धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी भाजपाने का नाकारली?
माढा (बंडखोर वृत्तसेवा): लोकशाही प्रणालीत बहुमत मोजले जाते. मात्र केंद्रीय राजकारणात नवखे असणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटलांना भाजपाची शिस्त माहितच नव्हती. माढा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभेचे आमदार आहेत. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, माळशिरसचे आमदार राम सातपुते या सर्वांनीच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी भक्कमपणे बाजू मांडली होती. १४० पदाधिकाऱ्यांपैकी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या बाजूने कौल दिला. मात्र धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींवर शक्तीप्रदर्शन करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. तसेच सोशल मीडियाद्वारे खासदार रणजितसिंह निंबाळकरांची प्रतिमा मलिन करताना पक्षविरोधी कारवाया सुध्दा केल्या होत्या. त्यामुळेच भाजपाने धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी नाकारली असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.
भाजपाचे पक्षनिरीक्षक म्हणून माढा लोकसभा मतदारसंघात अर्थराज्यमंत्री भागवत कराड व आमदार प्रसाद लाड आले होते. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातील १४० पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यादरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व आमदार सोशल मीडियाद्वारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीशी, सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी, मात्र बिचारे धैर्यशील मोहिते पाटील एकाकी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची निवड जाहीर झाली ती लोकशाही तत्व आणि विचारांना प्राधान्य देऊनच. तसेच त्यांच्या संघटन कौशल्य व कार्यकर्तृत्वामुळेच! त्यामुळे संघटन कसे करायचे याचा आदर्श शिवरत्नने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेकडून घेतला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रचंड विश्वास संपादन करून जिव्हाळ्याचे संबंध ठेवून प्रत्येकांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आपलेसे केले होते. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या खास मर्जीतील माणूस म्हणून दिल्ली दरबारात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची ओळख आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी माढा मतदारसंघात एक लाख कोटींच्या विकासकामांचा डोंगर उभा केला. निरा देवधर प्रकल्प, सांगोला उपसा सिंचन योजना, कृष्णा फ्लड डायवर्जन योजना, मुंबई-हैद्राबाद बुलेट ट्रेन, फलटण-पंढरपूर रेल्वे, खैराव मानेगाव उपसा सिंचन योजना, महाबळेश्वराच्या पायथ्याशी नव्या धरणाची निर्मिती पालखी महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग या माध्यमातून पाणी, रस्ते आणि रेल्वे या तिन्ही क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केल्यामुळे देशातील आठव्या क्रमांकाचे खासदार असताना धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची प्रतिमा मलिन केली होती. कारखान्याच्या चिटबॉयमार्फत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार बबनराव शिंदे यांच्या गाडीसमोर गाजरांचा वर्षाव करण्यात आला. मात्र भाजपाश्रेष्ठींनी धैर्यशील मोहिते पाटलांनाच शेवटी गाजर दाखविले. धैर्यशील मोहिते पाटील हे खुनशी स्वभावाचे आहेत याची प्रचिती माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते पाटील विरोधकांना चांगलीच आली आहे. तसेच अकलूजमधील विरोधकांशी ते कशा पध्दतीने वागले आहेत हे सुध्दा सोलापूर जिल्ह्याने पाहिले आहे. म्हणूनच सर्वांनी मिळून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतलेला दिसून येतो. माढा मतदारसंघात ९०० गावे आहेत. मात्र याचा कधीही विचार न करता ते अकलूजलाच समुद्र समजत आहेत. वास्तविक पाहता माळशिरस तालुक्यात असणारे २५०० कॉन्ट्रॅक्टर्स आणि प्लॉट मेकर्स यांचे अर्थकारण शिवरत्नभोवती आहे. त्यामुळे शिवरत्नने शांतपणे विचार केला तर मोदी-शहा-नड्डा यांची ताकद वापरून त्यांना भविष्यात पुन्हा झेप घेता येईल. मात्र भाजपाची साथ सोडणे भविष्याच्या दृष्टीने शिवरत्नला निश्चित परवडणारे नाही. एवढे जरी शिवरत्नला समजले तरी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे हात भक्कम करतील आणि पक्षासाठी झोकून देऊन काम करतील अशी आशा जाणकारांना वाटत आहे.