेकांना गाव सोडायला मजबूर केले. त्यामुळे पुन्हा हे सत्तेत आले तर खुनशीपणाचा, दडपशाहीचा अतिरेक होईल. माढा लोकसभा मतदारसंघात अशी परिस्थिती आहे की धैर्यशील यांना मत म्हणजे राहुल गांधींना मत आहे, तर खा. निंबाळकरांना मत म्हणजे “पंतप्रधान मोदींना” मत आहे. ३० एप्रिलला माळशिरस तालुक्यात पंतप्रधान मोदींची सभा झाल्यावर खा. निंबाळकरांचे पारडे जड होऊन धैर्यशील मोहिते पाटील तुतारीप्रमाणे अडगळीत पडतील. पुन्हा एकदा २००९ ते २०१४ चा राजकीय विजनवास आयुष्यभरासाठी शिवरत्नच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता आहे असे राजकीय जाणकरांतून बोलले जात आहे.