धैर्यशील यांनी संसदीय राजकारणाला गावपातळीवरचा बाजार केला!
माढा (बंडखोर वृत्तसेवा): एखाद्या नेतृत्वाला बुध्दीमान सल्लागारांपेक्षा खुशमस्कऱ्यांनीच वेढा घातला तर त्याचा घात होत असतो. संसदीय राजकारण करीत असताना गावपातळीवरच्या सारखे राजकारण करायचे नसते, तर डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवूनच राजकीय रणनिती ठरवायची असते. मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून खासदारकी मिळविण्यासाठी आपल्याच पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सातत्याने टार्गेट करून भाजपाश्रेष्ठींना आव्हान देण्याचे काम केले. संसदीय राजकारणाला गावपातळीवरच्या निवडणुकीसारखे समजून धैर्यशील यांनी भाजपाश्रेष्ठींवरच दबावतंत्राचा वापर करायला सुरूवात केली. त्यामुळे शिस्तबध्द पक्ष म्हणून ख्याती असलेल्या भाजपाला हे न रुचल्याने पक्षश्रेष्ठींनी त्यांना पूर्णपणे डावलून आपली पूर्ण ताकद खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीशी उभी केल्याने इगो हर्ट झालेल्या मोहिते पाटलांनी आता हाती तुतारी घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असले तरी यादरम्यान धैर्यशील यांनी संसदीय राजकारणाला गावपातळीवरचा बाजार केल्याचे दिसून येत आहे. झुंडशाही, गुंडशाही हीच लोकशाहीची व्याख्या धैर्यशील यांच्या डोक्यात आहे. निवडणुका जाहीर होतात तेव्हा राजकीय शिकारी सोनेरी पिंजरे घेऊन बाहेर पडतात. परंतु चार तपं शिवरत्नने राजकारणात घालविली तरी ते एमआयडीसी का आणू शकले नाहीत? जिथे फायदा तिथेच विकास हा शिवरत्नचा मूलमंत्र आहे. विकासाच्या नावाने टाहो फोडणाऱ्या शिवरत्नचाच विकास झाला. संसदेत जाऊन कायदे तयार करायचे असतात, गावगुंडांसारखे कायदे पायदळी तुडवायचे नसतात. संसदीय राजकारणात जाण्याचा विचार करण्यापूर्वी आपण संविधान वाचले का? महापुरूष समजून घेतले का? दरम्यान राजकारण हे हसत खेळत असावे, सूडबुध्दीचे नसावे. निवड, तडजोड, माघार हे राजकारणातील तीन घटकही महत्त्वाचेच. सूडबुध्दीने एका निंबाळकरांची जिरविण्याच्या नादात आज शिवरत्न स्वतःभोवती अडचणी निर्माण करून घेत आहे. यादरम्यान तुमचं काहीतरी चुकतंय असे सांगणारे शिवरत्नवर कुणीच नाही. तर आता माघार घ्यायची नाही. भैय्यासाहेबच खासदार असे म्हणून त्यांना चेतविणारेच अवतीभवती आहेत. या खुशमस्कऱ्यांच्या अतिउत्साहामुळे केंद्रीय राजकारणाचा अनुभव नसणाऱ्या धैर्यशील यांनी गावपातळीवरच्या राजकारणासारख्या आक्रमक राजनितीचा वापर केला आहे. पण आपल्या अस्तित्वासाठी आपण आक्रमक होताना ज्या पक्षाच्या विरोधात आक्रमक होतोय त्यांच्याकडून काय काय घेतलंय याची आठवण ठेवायला पाहिजे होती. शिवरत्नने भाजपाला एक खासदार आणि एक आमदार निवडून दिला असला तरी भाजपानेही मोहिते पाटलांना भरभरून दिले आहे. आपल्याच घरातील व्यक्तिचा प्रचार करण्यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याशी मांडवली करणारा शिवरत्न भाजपासाठी थोडेच फुकटात काम करेल. त्याबदल्यात भाजपाने रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली, सदाशिवनगर येथील शंकर साखर कारखाना सुरू करण्यासाठी ११३ कोटी रूपये दिले. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांबरोबरच इतर एकूण ५०० कोटींच्या आसपास कामे दिली. भाजपाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आणि कामे घेता, त्यानंतर उमेदवारीसाठी भाजपबरोबरच बगावत ही कसली राजनिती?एखादा दिवा विझताना जास्त फडफड करून आणि दिव्याची वात मोठी होऊन तो विझत असतो. धैर्यशील मोहिते पाटलांची अवस्था त्या दिव्यासारखीच झालेली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. धैर्यशील मोहिते पाटलांना राजकारणात कुणी इतरांनी संपविण्याची गरज नाही, तर ते स्वतःचा अहंकार, मोठेपणाची झूल व अति आत्मविश्वास या दुर्गणांमुळेच राजकारणात स्वतः संपत चालले आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गटातटाचे राजकारण न करता ज्यांनी ज्यांनी आपल्याला खासदार होण्यासाठी मदत केलीय त्यांच्या संपर्कात राहून ते त्यांची कामे करीत असतात. त्यामुळे अगोदरच त्यांच्यावर नाराज असलेले मोहिते पाटील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आमदार संजय शिंदे यांच्या फार्म हाऊसवर सर्व मोहिते पाटील विरोधकांची घेतलेली बैठक व आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मांडवे येथील कार्यक्रमात त्यांनी फोडलेला प्रचाराचा नारळ यामुळे कमालीचे दुखावले. वास्तविक पाहता शिवरत्नवरील मोहिते पाटलांनी आता पहिल्यासारखी आमदार, खासदार यांच्याकडून अपेक्षाच करू नये. इतर पक्षासारखे भाजपात चालत नाही. भाजपा लोकप्रतिनिधींना पूर्णपणे स्वातंत्र्य देते. पक्षश्रेष्ठींशिवाय तिथे कुणाचाच रुबाब चालत नाही. तसेच शिवरत्नने आता पूर्वीसारखे आपले वलय राहिले नाही हे समजून घेतले पाहिजे. राजेशाही घराण्यातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडून शिवरत्नने अपेक्षा तरी का करावी? पूर्वी अकलूज हे दहिगांव परगण्यात होते. परगण्याची देशमुखी निंबाळकरांकडे होती. देशमुखांचे कार्य तात्कालिक कालखंडात तहसिलदाराचे असायचे. अकलूजची पाटीलकी मोहिते यांच्याकडे असायची. यावरून शिवरत्नने आत्मपरीक्षण करावे. शिवरत्न खरंच महाराष्ट्रातील राजकीय दिशा ठरविणारा असता तर गोविंद बागेतील फुटपाथवर बसायची वेळ आलीच नसती. धैर्यशील यांचे खास वलय असते, तर पहिल्या यादीतच माढ्याची उमेदवारी शरद पवारांनी का दिली नाही? शरद पवारांनी मोहिते पाटलांच्या हाती तुतारी देण्यापूर्वी त्यांना काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांची गोची होत आहे. राष्ट्रवादीत आले तर सर्वांनीच यावे लागेल असे शरद पवार शिवरत्नवरील मोहिते पाटलांना म्हणाल्याचे समजते. मात्र रणजितसिंह मोहिते पाटील हे विधानपरिषदेचे आमदार असल्याने त्यांना हाती तुतारी घेताना अडचणी येतात. त्यामुळे इकडे आड, तिकडे विहीर अशी मोहिते पाटलांची अवस्था झालेली आहे. मात्र एक तुतारी द्या मज आणुनि, फुंकीन जी मी स्वप्राणाने या केशवसुतांच्या कवितेप्रमाणे वाट्टेल ती किंमत मोजायची तयारी ठेवून जरी शिवरत्नवरील मोहिते पाटलांनी हाती तुतारी घेतली तरी राजकीय पार्श्वभूमी पाहता माढ्यात ती वाजणार नाही, असेच चित्र दिसत आहे.