माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला येथील आमदारांच्या उपस्थितीमध्ये ठरली रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाची रणनीती
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, महायुतीचे घटक पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांची मोट बांधणार
- आ. जयकुमार गोरे
माढा (बंडखोर वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून भारतीय जनता पार्टीचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज दिवसभर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात जाऊन अनेक मान्यवरांच्या भेटींसह भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. माण-खटाव, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला येथील आमदारांच्या उपस्थितीमध्ये रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाची रणनीती ठरविण्यात आली.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी आज सकाळपासूनच भेटीगाठी सुरू केल्या. आज सकाळी मांडवे येथे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे एक तास चर्चा झाल्यानंतर आमदार रामभाऊ सातपुते म्हणाले की, मागील पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त लीड मिळेल. माढा लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी हेच आमचे उमेदवार समजून ‘अब की बार चार सौ पार’ हे लक्ष असून माढा लोकसभा मतदार संघातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील अशी ग्वाही दिली.
त्यानंतर माळशिरस येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोषी घोषणा दिल्या. माळशिरस येथे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख व किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांची भेट घेण्यात आली. आप्पासाहेब देशमुख म्हणाले, माळशिरसचा पश्चिम भाग विकासापासून वंचित राहिला होता, त्याला खासदारांनी निधी दिला. नीरा देवधर योजनेमध्ये 22 गावे समाविष्ट केल्याने पाण्याचा प्रश्न मिटला.
माळीनगर येथे माळीनगर शुगर वर्क्सचे चेअरमन रंजनभाऊ गिरमे यांच्या निवासस्थानी सर्व संचालक व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाचा निर्धार करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीचे केंद्रबिंदू असलेले निमगाव येथे आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन घेऊन निवणुकीची रणनीती आखण्याचे ठरले. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे व युवा नेते रणजितभैय्या शिंदे यांनी सांगितले की, माढा व करमाळा तालुक्यातील जनता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या पाणी, रेल्वे व रस्ते या कामावर समाधानी असून महायुतीचा धर्म पाळून हे दोन्ही तालुके खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाचे शिल्पकार ठरतील अशी ग्वाही दिली.
त्यांनतर माढा येथे शहराचे नेते राजाभाऊ चौरे यांच्या निवासस्थानी भेट घेण्यात आली. चौरे यांनी माढा शहरातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर मा.आमदार धनाजी साठे यांच्या निवासस्थानी नगराध्यक्षा मीनलताई साठे यांची भेट घेतली. यावेळी मीनलताई साठे म्हणाल्या, खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा नगरपंचायतीसाठी राजकीय गट तट न पाहता कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे भविष्यात व येणाऱ्या निवडणुकीत आमचे कार्यकर्ते खा. नाईकनिंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असे आश्वासन दिले.
सांगोला येथे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दुष्काळी भागाच्या सर्व पाणी योजना पूर्ण केल्या. नीरा देवधर, टेंभू, म्हैसाळ, बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या योजनांना निधी उपलब्ध करून दिल्याने दुष्काळ कायमस्वरूपी निकाली निघाला. खासदारांच्या प्रयत्नाने सांगोला तालुक्यात रस्त्यांचीही अनेक कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनताही महायुतीच्याच पाठीशी ठामपणे उभी राहील असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आमदार दीपकआबा साळुंखे यांची भेट घेतली. अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे प्रामाणिकपणे काम करतील असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
या दौऱ्यामध्ये भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, लतिफ तांबोळी यांचेसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
