भाजपची मिठाई खाऊन घसा बसलेल्या शिवरत्नच्या तुतारीतून आवाज येईल का?
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): २०१४ ची खासदारकी वगळता २००९ साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यापासून शिवरत्नकडे येणाऱ्या मिठाईच्या पेट्या बंद झाल्या होत्या. मात्र शिवरत्नने ‘जय श्रीराम’चा नारा देत कमळ हातात घेतल्यानंतर भाजपाने शिवरत्नला भरभरून मिठाई दिली. या मिठाईच्या बॉक्समध्ये शंकर कारखान्याला ११३ कोटी, शिवरत्न कंन्स्ट्रक्शनला पालखी महामार्गाच्या कामासाठी ३५० कोटीसह आमदारकी आणि भरगच्च कोट्यवधी रुपयांचा निधीही दिला. परंतु आणखी मिठाई खाण्याच्या हावरटपणामुळे शिवरत्नने मिठाईचे वाटप करणाऱ्यांच्याच विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी हाती तुतारी घेतली खरी, पण भाजपची मिठाई खाऊन घसा बसलेल्या शिवरत्नच्या तुतारीतून आवाज येईल का? असे जनतेतून बोलले जात आहे.
अतिलालसा ही देशोधडीला लावत असते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलून आपले सूपुत्र रणजितसिंह मोहिते पाटलांचे राजकारणात बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला. मोहिते पाटलांना शरद पवारांनी भरभरून दिले. ३०-३५ वर्षे विविध मंत्रीपदे देण्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील सर्व धुरा त्यांनी मोहिते पाटलांच्याच खांद्यावर टाकली. त्यामुळे मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्याला सोलापूर जिल्ह्याची राजकीय राजधानी असेच म्हटले जात होते. मात्र शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व राजकीय सूत्रे मोहिते पाटलांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांना दाबून आपलीच घराणेशाही जपण्याचे काम केले. तरीही कार्यकर्ते शांत राहिले. मात्र माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर जेव्हा विजयसिंह मोहिते पाटलांनी पंढरपूरमधून विधानसभेची निवडणूक लढवली तेव्हा कार्यकर्त्यांच्या सुप्त नाराजीचा कडेलोट झाला व सर्वांनी मिळून मोहिते पाटलांचा करेक्ट कार्यक्रमच केला. तेव्हापासून राजकीय पिछेहाट झालेल्या मोहिते पाटलांना २०१९ साली भाजपाने ‘जय श्रीराम’ची संजीवनी बुटी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा शिवरत्नला पालवी फुटू लागली. अडगळीत पडलेल्या रणजितसिंह मोहिते पाटलांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाली. बंद पडलेला सदाशिवनगरचा शंकर कारखाना सुरू झाला. शिवरत्न कंन्स्ट्रक्शनला पालखी महामार्गाच्या कामामुळे पुन्हा एकदा झळाळी आली. परंतु खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आपल्याला विश्वासात न घेता आपल्या विरोधकांचीच कामे करुन त्यांना बळ देऊ लागले, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाण्याचा प्रश्न सोडवू लागले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकासकामांमुळे आपले अस्तित्वच धोक्यात येऊ लागले म्हणून आपल्याला किंमत न देणारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जोरदार विरोध करण्यासाठी मोहिते पाटलांनी धैर्यशील यांना माढा लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवले. पण मोहिते पाटलांचा प्रखर विरोध असतानाही भाजपा पक्षश्रेष्ठींनी माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी तुतारीचे स्टेटस ठेवून भाजपाच्या विरोधात जोरदार प्रचार सुरू केला. धैर्यशील यांनीही माढ्यातून शरद पवारांकडे उमेदवारी मागण्यासाठी गोविंद बागेत येरझाऱ्या मारायला सुरुवात केली. पण गोविंद बागेची वाट धरण्यापूर्वी मोहिते पाटलांनी भाजपाने दिलेल्या मिठाईचा फडशा पाडला होता. त्यामुळे खाल्ल्या मिठाईला जागावे की तुतारी वाजवावी अशा संभ्रमात असतानाच मोहिते पाटलांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. पण मिठाईच्या बॉक्समध्ये आलेल्या आमदारकीचे काय करणार? ११३ कोटीचे काय करणार? आणि शिवरत्न कंन्स्ट्रक्शनला दिलेल्या ३५० कोटीचे काय करणार? असे प्रश्न राजकीय जाणकारांतून उपस्थित केले जात आहेत. मात्र भाजपाची मिठाई खाऊन घसा बसलेला असताना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी शिवरत्नने तुतारी हातात घेतली असली तरी त्या तुतारीतून आवाज येईल का? तुतारीचा आवाज अकलूजच्या वेशीपर्यंत तरी जाईल का? असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.