धैर्यशील मोहिते पाटलांचा खासदारकीचा हट्ट स्वहितासाठीच!
माढा (बंडखोर वृत्तसेवा): माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांचा २००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर आपल्याशी पंगा घेणाऱ्या माढ्यातील शिंदे बंधूंची जिरविण्यासाठी मोहिते पाटलांनी करकंब येथे विजय शुगर साखर कारखाना सुरू केला. त्याचा सर्व कारभार धैर्यशील मोहिते पाटील पहात होते. तर अकलूजमध्ये सुरू असलेल्या विजय पतसंस्थेचाही कारभार धैर्यशील मोहिते पाटीलच पहात होते. मात्र त्यांना या दोन्ही संस्था सांभाळता आल्या नाहीत. मग आपल्या संस्था सांभाळू न शकणारे धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाल्यावर काय दिवे लावणार? सध्या सर्वसामान्यांच्या विकासासाठी माढा लोकसभा मतदारसंघातून खासदारकी लढवतोय असा धिंडोरा त्यांच्याकडून पिटला जात असला तरी धैर्यशील मोहिते पाटील यांचा खासदारकीचा हट्ट स्वहितासाठीच आहे असे जनतेतून बोलले जात आहे. माढा लोकसभा किंवा तत्पूर्वीच्या पंढरपूर लोकसभा मतदारसंघातील खासदाराने मोहिते पाटलांना विचारल्याशिवाय मतदारसंघात कोणतेच काम केले नव्हते. तसेच आपणास निवडून दिलेल्या मतदार किंवा नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला नव्हता. मात्र २०१९ पर्यंत खासदारावर असलेली मोहिते पाटलांची पकड भाजपने मोडून काढली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे ज्या ज्या नेत्यांनी आपल्याला निवडून दिलंय त्यांच्या संपर्कात राहून त्यांची कामे करू लागले, आपल्या मतदारसंघातील विकासकामे स्वत:च्या मर्जीने करू लागले ही बाब मोहिते पाटलांना खटकू लागली. यातूनच त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला. गतवर्षी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माढा मतदारसंघात फिरून पुन्हा एकदा खासदारकीची तयारी करू लागले. तेव्हा धैर्यशील मोहिते पाटील हे बॅनरबाजी, सोशल मीडिया, आपल्याच ठराविक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया यु ट्युबच्या माध्यमातून जनतेसमोर मांडून आपले पारडे जड असल्याचा भास निर्माण करू लागले. पण हा भास निर्माण करीत असताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात जनमत तयार करू लागले. मात्र खासदारांच्या विरोधात जनमत तयार करीत असताना आपण काय दिवे लावले, याचा त्यांनी कधी विचार केला का? काही वर्षांपूर्वी सुरू केलेले शिवरत्न मोटर्स ते चालवू शकले नाहीत. त्यानंतर विजय पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज प्रकरणे वाटप करून त्यांनी दयावान म्हणून ओळख निर्माण केली असली तरी एकजणाचे सातपट केलेले कर्ज तो भरू न शकल्याने त्याला मारहाण केली होती. या पतसंस्थेमुळे काही व्यापारी अडचणीत आले होते अशी माहिती मिळते. ही पतसंस्था सांभाळता आली नाही. तर २००९ साली माळशिरस विधानसभा मतदारसंघ एससीसाठी राखीव झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तेव्हा बबनराव शिंदे व संजय शिंदे यांनी त्यांना जोरदार विरोध केला होता. म्हणून पंढरपूरमध्ये पराभव झाल्यानंतर शिंदे बंधूंना राजकीय आव्हान देण्यासाठी मोहिते पाटलांनी करकंबमध्ये विजय शुगर साखर कारखाना सुरू केला. पण तो धैर्यशील मोहिते पाटील यांना सांभाळता न आल्याने त्यांनी तो आमदार बबनराव शिंदे यांनाच विकला. धैर्यशील मोहिते पाटील हे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, अकलूजचे सरपंच झाले होते. तेव्हा त्यांनी काय विकास केला होता तो जनतेसमोर मांडायला पाहिजे होता. जयसिंह मोहिते पाटील यांचे सूपुत्र संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्याइतके ते कामच करू शकले नाहीत. कारण संग्रामसिंह मोहिते पाटील अकलूजचे सरपंच असताना त्यांनी आपला व विरोधक न बघता कामे केली होती. तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोधकांची कामे अडवली होती. परंतु खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कुणाची कसलीही कामे न अडवता त्यांनी आपली खासदारकी सर्वांसाठी पणाला लावली. वास्तविक पाहता धैर्यशील मोहिते पाटील यांना जनहिताचे काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त आपल्याला डोईजड झालेल्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मक्तेदारी मोडीत काढायची आहे. आतापर्यंत धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या सत्तेचा वापर केवळ स्वहितासाठीच करून घेतल्याचे दिसून येत आहे. आणि आताही धैर्यशील मोहिते पाटील यांचा खासदारकीचा हट्ट स्वहितासाठीच आहे अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.