४२० चे चौदा गुन्हे दाखल असलेल्या मोहिते पाटलांना खासदारकी कशासाठी?
माजी उपमुख्यमत्री विजयसिंह मोहिते पाटील हे वयाच्या ३५ व्या वर्षी मंत्रीपदावर विराजमान झाले होते. तर त्यांचे चिरंजीव आमदार रणजितसिंह यांना ५४ वर्षे झाली तरी मंत्रीपद प्राप्त करता आलेले नाही. रणजितसिंह आता युवानेते नव्हे तर वयानुसार जेष्ठ नेत्यांमध्ये गणले जातात. जेष्ठ नागरिक होण्याकडे त्यांची वाटचाल आहे. शिवरत्नचा राजकीय आलेख ढासळत चालला आहे. त्यामुळे रणजितसिंह यांनी आपल्या प्रतिमेत सुधारणा केली पाहिजे. शिवरत्नवरील लोकप्रियतेत एक नंबरला शिवबाबा, दोन नंबरला धैर्यशील आणि तीन नंबरला रणजितसिंहांचा नंबर लागतो हा बंडखोरच्या टिमने केलेला सर्व्हे आहे.
माढा (बंडखोर वृत्तसेवा): आपले कार्यक्षेत्र असलेल्या माढ्यातील विजय शुगर्सच्या घोटाळ्याचा विषय असो, शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा विषय असो किंवा शेअरहोल्डरचे पेमेंट देण्याचा विषय असो यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची प्रतिमा चांगलीच मलीन झालेली आहे. कलम ४२० नुसार त्यांच्या परिवारातील विविध संस्थांवर १४ गुन्हे दाखल झालेले आहेत. या सर्व प्रकरणात ते दोषीही आढळले आहेत. त्याचबरोबर वित्तीय अनियमितता व अनेक फसवणूक प्रकरणी सुध्दा ते आरोपी असल्याने कठोर कलम एमपीआयडी ॲक्टसारख्या कठोर कायद्यानुसार त्यांचेवर कारवाई झालेली आहे. फसवणुकीच्या प्रकरणांबरोबरच मोहिते पाटील यांचेवर आयपीसीच्या कलमानुसार गुन्हे दाखल झालेले आहेत. मोहिते पाटील परिवारातील काही सदस्यांवर देखील आयपीसी ३०७ सारखे गुन्हे दाखल झालेले आहेत असे एका वृत्त वाहिनीच्या सूत्रानुसार समजते. त्यामुळे आणि त्यांच्या भ्रष्ट प्रतिमेमुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब न केल्याने धैर्यशील मोहिते पाटील बंडखोरीच्या पावित्र्यात असले तरी ४२० चे चौदा गुन्हे दाखल असलेल्या मोहिते पाटलांना खासदारकी कशासाठी? असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाने पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बंडखोरीच्या पावित्र्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात भलतेच वातावरण तापलेले आहे. एका बाजूला भाजपा ४०० पार जिंकण्यासाठी नेटाने कामाला लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला पार्टीत गटबाजीला सुरूवात झाली आहे. या बंडखोरीला शांत करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र मोहिते पाटलांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व मोहिते पाटील विरोधकांनी त्यांचे राजकीय अस्तित्वच संपुष्टात आणल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत कुरघोड्यांना वैतागून, मात्र कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा मुद्दा पुढे करून २०१९ साली रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना साथ देत महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे आणले होते. मात्र भाजपामुळे बळ आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाच्या दलदलीत अडकलेले मोहिते पाटील पुन्हा झेप घेण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु जी व्यक्ती ४२० सारख्या गुन्ह्यांनी घेरलेली असेल त्या व्यक्तीला पक्षश्रेष्ठी कशी उमेदवारी देतील? मोहिते पाटलांची नाराजी ४५ पार या भाजपाच्या नाऱ्याला अडथळे निर्माण करू शकते. म्हणूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढ्यातील या लढाईकडे लक्ष ठेवून आहेत. वास्तविक पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांची प्रतिमा मलीन असताना सुध्दा त्यांना साथच दिली. मग ती शेतकऱ्यांची थकबाकी देण्यासाठी केलेली मदत असो किंवा एनसीडीसीच्या माध्यमातून केलेली मदत असो. मात्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नेहमी आपल्या राजकीय ताकदीचा आणि परिवाराच्या प्रसिध्दीचा गैरफायदाच घेतला आहे. जर पार्टीने यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी दिली तर धैर्यशील मोहिते पाटील आपल्या मलीन प्रतिमेमुळे राजकीय मैदानात टिकू शकतील का? एकीकडे धैर्यशील जीव तोडून खासदारकीसाठी पळत असताना दुसरीकडे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या पाठीमागे खासदारकी चालत येत आहे. हे सर्व कशामुळे? तर माणसं कमविल्यामुळे! माणसांची श्रीमंती जपल्यामुळे! मात्र शिवरत्नच्या भोवती निष्ठावंत माणसांपेक्षा खुशमस्करेच जास्त आहेत. त्यामुळे शिवरत्नने अशा खूशमस्कऱ्यांपासून दूर राहिले पाहिजे. हे खरं आहे की, अकलूज, माळशिरस या परिसरात त्यांची चांगली पकड आहे. त्यांना मानणारे बहुसंख्य कार्यकर्ते देखील आहेत. लोकसभा निवडणूक लढण्यासाठी त्यांच्यावर समर्थकांचा खूप दबाव आहे. परंतु पहिल्यांदा मोहिते पाटलांना आपल्या प्रतिमेला सुधारण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर आपल्या व्यक्तिमत्वालाही उजाळा देणे आवश्यक आहे. तरच ते एक आदर्शवादी नेता बनून पुन्हा एकदा राजकारणार उत्तुंग झेप घेतील असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे. एकदा धैर्यशील स्वतः म्हणाले होते “बंडखोर वाचून मला खूपच शिकायला मिळतं.” लोकसभा निवडणुकीत बेरजेचे राजकारण जानकरला सहजपणे जोडत आहात! मात्र ज्यांनी आपल्यासाठी पूर्वी जीवाचे रान केले त्या माने पाटील आणि देशमुखांनाच शत्रुत्वाची वागणूक कशासाठी? त्यामुळे शिवरत्नवाल्यांनो, आत्मपरीक्षण करा आणि आता तरी सुधरा हीच अपेक्षा!