मतदारांना वेडे व वानरसेना म्हटल्याबद्दल ॲड. धैर्यशील पाटील यांचेकडून जयसिंह मोहिते पाटलांचा निषेध!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): नुकत्याच एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार जयसिंह मोहिते पाटील एका न्युज चॅनेलशी बोलताना म्हणाले होते की, “माळशिरस तालुक्यातील मतदार वेडा आहे, एक वानरसेना आहे, ही सेना उधळली की कोणाचेच ऐकत नाही.” मतदारांबद्दलच्या या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करुन सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष ॲड. धैर्यशील पाटील यांनी त्यांचा निषेध केला आहे.
जयसिंह मोहिते पाटील यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत पुढे बोलताना ॲड. धैर्यशील पाटील म्हणाले की, मतदारांची तुलना वेड्याशी किंवा वानरसेनेशी करणे ही लोकशाहीची थट्टा आहे. माळशिरस तालुक्यातील मतदार मोहिते पाटील पक्षाला निवडून देत असल्यामुळे ते त्यांना वेडे समजत आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच वानरसेना ही प्रभु श्रीरामाच्या सेवेत होती व प्रभु श्रीरामाच्या व सुग्रीवच्या ऐकण्यात होती. लोकशाहीमध्ये मतदार सुज्ञपणे लोकप्रतिनिधी निवडत असतात. मताधिकाराच्या माध्यमातून ते लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवतात. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींनी वानर सेनेप्रमाणे जनता जनार्धनाचे ऐकायचे असते व जनसेवा करायची असते. सध्या नेते जनतेचे न ऐकता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उधळत सुटत असल्याचे दिसतात असे ते म्हणाले. मतदानातून जनता त्यांचा सुज्ञपणा दाखवेल, जयसिंह मोहिते पाटील यांना खोटे ठरवतील व लोकशाही वृध्दिंगत करतील असा विश्वास ॲड. धैर्यशील पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.