शिवरत्नच्या विकासाचा सूर्य सर्वसामान्य माणसांच्या अंगणात उगवलाच नाही!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): कै. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील ते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा राजकारणाचा प्रवास जनकल्याणासाठी होता. मात्र आज शिवरत्न जिथे फायदा तिथेच विकास करताना दिसत आहे. मोहिते पाटील कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणतात, पण सर्व कामे शिवरत्न कंन्स्ट्रक्शनच्या माध्यमातूनच केली जातात. मग अकलूजसह परिसरात लावलेले निधीचे बॅनर पाहून कल्याण कुणाचे झाले? विकासाचा सूर्य शिवरत्नच्याच अंगणात उगवला असून सर्वसामान्य माणसांच्या अंगणात उगवलाच नाही अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.
2009 साली विजयसिंह मोहिते पाटील माढ्यातूनच विधानसभा निवडणूक लढविणार म्हणून शिवरत्नची टीम माढा तालुक्यात जनतेसमोर गेली, तेव्हा जनतेने आपल्या घराची दारे बंद करून बबनराव शिंदे यांच्या बाजूने आपला कौल दिला. त्यामुळे शिवरत्नने तिथून माघार घेऊन पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्याठिकाणी त्यांचा पराभव झाला. यादरम्यान शिंदे बंधूंची जिरविण्यासाठी मोहिते पाटलांनी करकंबमध्ये विजय शुगर साखर कारखाना सुरू केला. परंतु तो कारखाना पुन्हा शिंदे यांनाच विकावा लागला. तर आलेगाव याठिकाणीही सुरू केलेला कारखाना सावंत यांना विकावा लागला. व्यवहाराचे सुत्र असे आहे की “जो विकत घेतो तो मोठा असतो, विकणारा हा अपयशी असतो, व्यावहारिक गणित न जमल्यामुळेच आणि पिछेहाट झाल्यामुळेच असे निर्णय घ्यावे लागतात.” माळशिरस तालुक्यात एमआयडीसी होऊ दिली जात नाही याचे प्रमुख कारण शिवरत्नच्या स्वार्थात दडले आहे, मतलबीपणात दडले आहे. स्वस्त मजुरीतील कामगार फक्त साखर कारखान्यातच आढळून येतात. काही कामगार हंगामी कामावर लागले, आयुष्यभर हंगामी काम करूनच शेवटी निवृत्त झाले. एमआयडीसीत शासनाच्या कामगार ॲक्टप्रमाणे, किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्यावे लागते. उद्या जर एमआयडीसी आली तर आपला कामगार तेथील कामगारांच्या वेतनाशी तुलना करून आपल्याला सोडून जाईल यासाठीच पर्याय निर्माण होऊ दिला जात नाही.
सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटलांनी जलसिंचन उपसा योजनेसाठी 883 कोटीचा निधी मिळविला. यामुळे सांगोला तालुक्यातील वंचित 12 गावातील 39 हजार एकर शेती ओलिताखाली येणार आहे. तेव्हा लावलेल्या बॅनरवरती आदराने सन्मानाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा फोटो टाकला. शिवसेनेचे आमदार भाजपाच्या खासदारांचा आदर सन्मान करतात. राजकारणात नम्रताच माणसाला मोठे करते हेच शिवरत्नला जमत नाही. पाणी पुरवठा योजना आणि इतर कामासाठी 212 कोटी आणि 119 कोटीचा निधी मिळाल्याचे बॅनर अकलूजच्या गल्ली बोळात लावून शिवरत्नला नेमकं काय साध्य करायचं आहे? ठाण्याला 1200 कोटीचा निधी मिळाला तरी खासदार श्रीकांत शिंदेंचा एक फुट सुध्दा बॅनर नाही. मात्र उथळ पाण्याला खळखळाटच फार!
मूळात शिवरत्नचे राजकारण म्हणजे एक सूडाचाच प्रवास आहे. सत्तेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचा सूड उगवला आहे. अनेकांच्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे. कुणी आडवे चालले की त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. म्हणून तर अकलूज, माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेते, कार्यकर्ते विरोधकांच्या गोटात गेले आहेत. वास्तविक पाहता शिवरत्नने नवनिर्माण काय केले? सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटलांनी जे निर्माण केले तेच अद्याप टिकलेले आहे. शंकरनगर व सदाशिवनगरचा साखर कारखाना, शिक्षण प्रसारक मंडळ हे चांगल्या पध्दतीने सुरू असले तरी सहकारमहर्षिंनी
उभारलेली पोल्ट्री, सूतगिरणी कुठं आहे? शिवरत्नला ती टिकवता आली नाही.
माढ्यातून लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे यदाकदाचित धैर्यशील मोहिते पाटील यांनी इतर पक्षातून उभे राहण्याचा विचार केला तर भविष्यात त्यांच्या मानेवर ईडीची टांगती तलवार असणार हे निश्चित आहे. कारण विजय नागरी आणि सुमित्रा पतसंस्थेसह इतर संस्थांमधील कारभाराची चौकशी होणार हे सांगणे न लगे! बंडखोरचे लेखन हे सत्य, परखडपणा आणि दांभिकतेवर लेखणीच्या साह्याने वार करते. आमच्या लिखाणात एकही खोटा शब्द नसतो. म्हणूनच वाचकांच्या नजरेत बंडखोर नेहमीच मोठा असतो. कुणी कितीही केकाटले तरी आमची सडेतोड लेखणी अशीच तळपत राहणार!