रामराजे निंबाळकरांचे डोके ठिकाणावर आहे का?
माढा (बंडखोर वृत्तसेवा): रामराजे निंबाळकरांनी फलटण येथे नुकताच कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना कमी मते पडली तर आम्ही जबाबदार नाही असे वक्तव्य करणे म्हणजे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत असेच म्हणावे लागेल. कारण रामराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या घटकपक्षात असताना महायुतीचा राजधर्म न पाळता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने रामराजे निंबाळकर यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न महायुतीतील कार्यकर्त्यांतून विचारला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या टीमने, पक्षनिरीक्षकांनी मुलाखती व कौल घेऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या गळ्यात पुन्हा एकदा माढा लोकसभा उमेदवारीची माळ टाकली आहे. त्यामुळे महायुतीचा राजधर्म पाळणे, पक्षाचा आदेश पाळणे बंधनकारक असताना रामराजे निंबाळकर मोहिते पाटलांच्या शिवरत्नवरील मेळाव्याला हजर राहतात, महायुतीच्या खंडीभर दूधात मीठाचा खडा टाकतात हे रामराजे निंबाळकरांना अशोभनीय तर आहेच. मात्र यामुळे पक्षादेश झुगारल्याप्रकरणी निवडणुकीनंतर त्यांच्यावर कठोर कारवाईही होऊ शकते. पाडापाडीत शिवरत्न सोलापूर जिल्ह्यात एक नंबरला आहे. त्यामुळे त्यांनी सातारा जिल्ह्यात रामराजे निंबाळकरांनाही हाच मंत्र दिला काय? महायुतीचा राजधर्म पाळणे, महायुतीने दिलेला उमेदवार निवडून आणणे हे रामराजे निंबाळकरांचे कर्तव्य आहे, आणि हे कर्तव्य त्यांनी प्रामाणिकपणे बजावलेच पाहिजे! शिवरत्नच्या नादी लागून रामराजे यांनी भविष्यात आपला मार्ग अंधकारमय करून घेऊ नये असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.