सत्तेसाठी वाट्टेल ते करताना आ. रणजितसिंह व धैर्यशील यांनी राजकारणातील सभ्यता संपवू नये!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पक्ष निरीक्षकांनी केलेली निवड लोकशाही प्रणालीनुसार बहुमताने केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीमने केलेल्या सर्व्हेक्षणात विद्यमान खासदारांना अव्वल स्थान मिळाले आहे. म्हणूनच भाजपाने माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केलेली असताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून सत्तेसाठी दबावतंत्राचे राजकारण केले जात आहे. मात्र सत्तेसाठी वाट्टेल ते करताना रणजितसिंह व धैर्यशील यांनी राजकारणातील सभ्यता संपवू नये असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.
भारत देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्यपाल यांना मोदींची भेट घेण्यासाठी रांगेत थांबावे लागायचे. मात्र माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ६० वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेटींगशिवाय भेट घेतलेली आहे. “किंग ऑफ माढा” म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी हस्तांदोलने केलेली आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी काय हवं आहे? अशी त्यांनी आस्थेने खासदार निंबाळकरांना अनेकवेळा विचारपूस केली आहे. भारत देशाचे सर्वोच्च नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या खासदारांना माढा तालुक्याचा राजा संबोधतात, गौरवोद्गार काढतात, तर दुसऱ्या बाजूला धैर्य़शील मोहिते पाटलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची प्रचंड बदनामी केली. मात्र आ. रणजितसिंह आणि धैर्यशील यांच्यामध्ये भाजपाला चॅलेंज देऊन त्यांच्याविरोधात जाण्याचे एवढे धाडस असेल असे आम्हाला वाटत नाही. आम्ही यापूर्वी सातत्याने लिहीत होतो की, भविष्यात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करण्याची जबाबदारी तुमच्यावर आली तर तुमची अत्यंत केविलवाणी स्थिती होईल. तरीही मोहिते पाटील व त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या विरोधात सतत सोशल मीडियावर पोस्ट टाकण्याचेच काम केले.
धैर्यशील मोहिते पाटलांनी माढा लोकसभा मतदारसंघात दमछाक होईपर्यंत केलेली धावपळ, भपकेबाजपणा, दिखाऊपणा आणि भाजपा पक्षश्रेष्ठींवर अप्रत्यक्ष आणलेला दबाव निरर्थक ठरला. धैर्यशील यांनी माढा मतदारसंघात जे केले ते फक्त एक, “पोरखेळ” म्हणूनच ओळखला जाईल. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चारवेळा अगोदरच सांगितले होते की, माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच असतील. महाराष्ट्रातील भाजपाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रतिप्रश्न विचारला होता, “खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी नाकारण्याचे कारण काय?” धैर्यशील यांनी भाजपाबद्दल जे काही केले ते फक्त माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे बघून भाजपाश्रेष्ठींनी सहन केले आहे. त्यामुळे आता धैर्यशील यांनी आत्मपरीक्षण करून दूध पोळल्यावर ताक सुध्दा फुंकून प्यावे. दरम्यान आ. रणजितसिंह व धैर्यशील भाजपा सोडून कुठेही जात नसतात, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांशी जमवून घेऊन ते पुन्हा एकदिलाने काम करतील असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.