प्रकाश आंबेडकर यांचा नेमका कृती कार्यक्रम काय?
अपेक्षेप्रमाणे वंचित बहुजन आघाडीने शेवटी महाविकास आघाडीसोबत युती केलीच नाही आणि पुन्हा एकदा एकला चलो रे चा नारा देत भाजपचा रस्ता सुकर केला.आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलो नाही म्हणजे आम्ही बी टीम कसे काय किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून देण्यासाठीच आम्ही आमची मत वापरायची का ? आम्ही आमचं स्वतंत्र राजकारण उभं करायचं नाही का ? असे काही मुद्दे वंचितकडून पुढे करण्यात आले.
मी काही दिवसांपूर्वी एक लेख लिहिल्यानंतर त्यावर अनेक बुद्धिजीवी वर्गाकडून प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी मला फोन करून फार चांगले अभिप्राय कळवले. काहींनी ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. मात्र हे विशेष आहे की 2019 च्या तुलनेत नेमकं आता प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कारण समाज हळूहळू जागृत होत आहे.
1980 नंतर युती, आघाड्या प्रादेशिक पक्षांचे वाढते महत्त्व हे भारतीय राजकारणाचे एक व्यवछेदक लक्षण झाले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असणारी काँग्रेस असो की संसदेमध्ये पहिल्यांदाच लोकसभेत 300 पेक्षा जास्त राज्यसभेत 100 पेक्षा जास्त जागा मिळवणारी भाजपा असो प्रत्येक पक्षाने जास्तीत जास्त इतर घटक पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. वंचितकडे हा कुठला ओव्हर कॉन्फिडन्स आहे की ज्यामुळे वंचित युती नाकारते?
प्रकाश आंबेडकरांवर महाविकास आघाडीने खरंच अन्याय केला का?
प्रकाश आंबेडकर असे म्हणतात की पाच जागा पुरेशा नव्हत्या. पाच जागा म्हणजे आमच्या मताचा अपमान आहे. श्री अजित पवार हे राज्याचे तीन वेळा उपमुख्यमंत्री, अनेकवेळा अर्थमंत्री, जलसंपदामंत्री आणि महाराष्ट्रातली महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. अनेक महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायत, बाजार समिती, सहकारी बँका, दूध संघ, पणन संघ, साखर संकुल, साखर कारखाने, डाळ मिल, फळ प्रक्रियात्मक उद्योग, मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज, अनेक शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, तरीही भाजपाने त्यांना पाच जागा दिल्या. अन अजित पवार पाच जागांना जिंकून आणण्यासाठी पाच लोकसभांवर लक्ष केंद्रित करून तयारीलाही लागले. मग अजित पवारांसारखी कुठेही सत्ता नसताना वंचितला पाच जागा देणे हा प्रकाश आंबेडकरांचा अपमान कि सन्मान?
प्रकाश आंबेडकर म्हणतात की, निवडून आल्यानंतर तुमचे लोक भाजपमध्ये जाणार नाहीत हे आम्हाला आधी लिहून द्या. पण असे खरेच कोणाच्या पोटात काय शिजत असेल ते सांगता येते का? स्वतः प्रकाश आंबेडकर तरी अशी खात्री देऊ शकतात का? 2019 ला त्यांच्यासोबत असणारे गोपीचंद पडळकर जे निवडणुकीत बिरोबाची शपथ घेत होते ते नंतर भाजपात गेले. यावर प्रकाश आंबेडकरांना काय बोलायचे आहे? एका आंबेडकरी चळवळीतल्या राहुल प्रधान नाकारून यशपाल भिंगे यांना उमेदवारी दिली ते भिंगे पुढे राष्ट्रवादीकडे गेले. लक्ष्मण माने राष्ट्रवादीकडे गेले. जपानी गेले. डझनभर लोक भाजपकडे गेले. प्रकाश आंबेडकर यांना तेव्हा या लोकांबद्दल खात्री होती का? आत्ता प्रकाश आंबेडकरांनी ज्यांना ज्यांना उमेदवारी दिली ती लोक तरी प्रकाश आंबेडकरांच्या सोबत कायमस्वरूपी राहतील याची खात्री प्रकाश आंबेडकर लेखी देऊ शकतात का?
प्रकाश आंबेडकर म्हणतात की आम्ही भाजपवर सगळ्यात जास्त टीका करतो.
प्रकाश आंबेडकर भाजपवर टीका करतात हे खरे आहे. परंतु त्यांनी उभ्या केलेल्या उमेदवाराचा फायदा हा भाजपलाच होतो असे आजपर्यंतचे चित्र का आहे? प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात भाजपचा एकही माणूस कधीही बोलताना दिसत नाही. देवेंद्र फडणवीस, अगदी अशोक चव्हाण, राज ठाकरे, नारायण राणे या सगळ्यांबद्दल बोललेले दिसतात. मात्र प्रकाश आंबेडकरांबद्दल देवेंद्र फडणवीस काय भाजपचा कुठलाही नेता चकार शब्दाने बोलताना दिसला नाही. ये रिश्ता क्या कहलाता है?
प्रकाश आंबेडकर असे म्हणतात की शरद पवार हा बेभरवशाचा माणूस आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. मग असा बेभरवशाचा माणूस नेमकं त्यांच्याच मुलीला म्हणजे शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांना बारामतीतून न मागता पाठिंबा देण्याचं कारण काय? याउलट महाराष्ट्रातल्या ज्या अनेक राखीव जागा आहेत, जिथून बाबासाहेबांना अपेक्षित असणारा खऱ्या अर्थाने दबलेला, पिचलेल्या वंचित पीडित समाजातून आलेले उमेदवार उभे राहिले आहेत, तिथे प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा का नाही दिला?
सगळ्यात महत्त्वाचे वंचित बहुजन आघाडीची ट्रोल करणारी गॅंग ही 15 ते 20 वर्षे वयोगटातली आहे. ज्यांना चळवळ कशाशी खातात ते माहित नाही. प्रकाश आंबेडकर भाजपवर टीका करतात खरे पण त्यांची ट्रोल गँग ही भाजपच्या ध्येयधोरणांवर बोलण्यापेक्षा काँग्रेसचे उमेदवार आम्हाला पाडायचे आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार आम्हाला पाडायचे आहेत हे लिहिण्याबोलण्यातच आपली सगळी शक्ती खर्च का करते?
मनोज जरांगे यांना उमेदवारी द्यावी यासाठी प्रकाश आंबेडकर आग्रही असतात. मात्र आपल्याच समविचारी असणाऱ्या बहुजन समाज पार्टीला ते अजिबात बोलायला तयार होत नाहीत असे का? बहुजन समाज पार्टी वंचित शोषितांचे प्रतिनिधित्व करते हे प्रकाश आंबेडकर यांना वेगळे सांगायला हवे का?
प्रकाश आंबेडकरांनी आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना उमेदवारी दिली त्यात खरेच वंचित किती ? बाबासाहेबांनी जात निर्मूलनाची चळवळ सांगितली आणि प्रकाश आंबेडकर उमेदवारांच्या नावापुढे धडाधड जाती लिहितात. हा बाबासाहेबांच्या विचारांचा पराभव करण्याचा प्रकार नव्हे का ?
औरंगाबाद असेल किंवा पुणे असेल वर्षानुवर्षे प्रकाश आंबेडकरांसोबत अत्यंत निष्ठेने काम करणारे लोक ऐनवेळेला बाजूला सारले जातात. आणि पत्त्यांचा क्लब चालवणारे दारूचे गुत्ते चालवणारे, दोन नंबरच्या धंद्यातली माणसं पुढे आणली जातात. प्रस्थापित समूहातल्या वसंत मोरेंना उमेदवारी देण्यापेक्षा निष्ठेने काम करणारा आणि खऱ्या अर्थाने शोषितांच्या प्रश्नांसाठी उभे राहणारे वसंत साळवे यांना उमेदवारी प्रकाश आंबेडकरांनी का नाकारली असेल?
शरद पवार म्हणजे विश्वासघातकी संस्थानिक, सरंजामी , कपटी अशी व्याख्या प्रकाश आंबेडकर यांची. त्याच प्रस्थापित सरंजामी शरद पवारांच्या कन्येला प्रकाश आंबेडकर पाठिंबा देतात मात्र राखीव जागेतून संघर्ष करणाऱ्या प्रणिती शिंदेच्या विरोधात उमेदवार देतात हे गौडबंगाल काय आहे ?
अमरावतीमध्ये बोगस जात प्रमाणपत्र घेऊन खऱ्या वंचितांचे अधिकार लाटणाऱ्या नवनीत राणांना हरवण्यासाठी अमरावतीत पाठिंबा दिला जात नाही. मात्र नागपूरमध्ये नितीन गडकरींना हरवण्यासाठी पाठिंबा दिला जातो. म्हणजे नितीन गडकरी हे वर्तमान भाजपाला नको आहेत. भाजपचा तोच अजेंडा राबवण्यासाठी म्हणून पाठिंबा दिला जातो का?
प्रकाश आंबेडकर वंचित प्रतिनिधीत्वाबद्दल बोलत असतात.पण लोणारी समाजातून येणाऱ्या रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात मराठा उमेदवार दिलाय. ज्या लोणारी समाजाचे राजकारणात नगण्य प्रतिनिधित्व आहे, अशा समाजातील व्यक्तीला काँग्रेसने विधानसभेत संधी दिली.वसंत मोरेला कुणाचे मतदान खायला उभे केले गेलंय, हे सांगायला कुण्या राजकीय पंडिताची गरज नाही.
गेल्या सहा महिन्यांमध्ये प्रकाश आंबेडकरांनी जे वेगवेगळे स्टेटमेंट करत नागमोडी वळणं घेतली. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी पक्ष म्हणून आणि पक्षाचा कृती कार्यक्रम म्हणून कोणती धोरण लोकांसमोर मांडली?
एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेवर सत्ता मिळवणे शक्य होते. पण दुसरीकडे फुले, शाहू, आंबेडकर महाराष्ट्रात जन्मून सुद्धा महाराष्ट्रात अशी सत्ता काबीज करता येत नाही. याला कारण प्रकाश आंबेडकरांच्या सारखे सेटिंग आणि डीलिंगचं राजकारण करणारे नेते तर नव्हेत ना?
पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या वेळेला पांचाळ सारख्या एका अत्यंत गल्लाभरू माणसाला मराठवाड्यातून उमेदवारी दिली. तेव्हा वंचित बहुजन आघाडीकडे मराठवाड्यातून कित्येक लायक उमेदवार लढण्यास इच्छुक असतानाही पांचाळला उमेदवारी का दिली गेली ?
लिहिण्यासारखे अनेक मुद्दे आहेत, पण एक शेवटचा प्रश्न आंबेडकरांच्या सोबत एखादी निवडणूक लढलेला माणूस पुन्हा दुसऱ्यांदा का दिसत नाही? धनराज वंजारी सारख्या आरएसएसचा अर्क असणारा माणूस 2019 ला वंचित सोबत कसा काय दिसला?
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला शिव्या देण्याच्या व्यतिरिक्त आणि हा मूर्ख आहे तो अतिशहाणा आहे, तो सरंजामी आहे अशी विधानं करण्यापलीकडे वंचित, शोषित, पीडित, दबलेल्या समूहाला आर्थिक आणि सामाजिक उन्नतीच्या दिशेने नेण्यासाठी गेल्या पाच दहा वर्षात प्रकाश आंबेडकरांनी असा कोणता धोरणात्मक अर्थिक कृती कार्यक्रम राबवला आहे?
_ अश्वजीत भातकुले , अमरावती