बाजारू चर्चेतून लोकसभेचे नेतृत्व सिध्द होत नाही!
भाजपा पक्षश्रेष्ठींकडून माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव पुढं येतंय. त्यामुळे माढ्यातून इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी यु ट्युबच्या माध्यमातून बाजारू चर्चा आयोजित करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करायला सुरूवात केलीय. या चर्चेच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बॅकफूटवर जाऊन आपला चेहरा नावारूपाला येईल असे धैर्यशील मोहिते पाटील यांना वाटत आहे. मात्र बाजारू चर्चेतून लोकसभेचे नेतृत्व पुढे येत नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी काही यु ट्युब चॅनलला माढा लोकसभा मतदारसंघातील काही तालुक्यातील बाजारात पाठवून जनमताची चाचपणी करायला लावले आहे. मात्र ही चाचपणी करीत असताना लोक खासदारांच्या विरोधातच कसे बोलतील याची काळजी घेतली आहे. वास्तविक पाहता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावामध्ये ‘धैर्य’ नावाचा शब्द असला तरी यांच्यासारखे उतावीळ राजकीय नेतृत्व सोलापूर जिल्ह्याने आजपर्यंत पाहिलेले नाही. शिवरत्न व प्रतापगडामध्ये मतभेद होण्याचे कारण त्यांचे राजकीय उतावीळपणच होते. धैर्यशील मोहिते पाटील यांनी यु ट्युबच्या माध्यमातून ज्या पध्दतीने माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे ती पक्षाच्या दृष्टीने खूपच घातक बाब आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींनी यदाकदाचित धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट न देता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट देऊन त्यांचा प्रचार करायला सांगितला तर ते कुठल्या तोंडाने त्यांचा प्रचार करतील? ग्रामीण भागात एक म्हण आहे, ‘काय थोर तर दम थोर!’ त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या नावातील धैर्य या शब्दाला जागून आणि थोड्या संयमी बाण्याने, अभ्यासू मनाने राजकारणाकडे पाहिले पाहिजे. दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांना कारखाना, पतसंस्था टिकवता आले नाही. तर ते फक्त गुंठामंत्री म्हणून यशस्वी झालेले आहेत. राजकारणामध्ये शहकाटशहाचे राजकारण व वैचारिक मतभेद चालतच असतात. परंतु ते तेवढ्यापुरते असतात. काँग्रेसचे अशोक चव्हाण कधी भाजपाचे उपरणे गळ्यात अडकवून भाजपमध्ये जातील असे एखाद्या ज्योतिषाने सांगितले असते तरी कुणाला खरे वाटले नसते. मिलींद देवरा ज्यांच्या वडिलांनी मुंबईतून खासदारकी उपभोगली. पन्नास वर्षे राजकारणात असलेले देवरा कुटुंब शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटामध्ये जाऊन राज्यसभेवर जातात. म्हणजे राजकारणामध्ये तडजोड करावीच लागते. सरळ रेषेत कधीच राजकारण केले जात नाही. आणि राजकारणात जो तडजोड करतो तोच यशस्वी झाल्याचे आपणास दिसून येते. आज विजयसिंह मोहिते पाटलांचा जो संयमी बाणा आहे त्या संयमी बाण्याची खरी गरज आहे. परंतु आता वयोमानापरत्वे या वयस्कर माणसांचे सुध्दा मुले ऐकत असतील असे वाटत नाही. आणि त्यांचे ऐकले असते तर ते असे वागलेच नसते. हे सगळे थोरल्या दादांच्या विरोधात वागतात. सोलापूर जिल्ह्यात विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शब्दाला आजही किंमत आहे. परंतु सध्या पोरखेळ चाललाय. धैर्यशील मोहिते पाटील हे ग्रामपंचायतच्या राजकारणात आडमुठेपणाने वागतात तसे वागत आहेत. तुम्हाला आज बॅनरबाजी करायची वेळ का आली? याचा अर्थ पक्षामध्ये तुमचे वजन राहिलेले नाही, तुम्हाला किंमत नाही, पक्ष तुमचा शब्द प्रमाण मानत नाही. म्हणून तुमचे मन खातंय आणि बॅनरबाजी करून त्यावर भावी खासदार असे लिहीताय. तुम्ही चुकीच्या दिशेने चाललाय. भविष्यात जेव्हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा प्रचार करण्याची तुमच्यावर जबाबदारी येईल तेव्हा तुम्ही कुठली भूमिका घेणार? याचा कधी तुम्ही अभ्यास केलाय का? तुम्हाला जनतेला याची उत्तरे द्यावीच लागतील. धैर्यशील यांच्या नावामध्ये धैर्य असले तरी ते संयमी बाण्याने वागत नाहीत. राजकारणात वावरताना अंगी खूप परिपक्वता पाहिजे. प्रत्येक तालुक्यातील नेतृत्व वळवले पाहिजे. नेत्यांवर व जनतेवर वजन, प्रभाव पाहिजे. मात्र आज कुठल्याही तालुक्यातील नेतृत्व तुमच्या पाठीमागे नाही. मग तुम्ही स्वयंघोषित खासदार का म्हणवून घेताय? स्वतःची पाठ थोपटून घ्यायचे बंद करा. तुमचे जर राजकीय खच्चीकरण झाले, फरफट झाली तर अकलूजकरांना वाईट वाटेल. जनतेने तुमच्यावर प्रेम केलंय, जनतेच्या मनातून उतरू नका. संयमी बाण्याने पावले टाका, संयमी स्वभाव ठेवा. नावामध्ये ‘धैर्य’ आहे धैर्यशील वागा. इतकेच!