दात, नखे व आयाळ नसलेला सिंह बंड काय करणार?
एक सिंह असतो. त्याला एक सुंदरी आवडते. तो तिला म्हणतो तू मला खूप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. आता तो जंगलाचा राजा असल्याने याला नकार द्यावा तर तो खाऊन टाकेल अशी त्या सुंदरीला भीती वाटते. ती काहीवेळ विचार करते आणि मी घरी आई वडिलांना विचारुन सांगते असे म्हणून निघून जाते. मग पुन्हा तिला काय झाले? असे सिंह विचारतो. तेव्हा ती सिंहाला म्हणते माझ्या आई वडिलांचा होकार आहे, पण एक अडचण आहे. मी लग्न करायला तयार आहे, पण मला तुझी नखे टोचतील. ती नखे अगोदर काढून ये. सिंह आपली नखे काढून त्या सुंदरीकडे येतो तेव्हा ती त्याला म्हणते. नखे काढली ते खूप छान झाले, पण तुझे आयाळ खूपच कसेतरी दिसतंय. ते आयाळही काढून ये. तेव्हा सिंह आपले आयाळही काढून येतो. तेव्हा सुंदरी म्हणते, नखे आणि आयाळ काढल्यामुळे खूपच छान दिसायला लागलाय. पण दात खूपच टोकदार आहेत, लग्नानंतर ते मला खूपच टोचतील. त्यामुळे दात काढले तर खूपच छान होईल. अशा पध्दतीने सुंदरीने गोड बोलून सिंहाला आपली नखे, आयाळ व दात काढायला लावले. मात्र जेव्हा तो त्या सुंदरीच्या घरी लग्नासाठी गेला तेव्हा तिच्या आई बापाने व सुंदरीने त्या सिंहाला काठीने मारत हाकलून दिले. वरील गोष्ट ही पूर्णपणे काल्पनिक आहे. मात्र सध्याचे मोहिते पाटलांचे राजकारण पाहता ही त्यांना तंतोतंत लागू पडते. आपल्या अहंकारी वृत्तीमुळे काही वर्षे सत्तेपासून लांब राहिलेल्या मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केला. तेव्हा केवळ कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या मुद्द्यावर भाजपात प्रवेश करीत असल्याचे त्यांनी तुणतुणे वाजवले असले तरी भविष्यात त्यांनी भाजपाकडून काय काय घेतले हे आपल्याला दिसलेच. भाजपाने मोहिते पाटलांना सदाशिवनगरचा कारखाना सुरू करण्यासाठी ११३ कोटी दिले. त्यामुळे कधीही सुरु न होणारा कारखाना सुरु झाला आणि मोहिते पाटलांच्या अर्थकारणाला गती आली. रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली. तर शिवरत्न महाराष्ट्राच्या सत्तेतून पायउतार झाल्यापासून शिवरत्न कंन्स्ट्रक्शनला शासनाकडून मिळणारी कामे थांबली होती. मात्र भाजपाने मोहिते पाटील यांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी शिवरत्न कंन्स्ट्रक्शनला ३५० कोटींची कामे दिली. त्यामुळे सदाशिनगरच्या कारखान्याला ११३ कोटी देणे म्हणजेच दात काढणे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेची आमदारकी देणे म्हणजेच नखे काढणे व शिवरत्न कंन्स्ट्रक्शनला ३५० कोटींचे काम देणे म्हणजेच आयाळ काढणे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण जो स्वतंत्र असतो, तोच व्यवस्थेच्या विरोधात बंड करत असतो. परंतु मोहिते पाटलांनी भाजपाकडून मोठमोठे लाभ घेतल्याने त्यांची अवस्था दात, नखे व आयाळ नसलेल्या सिंहासारखी झाली असून हे सिंह बंड काय करणार? असे वाटल्याशिवाय राहणार नाही.