उत्तमराव जानकरांकडून विषारी झाडाला पाणी!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): गत विधानसभा निवडणुकीत पडलेल्या एक लाख मतांचे भांडवल करुन मांडवलीचे राजकारण करणारे उत्तमराव जानकर आपल्या स्वार्थासाठी वेळोवेळी गिरगिटासारखे रंग बदलताना अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. म्हणून तर पुण्यातील काही पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांची बोलती बंद केली होती. मात्र भाजपाने स्पेशल विमान पाठवून जानकरांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरही त्यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी वेळापूरात बैठक बोलावून त्या बैठकीत जयसिंह मोहिते पाटील व माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील या कट्टर विरोधकांना निमंत्रित करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात काम करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र संधीसाधू उत्तमराव जानकर धैर्यशील यांना मदत करून एकप्रकारे विषारी झाडाला पाणी घालण्याचे काम करत आहेत असे जनतेतून बोलले जात आहे.
शिवरत्नचे पारंपरिक विरोधक ऍड. सुभाष पाटील यांनी शिवरत्नशी कधीच तडजोड केली नाही. आपले संपूर्ण आयुष्य मोहिते पाटील विरोधक म्हणूनच त्यांनी घालविले. त्यांच्यानंतर २००९ साली माळशिरस विधानसभेची निवडणूक लढविल्यानंतर उत्तमराव जानकर चर्चेत आले. उत्तमराव जानकरांना ऍड. सुभाष पाटील व शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख स्व. दत्ताआप्पा वाघमारे यांचा पाठिंबा होता. उत्तमराव जानकर हे लढवय्ये नेतृत्व असल्याने माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांचे पारंपरिक विरोधक धनगर समाज यांच्यासह त्यांना बहुसंख्य लोक आपला नेता मानू लागले. प्रस्थापित मोहिते पाटील यांच्याशी लढणारा नेता म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक झाल्यानंतर अनेकांनी त्यांना भरभरुन मदत केली. पण अधूनमधून उत्तमराव जानकर कशाचे ना कशाचे भांडवल करून मोहिते पाटलांशी मांडवली करीत असल्याच्या घटना कानावर आल्यावर अनेकांनी त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह मोहिते पाटील विरोधकांनी उत्तमराव जानकर यांना ताकद देऊन एकप्रकारे सापाला दूध पाजण्याचेच काम केले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. संधीसाधू विरोधकांचे नकली मुखवटे कधी ना कधी गळून पडत असतात. अन्यायग्रस्त लोकांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या उत्तमराव जानकर यांचाही धंदेवाईकपणाचा, मांडवलीचा मुखवटा गळून पडल्याने जनतेने आता त्यांना डोक्यावर खाली फेकणे गरजेचे आहे.
ज्या समाजाची लोकसंख्या प्रचंड असते त्या समाजातील नेतृत्वाला उमेदवारी देणे महत्त्वाचे असते. मोहिते पाटलांची तिसरी पिढी अकलूजच्या वॉर्डातही दारूण पराभवाला सामोरी जात आहे आणि धैर्यशील हे तिसऱ्या पिढीतीलच नेतृत्व आहेत. तरीही डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासारख्या धनगर समाजातील लोकप्रिय नेतृत्वाला डावलून शरद पवारांनी खुनशी राजकारणी असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिल्याने त्यांची निर्णय क्षमताच कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे.
अकलूजचे मोहिते पाटिल राजकीय स्वार्थापोटी कधी जय श्रीराम म्हणतात, कधी हर हर महादेव म्हणतात, तर कधीकधी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन आंबेडकरी चळवळीला, परिवर्तनवादी चळवळीला इमोशनल ब्लॅकमेल करतात. त्यामुळे मोहिते पाटलांनी कुठेतरी एका ठिकाणी स्थिर राहिले पाहिजे. महापुरुषांची नावे तर यांच्या तोंडात शोभतच नाहीत. कारण २००९ पासून त्यांना आमदारकीसाठी बौध्द समाजातील नेतृत्व दिसले नाही.
बाळदादा उर्फ स्वयंघोषित जाणते राजे म्हणतात “मी कुठल्याही पक्षाचा नाही, विजयदादा हाच माझा पक्ष!” मग आमदार रणजितसिंहांकडून वेगळी अपेक्षा काय करणार?त्यामुळेच माळशिरस तालुक्यातील भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांकडून त्यांच्या हकालपट्टीची मागणी होत आहे. उत्तमराव जानकर आज शिवरत्नबरोबर जात आहेत. यादरम्यान त्यांना विरोधी पक्षातील लोकांना शिवरत्नने दिलेला त्रास आणि मुस्कटदाबीची जाण आणि भान नाही. स्वाभिमानी विरोधक म्हणून नकली मुखवटा धारण करणाऱ्या उत्तमराव जानकरांवर एक वेळ अशी येईल की “माझा पक्ष धैर्यशील मोहिते पाटीलच.” असे म्हणावे लागेल. जो शिवरत्न जिल्ह्याच्या राजकारणातून संपला, जो शिवरत्न तालुक्याच्या राजकारणातून संपला (विद्यमान आमदार सातपुते भाजपात आहेत), जो शिवरत्न अकलूजसारख्या गावातून संपत चालला (अकलूज ग्रामपंचायतीत संग्रामसिंहाचा पराभव) त्यामुळेच मोहिते पाटील जानकरांना जवळ करीत आहेत. कारण जानकर आपल्यासोबत उभे राहिले तर विजय निश्चित होईल असे मोहिते पाटलांना वाटत असले तरी तो त्यांचा भ्रम आहे. दरम्यान संधीसाधूपणाच्या राजकारणात जानकर स्वत:च स्वत:चे अवमूल्यन करून घेत आहेत. स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेत आहेत. आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी उत्तमराव जानकर विषारी झाडाला पाणी घालत असले तरी त्याची फळेही विषारीच असणार आहेत याचे भान त्यांना असले पाहिजे.