आरपीआय (आठवले) ला शिर्डी व सोलापूरची जागा न सोडल्यास महाराष्ट्रात वेगळी भूमिका घेणार – किरण धाईंजे
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या पक्षाची महाराष्ट्रात मोठी ताकद आहे. ना. रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार रिपाइंच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देशभर युतीचा धर्म पाळला असून नेहमी पक्षासोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. तरीही भाजपाकडून रिपाइं (आठवले) पक्षाला डावलले जात असल्याने महायुतीने शिर्डी व सोलापूरची जागा रिपाइं (आठवले) ला न सोडल्यास महाराष्ट्रात वेगळी भूमिका घेतली जाईल असा इशारा आरपीआय (आठवले) युवक आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे यांनी दिला आहे.
महायुतीकडून रिपाइं (आठवले) ला जागा सोडण्यास कुचराई केली जात असल्याबद्दल किरण धाईंजे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, रिपाइं (आठवले) ने महायुतीचा घटक पक्ष म्हणून गेली दहा वर्षे काम केले आहे. महायुतीचा धर्म पाळून ना. रामदासजी आठवले प्रामाणिकपणे काम करीत असताना जागावाटपात त्यांना डावलण्याचे काम केले जात आहे. आठवले साहेबांनी शिर्डी व सोलापूर दोन जागांची मागणी केली आहे. मात्र महायुती या जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील रिपाइं (आठवले) चे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन महायुतीने रिपाइं (आठवले) ला शिर्डी व सोलापूरची जागा सोडावी, अन्यथा आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा यावेळी बोलताना किरण धाईंजे यांनी महायुतीला इशारा दिला आहे.