शिवकिर्ती युवा मंचच्या धार्मिक सहलीत सुध्दा राजकारण
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नुकतीच दोन दिवसांची अष्टविनायक यात्रा अकलूजमधील ७५ महिलांसाठी आयोजित केली होती. मात्र यादी तयार करताना विरोधी पक्षातील माणसांच्या घरांना जाणीवपूर्वक डावलणे, हा जवळचा हा लांबचा असा भेदाभेद करणे असे प्रकार घडल्यामुळे धार्मिक सहलीत हे राजकारण कशासाठी? असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडल्याशिवाय राहत नाही.
गाय गवत खाऊन दूध देते, तर साप दूध पिऊन विष देतो. त्याप्रमाणे विषारी नागासारखे फुत्कार करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना शिवरत्नने वेळीच समज दिली पाहिजे. एकवेळ अकलूजकरांनी अकलूज ग्रामपंचायत बिनविरोध केली होती याची जाण आणि भान शिवरत्नच्या मोहिते पाटलांनी ठेवून प्रत्येक अकलूजकरांना समान लेखले पाहिजे. यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते महादेव कावळे यांनी अक्कलकोट, गाणगापूर धार्मिक सहलीत सर्व अकलूजकरांना कुठलाही भेदाभेद न करता सामावून घेतले होते. आज महादेव कावळे यांचे नाव अकलूजमधील सर्व माता भगिनी आदराने घेतात. भावी नगराध्यक्ष म्हणून आज अकलूजकर महादेव कावळे यांच्याकडे पाहतात. हा आदर्श शिवकिर्ती युवा मंचने समोर ठेवला पाहिजे. ईश्वराच्या दारातून आत जाताना राजकारणाचे जोडे बाहेर ठेवतात, तीच माणसे ईश्वराला आवडतात. शिवरत्नवाले कदाचित पैशाने श्रीमंत असले तरी गावात सामाजिक कार्य करताना त्याला राजकारणाची किनार असू नये एवढीच अपेक्षा! आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शिवरत्नने घरटी एक महिला सांगितले होते. पण चमचेगिरी करणाऱ्या उतावीळ कार्यकर्त्यांनी हा नियम पाळला नाही. एकाच घरातील एकापेक्षा जास्त सदस्य घेतल्यामुळे अकलूजमधील महिला वर्गात नाराजीचा सूर दिसून येत आहे.