मोहिते पाटलांची दहशत मोडीत काढण्यासाठीच पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हवेत!
माढा (बंडखोर वृत्तसेवा): खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतंत्र विचारसरणीने काम करीत माढा लोकसभा मतदारसंघात पूर्वापार चालत आलेल्या एकाधिकारशाहीला लगाम घालण्याचे काम केले. कुणाच्याही हातचे बाहुले न बनता त्यांनी आपला परका न बघता सर्वांची कामे करून उपेक्षितांचे संघटन केले. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील बहुतांश नेते व कार्यकर्ते दहशतमुक्त झाले असून मोहिते पाटलांची एकाधिकारशाही व दहशत मोडीत काढण्यासाठीच पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हवेत असा सूर जनतेतून निघत आहे.
आपले सहकारी तेव्हाच सोडून जातात जेव्हा तुम्ही त्यांना किंमत देत नाही. २००९ साली माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यावर माढा विधानसभा मतदारसंघाने नाकारल्यानंतर जेव्हा मोहिते पाटील यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी लढवली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश नेत्यांनी त्यांच्या विरोधात बंड करायला सुरुवात केली. कारण महाराष्ट्रासह जिल्ह्याच्या व केंद्राच्याही नेतृत्वात मोहिते पाटलांच्याच घरातील उमेदवार ही बाब त्यांच्या सहकाऱ्यांना रूचणारी नव्हती. परंतु ते योग्य वेळेची वाट पहात होते आणि ती योग्य वेळ २००९ साली आली. २००९ साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यानंतर बारामतीवरून विरोधकांना बळ देण्यात आले. मात्र २०१४ ते २०१९ पर्यंत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार झाल्यामुळे पुन्हा शिवरत्नला झळाळी आली. परंतु २०१९ साली भाजपाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून खासदार करून मोहिते पाटलांच्या घराणेशाहीला ब्रेक लावला. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील विरोधकांना बळ आले. म्हणूनच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोहिते पाटील प्रखरपणे विरोध करीत आहेत.
वास्तविक पाहता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पूर्वीपासूनच कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत. आणि असे लोकच प्रस्थापितांच्या नजरेत खलनायक असतात. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या विकासकामांच्या जोरावर देशातील टॉप टेनमधील आठवे स्थान मिळवले आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेच सांगतात. आमच्याशी बोलताना तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, माझी खासदारकी ही सर्वसामान्यांच्या विकासासाठीच असेल. मला खासदार करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे त्यांची कामे मी करणारच! मग तो कुठल्या गटाचा आहे आणि कुणाचा विरोधक आहे हे पाहण्याची मला आवश्यकताच नाही. दरम्यान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघातील विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील विरोधकांची घुसमट फुटली आहे. खऱ्या अर्थाने विकासाची गंगा मोहिते पाटील विरोधकांपर्यंत पोहोचली आहे. मोहिते पाटलांनी आपल्या सत्तेच्या बळावर डीसीसी बॅंकेवर काही वर्षे निर्विवाद वर्चस्व गाजविले. मात्र आपल्या सत्तेचा वापर करून त्यांनी डीसीसी बॅंकेत प्रचंड घोटाळा केला. धैर्यशील मोहिते पाटील पहात असलेल्या विजय शुगर साखर कारखान्यावर शंभर कोटींपेक्षा जास्त थकीत कर्ज असल्याने अखेर या कारखान्याचा लिलाव करावा लागला. २०१४ साली मोदी लाटेतही माढ्यातून खासदारकी लढविल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील बहुमताने निवडून आले. यादरम्यान विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेली सहानुभूतीची लाट, त्यांचे निष्कलंक चारित्र्य व त्यांचे संयमी नेतृत्व कामी आले. मात्र त्यांच्या या बाण्याला पुढची पिढी खतपाणी न घालता सूडाचे राजकारण करु लागली आहे. म्हणूनच मोहिते पाटील यांच्या सत्तास्थानाचे बुरूज निकामी होत असल्याचे दिसत आहे. सध्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून लोकसभेसाठी रणशिंग फुंकलेले असले तरी याला केवळ सूडाचाच वास येत आहे. शिवरत्नच्या मोहिते पाटलांनी चमचायुग निर्माण केले तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी माळशिरस तालुक्यात लोकशाहीयुग निर्माण केले. शिवत्नच्या मोहिते पाटलांनी खुषमस्करे, हांजी हांजी करणारे, लाळघोट्या लोकांना केंद्रबिंदू मानले. तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सर्वसामान्य माणूस, दबलेल्या, खचलेल्या, वंचित, शोषित, उपेक्षित जनतेला केंद्रबिंदू मानले. शिवरत्नच्या मोहिते पाटलांनी “कंगाल करून सोडावे सकल जन” ही वृत्ती ठेवूनच विजय नागरी पतसंस्था, सुमित्रा पतसंस्था कारभारातून सर्वसामान्य माणसांना देशोधडीला लावले, दारिद्र्याच्या खाईत लोटले. शिवरत्नवाले खुजी आणि निकृष्ट, टाकाऊ विचारधारा जपतात. तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सत्ताधारी आणि विरोधक भेद न करता गरजवंतांची कामे करतात. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सभांमधून “साधी राहणी” या तत्वांचा, विचारांचा वापर करण्यास सांगितले. तर मोहिते पाटलांनी कोट्यवधी रूपयांचा प्राचीनवाडा (राजवाडा) बांधून भपकेबाज आणि श्रीमंतीचे दर्शन घडविले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मूळातच राजघराण्यातील असले तरी बोलण्यात नम्रता असते. प्रत्येकाला आपलेसे करण्याची वृत्ती आहे. ते भाजपाशी एकनिष्ठ आहेत, तर शिवत्नवाले भाजपकडून तिकीट न मिळाल्यास राष्ट्रवादी किंवा अपक्ष असा पर्याय ठेवतात. परंतु राजकीय जाणकारांच्या मते मोहिते पाटील कुठेही जाणार नाहीत. भाजपातच राहून 2024 ला सुध्दा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी कार्यतत्पर राहतील. दरम्यान शिवामृत दूथसंघाप्रमाणेच शिवरत्नचे राजकारण डबघाईस आणि मोडकळीस आले आहे. एकंदरीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासारखे अजातशत्रू नेतृत्व माढा लोकसभा मतदारसंघाला लाभल्याने मोहिते पाटलांच्या एकाधिकारशाहीला व दहशतीला काही प्रमाणात आळा बसला आहे. म्हणूनच मोहिते पाटलांची एकाधिकारशाही व दहशत संपुष्टात आणण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरच हवेत असा सूर दबलेल्या, पिचलेल्या व मोहिते पाटलांच्या एकाधिकारशाहीला आणि दहशतीला वैतागलेल्या सर्वसामान्य जनतेतून निघत आहे.