लढवय्या उत्तमराव जानकरांना लोकसभेसाठी प्रचंड प्रतिसाद
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): शिवरत्नच्या मोहिते पाटलांनी उत्तमराव जानकर यांच्यावर सूडबुध्दीने 35 पेक्षा जास्त पोलिस केसेस दाखल करून पदाचा गैरवापर करीत त्यांचे नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न केला. परंतु झोतभट्टीत तापून तापून लोखंडाचं पोलाद होतं, तसं हे पोलादी नेतृत्व मोहिते पाटलांच्या अन्याय अत्याचारातूनच निर्माण झालं. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी असलेली घनिष्ट मैत्री आणि प्रत्येक संकटात धावून येणारे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासारख्या मित्रांच्या साथीने बेरजेचे राजकारण खेळणारे उत्तमराव जानकर हे निष्णांत, धुरंदर राजकारणपटू आहेत. अशा या लढवय्या, धाडसी नेतृत्वाला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दिल्लीला पाठविण्याचे मनसुबे भाजपाश्रेष्ठींनी आखल्याने उत्तमराव जानकर यांच्या या उमेदवारीला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
स्व. प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटलांनी जाहीर कार्यक्रमात जानकरांबद्दल बोलताना “उत्तमराव जानकरांनी माळशिरस तालुक्यात उत्तम क्रांती केली” असे म्हटले होते. ना. राधाकृष्ण विखे पाटील गरूड बंगल्यावर जाऊन त्यांच्या विकासकार्याची दखल घेतात. तर आमदार गोपीचंद पडळकरांचे उत्तमराव जानकर काळीज आहेत. तसेच ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा माळशिरस तालुक्याच्या राजकारणातील हुकमी एक्का आहेत. गेल्या ३०-३५ वर्षांपासून प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटून उत्तमराव जानकर यांनी माळशिरस तालुक्यात सत्तापरिवर्तनासाठी लढा उभा केला. यासाठी सहकार क्षेत्रही काबिज करण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्ताधारी मोहिते पाटलांनी त्यांचा प्रत्येक डाव हाणून पाडला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एक लाखापेक्षा जास्त मतं मिळाल्याने उत्तमराव जानकरांना आमदारकीने थोडक्यात हुलकावणी दिली. उत्तमराव जानकर यांची राजकीय कारकीर्दच भाजपामधून सुरू झाली आहे. मात्र माळशिरस तालुक्यातील सत्ताधारी मोहिते पाटलांना प्रखरपणे विरोध करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पक्षांचा आधार घ्यावा लागला. पक्ष कुठलाही असो, मोहिते पाटील विरोधक हाच आपला मित्र याप्रमाणे उत्तमराव जानकर यांनी आजपर्यंत राजकारण केले आहे. कारण सत्ता परिवर्तन करून दबलेल्या, पिचलेल्या, शोषित, पीडितांना मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करणे हाच त्यांचा उद्देश आहे. उत्तमराव जानकर यांनी जिद्द आणि चिकाटीने सत्ताधारी मोहिते पाटलांच्या विरोधात लढा देत माळशिरस तालुक्यात विरोधकांमध्ये लढण्याची उमेद निर्माण करून त्यांना भयमुक्त केले आहे. त्यामुळे अनेकजण त्यांच्यावरील अन्याय अत्याचाराबद्दल बोलू लागले आहेत. मात्र सत्तेच्या जोरावर आजही मोहिते पाटील यांचेकडून विरोधकांवर सूडनाट्य सुरूच आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील विरोधकांना आपले सहकारी म्हणून बळ दिल्याने काही प्रमाणात याला लगाम बसला आहे. विरोधकांचे अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. धाडसी आणि स्वतंत्र विचारसरणीचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून उत्तमराव जानकर यांचे भाजपाश्रेष्ठींशी चांगले संबंध निर्माण झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी सुध्दा त्यांचे अगदी जवळचे संबंध आहेत. म्हणूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांना सोलापूरातून दिल्लीला पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपाच्या गोटातून बोलले जात आहे. दरम्यान मोहिते पाटील आपल्या विरोधकांशी सूडबुद्धीचे राजकारण कसे करतात? हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही चांगलेच लक्षात आलेले आहे. वास्तविक पाहता भाजपामध्ये प्रस्थापितांची घराणेशाही व दबावतंत्राचे राजकारण चालत नाही. भाजपाने अनेक लढवय्या नेतृत्वाला काम करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. यापूर्वीच भाजपाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते पाटलांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर लढवय्या उत्तमराव जानकरांनाही सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दिल्लीला पाठविण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याने सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील विरोधकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे माळशिरस तालुक्यातील हुकूमशाही, दमनशाही मोडीत निघेल अशी अपेक्षा करून त्यांच्या उमेदवारीला सोलापूर जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अब्राहम लिंंकन सुरूवातीला अठरा वेळा निवडणूक हरले होते. मात्र एक दिवस लिंकन जिंकून व्हाईट हाऊसमध्ये गेले, त्याप्रमाणे एक दिवस माळशिरस तालुक्यातील हा सूपुत्र भारतीय संसदेत निश्चितच जाईल अशी तालुक्याच्या जनतेला आशा वाटत आहे.