मोहिते पाटलांनी संजीवनी बुटीच्या बदल्यात रामभाऊ सातपुते यांना आमदार केले, उपकार केले नाहीत!
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): नुकताच धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिवरत्न बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी आमदार रामभाऊ सातपुते यांना टार्गेट करताना दादांच्या सांगण्यावरुन एका रात्रीत तुला आमदार केला, पण एका रात्रीत तुझे पार्सल बीडला पाठवायची ताकद आमच्यात आहे असे वक्तव्य धैर्यशील यांनी केले. वास्तविक पाहता राजकीय साठमारीमुळे मोहिते पाटलांच्या शिवरत्नचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर होते. मात्र भाजपाने शिवरत्नला संजीवनी बुटी देऊन सशक्त केल्यामुळेच मोहिते पाटलांनी रामभाऊ सातपुते यांना आमदार केले, काही उपकार केले नाहीत असा सूर आमदार रामभाऊ सातपुते समर्थकांतून निघत आहे.
२०१९ साली रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या माढा लोकसभेच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत विरोध होऊ लागताच मोहिते पाटलांनी ‘जय श्रीराम’चा नारा देत राष्ट्रवादीतून बाहेर पडून कमळ हातात घेतले. यादरम्यान कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा मुद्दा पुढे करून मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केला असला तरी भाजपाकडून संजीवनी बुटी मिळण्याच्या आश्वासनानंतरच त्यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून रामभाऊ सातपुते यांना आमदार केले. दरम्यान मोहिते पाटील यांनी माळशिरस विधानसभेचा आमदार ठरवून त्याचा फॉर्मही भरला होता. परंतु पक्षाला आव्हान देणे हे भाजपाला चालत नसल्याने नाईलाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश म्हणून त्यांनी रामभाऊ सातपुते यांना आमदार केले. मात्र आपले वलय कमी होईल या भीतीपोटी मोहिते पाटलांनी रामभाऊंना माळशिरस पूर्व भागात लक्ष घालू दिले नाही. रामभाऊ सातपुते यांना आमदार करणे ही मोहिते पाटलांची मजबुरी होती. आपल्या तालावर नाचणारा आणि आपल्याला विचारल्याशिवाय निधी वाटप न करणारा आमदार यांना हवा होता. पण भाजपाने माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा विकास करुन उपेक्षित गावांना विकासाभिमुख व सक्षम नेतृत्व देऊन माळशिरस तालुक्याची दरिद्री घालवली. आज गेल्या कित्येक वर्षांपासून अडगळीत पडलेल्या गावांचा विकास झाला. गेल्या ७५ वर्षात जितका विकास झाला नाही तितका विकास अडीच वर्षांत केला हे आमदार रामभाऊ सातपुते यांचे वक्तव्य सत्यच आहे. त्यांचे हे वक्तव्य इतके का झोंबावे? ग्राऊंड रिपोर्टनुसार हे सत्यच आहे. पण वस्तुस्थिती बघितली तर धैर्यशील हे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि टार्गेट करतात आमदार रामभाऊ सातपुते यांना! यावरूनच ते धैर्यशील यांच्या किती डोक्यात आहेत हे दिसते. जोपर्यंत आमदार रामभाऊ सातपुते त्यांच्यासोबत होते तोपर्यंत चांगले, मात्र भाजपाशी एकनिष्ठ राहून आमदार रामभाऊ सातपुते यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यावर त्यांच्याविरोधात आगपाखड? रामभाऊंनी तुमच्या तालावर नाचायला ते काय तुमचे गुलाम आहेत का? विद्यार्थी दशेपासून ते भाजपाशी एकनिष्ठ आहेत. मग पक्षाच्या आदेशानुसारच ते काम करणार! जरी तुमच्यामुळे रामभाऊ सातपुते आमदार झाले असले तरी तुम्ही भाजपाकडून भरभरुन घेतले आहे. काळवंडलेल्या शिवरत्नला भाजपामुळेच चकाकी आली आहे. मग ती विधानपरिषदेच्या आमदारकीमुळे असो, शिवरत्न कंन्स्ट्रक्शनला दिलेल्या ३५० कोटींच्या पालखी महामार्गाच्या कामामुळे असो किंवा शंकर कारखान्याला दिलेल्या ११३ कोटींमुळे असो. इतकी मोठी संजीवनी बुटी मिळालेली असताना रामभाऊ सातपुते यांना आमदार केल्याबद्दल धैर्यशील यांना पश्चात्ताप होण्याचे कारण काय? आमदार रामभाऊ सातपुते यांच्याबद्दल बोलताना एका रात्रीत बीडचे पार्सल माघारी पाठवायची ताकद आमच्यात आहे असे धैर्यशील म्हणत असले तरी ती ताकद बडा घर पोकळ वासा अशी ठरु नये म्हणजे झालं, असा सूर राजकीय जाणकारांतून निघत आहे.