माढ्याच्या रणांगणात जयसिंह करणार धैर्यशील यांचा गेम!
संग्रामसिंहांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच जयसिंह उतरले राजकीय आखाड्यात
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): २०२१ साली अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ३ मध्ये संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यानंतर या पराभवाच्या पाठीमागे धैर्यशील मोहिते पाटील यांचाच हात असल्याची जोरदार चर्चा होती. तेव्हा जयसिंह मोहिते पाटील कमालीचे अस्वस्थ झाले होते. आपल्या सूपुत्राच्या पराभवानंतर जयसिंह मोहिते पाटील यांनी वॉर्ड क्रमांक ३ मध्ये फिरुन मतदारांशी संवाद साधला होता. मात्र यादरम्यान जयसिंह व धैर्यशील यांच्यामध्ये सुप्त मतभेद असल्याचे बोलले जात होते. आपल्या मुलाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी जयसिंह मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालून आली, म्हणूनच माढ्याच्या रणांगणात धैर्यशील यांचा गेम करण्यासाठी जयसिंह राजकीय आखाड्यात उतरलेत अशी अकलूज व परिसरात चर्चा सुरू आहे.सहकारमहर्षी साखर कारखाना व शिक्षण प्रसारक मंडळ सांभाळणाऱ्या जयसिंह मोहिते पाटील यांनी कामगार व त्यांच्या नातेवाईकांच्या मतांच्या जोरावर अनेक बड्या पक्षांना खिंडीत गाठण्याचे काम केले. जयसिंहांच्या पाठीशी मोठा जनाधार असल्याने या जनमताच्या जोरावर त्यांनी राजकीय पक्ष व प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत आपली अनेक कामे करुन घेतली. जयसिंह मोहिते पाटलांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना जाणता राजा ही पदवी दिली. आपल्या अचूक नियोजनाने माळशिरस तालुक्यातील राजकारण घुसळून काढणाऱ्या जयसिंह मोहिते पाटील यांचा पूर्वी खूप राजकीय दबदबा होता. मात्र धैर्यशील मोहिते पाटील राजकारणात आल्यापासून त्यांनी जनमत आपल्याकडे खेचून घेतल्याने सुमित्रा पतसंस्थेमुळे खचलेल्या जयसिंह मोहिते पाटील यांची उत्तरोत्तर राजकीय रणनितीही कमकुवत झाली. कारण माळशिरस तालुक्याचे राजकारण फिरविणाऱ्या जयसिंह मोहिते पाटील यांचे सूपुत्र संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा अकलूजमधीलच वॉर्ड क्रमांक ३ मध्ये पराभव झाला. या पराभवामुळे जाणते राजे पुरते घायाळ झाले. यादरम्यान संग्रामसिंह यांच्या पराभवास धैर्यशीलच जबाबदार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. कारण धैर्यशील यांचे बहुसंख्य कार्यकर्ते त्याच वॉर्डातील होते. या पराभवानंतर जयसिंह मोहिते पाटील काही काळ अलिप्तच राहिले. हा पराभव तितका जिव्हारी लागणाराच होता. राजकारणात घायाळ करणारा वार होतो, पण वार करणारा दिसत नाही. समजते तेव्हा वाटते की अरे ही तर आपली माणसं होती. दरम्यान जसजशी माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी चुरस वाढली व माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी मिळाली तेव्हा कुणी मैदानात नाही उतरले तर मी लढणार अशी जयसिंहांनी गर्जना केली. त्यानंतर ‘आमचं ठरलंय, सोलापूर, बारामती, सातारा व माढा या चार ठिकाणी भाजपचे उमेदवार पाडायचेच’ असे वक्तव्य त्यांनी केले. त्याचबरोबर ‘आम्ही तुतारीच वाजविणार, धैर्यशील उभा नाही राहिला तर शेंडीला धरुन उभे करीन आणि रणजितसिंह यांना तिकडेच थांबायचे असेल तर निवडणुका होईपर्यंत आम्ही त्याला वाळीत टाकतोय, आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही’ असे त्यांनी वक्तव्य केले होते. वास्तविक पाहता भाजपाच्या विरोधातील जयसिंहांची ही वक्तव्ये रणजितसिंह व धैर्यशील यांना अडचणीत आणणारीच आहेत. राजकारणात डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी लागते. कुठलाही निर्णय आततायीपणे घेऊन चालत नाही, नाहीतर अडचणीत वाढ होण्याचीच शक्यता असते. एकूणच यादरम्यान धैर्यशील यांना बळीचा बकरा बनविल्याचेही काहीजणांतून बोलले जात आहे. संग्रामसिंह यांच्या डोक्यात कुणाबद्दलही आकस नसतो. अकलूज ग्रामपंचायतचे सरपंच झाल्यानंतर त्यांनी आपला, परका न बघता सर्वांचीच कामे केली. मात्र जयसिंहांचं हे नाणं धैर्यशील यांच्या छत्रछायेखाली झाकोळलं जाऊ लागलं. जाणता राजा म्हणून ओळख असलेल्या जयसिंह मोहिते पाटील यांचे सूपुत्र संग्रामसिंह यांना राजकीय संधी मिळत नाही, तसेच अकलूजमधील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये आपल्याच लोकांनी घात करुन संग्रामसिंह यांचा पराभव केल्याची जयसिंह यांना दाट शक्यता वाटत असल्याने माढा लोकसभा मतदारसंघाच्या रणांगणात धैर्यशील यांचा गेम करण्यासाठीच जयसिंह मोहिते पाटील सक्रीय झाल्याचे अकलूज व परिसरातील राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.