समझोता आणि तह करणेच शिवरत्नच्या नशिबी !
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): ना. राधाकृष्ण विखे-पाटील व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा शब्द भाजपात प्रमाण मानला जातो. त्यांच्या शब्दाला फार मोठी किंमत आहे. जोपर्यंत अजितदादा पवार भाजपाच्या मंत्रीमंडळात आहेत तोपर्यंत शिवरत्नला केंद्रात व राज्यात स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी खूपच मोठा संघर्ष करावा लागणार आहे. तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात बड्या नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी केल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी खासदारकीसाठी सर्वस्व पणाला लावले तरी समझोता आणि तह करणे हेच शिवरत्नच्या नशिबी आहे अशा प्रतिक्रिया माढा लोकसभा मतदारसंघातून उमटत आहेत.
जोडलेला माणूस मित्र म्हणून नेहमीच संकटात पुढे येतो, तर राजकारणात निर्माण झालेले शत्रू नेहमीच प्रगतीला अडथळे ठरत असतात. शिवरत्नने राजकारणात अनेक शत्रू निर्माण केले. २०१९ साली निवडून आलेले माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामभाऊ सातपुते यांनी पूर्वापार चालत आलेली शिवरत्नची एकाधिकारशाही संपुष्टात आणली. या दोन्ही लोकप्रतिनिधींनी स्वतंत्रपणे केलेली कामे मोहिते पाटलांना खटकू लागली. यातूनच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व मोहिते पाटील यांच्यामध्ये धुसफूस सुरू झाली. यादरम्यान आमदार रामभाऊ सातपुते यांनी मात्र माळशिरस पूर्व भागात लक्ष न घालून बचावात्मक भूमिका घेतली. पण आमदार रामभाऊ सातपुते यांच्याबद्दल दिसून येत नसली तरी मोहिते पाटलांच्या मनात सुप्त नाराजी असल्याचे काही कार्यकर्त्यांतून समजते. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक नेत्याशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्याचबरोबर भाजपाचे बहुतांशी पक्षश्रेष्ठी त्यांच्या कामांचे कौतुक करुन पाठीवर शाबासकीची थाप टाकत आहेत. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातील उमेदवारीसाठी कितीही ताकद लावली तरी त्यांना उमेदवारी मिळणारच नाही असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. एकीकडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींकडून मिळत असलेला पाठिंबा, माढा लोकसभा मतदारसंघातील बड्या नेत्यांची ताकद, तर दुसरीकडे ज्यांच्यामुळे मोहिते पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडावी लागली त्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भाजपाशी असलेली युती. तरीही बॅनरबाजीच्या माध्यमातून धैर्यशील मोहिते पाटील भाजपावर दबाव निर्माण करीत असल्याचे निष्ठावंत भाजपाच्या कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे. वास्तविक पाहता जेव्हा खुज्या वृत्तीच्या नेत्यांच्या बॅनरच्या सावल्या लांबलचक पडू लागतात तेव्हा ओळखावं की, अरे यांच्या तर राजकारणाचा सूर्यास्त होण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेस पक्षाचे आमदार बाळासाहेब थोरात यांची अहमदनगर जिल्ह्यात भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी पाहून नगरचे खासदार सुजय विखे-पाटील एवढेच म्हणाले, “बॅनर लावणारे पदापर्यत पोहचू शकत नाहीत.” माळशिरस तालुक्यातील इच्छुक नेत्यांनी याचा बोध घ्यावा गावपातळीवरील नेत्यांनी बॅनरबाजी न करता यातूनच काहीतरी शिकण्यासारखे आहे असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.