श्री शंकर कारखान्याचे चेअरमनपद म्हणजे पडक्या वाड्याची पाटीलकी!
बाळदादा म्हणतात, लोकसभा कुणी नाही लढले तर मी लढणार, आणि धैर्यशील मोहिते पाटील खासदारकीसाठी लंगोट बांधून शड्डू ठोकून तयारच आहेत. त्यामुळेच माळशिरस तालुक्याच्या जनतेत वैचारिक गोंधळ निर्माण झाला आहे, लोकसभेला बाळदादा की धैर्यशीलभैय्या ? काका की पुतण्या ? समजा शरद पवारांच्या तुतारीवर लढायचे असेल तर पवारांची पहिली पसंती रणजितसिंह मोहिते पाटलांना असल्याचे आतल्या गोटातून समजते, विकास होतो तो सत्तेत सहभागी असलेल्या पक्षामुळेच, त्यामुळे तुतारी निवडून जरी आली तरी विकासाचा सूर बेसूर होणार हे नक्कीच! सर्वात महत्त्वाचे माढा मतदार संघाकडे एका अफाट राजकीय इच्छाशक्तीचे जबरदस्त बारीक लक्ष आहे ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे. रासपचे महादेवराव जानकर छगन भुजबळांच्या माध्यमातून आपले तिकीट निश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपश्रेष्ठींच्या पसंतीस पहिल्या क्रमांकाच्या दिशेनं घोडदौड करीत आहेत, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, महादेवराव जानकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यानंतरच धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव वरिष्ठ राजकीय गोटात घेतले जाते. येणाऱ्या चार दिवसांत यादी जाहिर होईलच. तेव्हा कोण किती पाण्यात ? हे माढा मतदारसंघ पाहणार आहे.
नातेपुते (बंडखोर वृत्तसेवा): माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटलांनी सदाशिवनगर येथील श्री शंकर साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. ही निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम असेल असे जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादांनी वक्तव्य केले होते. या कारखान्याच्या दोन जागांची निवडणूक लागल्यानंतर त्या जागा जिंकताच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना माढा लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी “माळशिरस तालुक्यातील कुठलीही निवडणूक असली की बाळदादांचा अंतिम शब्द असतो. ही लिट्मस टेस्ट आहे, आता वार्षिक परीक्षा येईल तेव्हा सगळे कार्यकर्ते कसे करायचे आणि काय करायचे ते ठरविणार आहेत.” असे वक्तव्य केले. वास्तविक पाहता सदाशिवनगर येथील श्री शंकर साखर कारखान्यावर ३७० कोटीच्या आसपास कर्ज आहे. आणि या कारखान्याचे पाच ते साडेपाच हजार मतदान आहे. त्यामुळे श्री शंकर कारखान्याचे चेअरमनपद पुन्हा एकदा मोहिते पाटील यांच्याकडे येऊन याठिकाणी मोहिते पाटलांनी निर्विवाद वर्चस्व राखले असले तरी सदाशिवनगर येथील श्री शंकर कारखान्याचे चेअरमनपद म्हणजे पडक्या वाड्याची पाटीलकी आहे असे सहकार क्षेत्रातील जाणकार लोकांतून म्हटले जात आहे.
श्री शंकर कारखान्याच्या पार पडलेल्या निवडणुकीत पाच ते साडेपाच हजार मतदानांपैकी फक्त ६५.६३ टक्के मतदान झालेले आहे. या कारखान्यावर यापूर्वीच २५० कोटी रूपये कर्ज होते. त्यानंतर बंद पडलेला हा कारखाना सुरू करण्यासाठी भाजपाने ११३ कोटी रूपयांचे कर्ज दिले. त्याचे आजपर्यंतचे व्याजासह जवळपास ४०० कोटीच्या आसपास आकडा गेलेला आहे. सदाशिवनगरचा हा कारखाना चारवेळा विक्रीला काढला तरी मुद्दल आणि व्याज फिटणार नाही. हा कारखाना म्हणजे एकप्रकारे छिद्र पडलेली नौकाच आहे. माळशिरस तालुक्यातील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर व श्रीपूर येथील कर्मवीर सुधाकरपंत पांडुरंग सहकारी साखर कारखाना या दोन्ही कारखान्यांचे नाव महाराष्ट्रात आदराने घेतले जाते. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापन व नियोजनाचा आदर्श विद्यमान चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घ्यायला काहीही हरकत नाही. कारण स्थावर मालमत्तेपेक्षा कारखान्यावर असणारे कर्जच जास्त आहे. त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकच रस दाखवत नाहीत.
या कारखान्याच्या प्रचाराचा नारळ फोडताना जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा म्हणाले होते की, लोकसभा निवडणूक कुणी लढले नाही तर मी लढणार! वास्तविक पाहता अकलूज ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एका वॉर्डात बाळदादांचे सूपुत्र संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढविल्यानंतर त्याठिकाणी त्यांचा पराभव होतो. आणि आपल्या मुलाला आपल्या गावात अकलूजमध्ये निवडून आणू न शकणाऱ्या बाळदादांनी लोकसभा निवडणूक लढण्याचे वक्तव्य करणे म्हणजे यासारखा विनोद नाही. माढा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यामध्ये ९०० गावे आहेत. मग आपल्याच गावात तुम्ही अपयशी ठरलेले असताना माढा लोकसभा मतदारसंघात तुमचा निभाव कसा लागेल?
केंद्र आणि राज्य सरकार यांचेकडून मोहिते पाटलांना मिळालेला निधी, त्यातून शिवरत्न कंस्ट्रक्शनला मिळालेली कोट्यवधींची कामे फक्त त्यामुळेच आज मोहिते पाटील मजबूत आहेत. बाकी जनतेचे काय? सुमार बुध्दीची लाचार माणसे आणि खुशमस्करे सोडले तर तुम्ही जीवनात उभी केलेली माणसेच किती आहेत? लिट्मस टेस्टची भाषा करणारे धैर्यशील मोहिते पाटील यांचा सहकार क्षेत्रातील प्रत्येक बुरूज ढासळला आहे. आणि हे बुरूज ढासळताना व त्यातील कामगार, शेतकरी, कष्टकरी उध्वस्त होताना कोणत्या तोंडाने तुम्ही म्हणता की, माढा लोकसभेचा किल्ला भक्कम आहे. महाराष्ट्रात भाजपाच्या ४८ मतदारसंघात अंतर्गत गट आहेत. परंतु शिवरत्नच्या मोहिते पाटलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जी निंदा नालस्ती सुरू केली आहे ती भाजपाविरोधी, पक्षविरोधी कारवाई नव्हे काय? यामुळे भाजपश्रेष्ठी प्रचंड नाराज असून भविष्यात या नाराजीचा फार मोठा फटका शिवरत्नला बसल्याशिवाय राहणार नाही असा सूर राजकीय जाणकारांतून निघत आहे.