ॲड. सोमनाथ वाघमोडे यांच्या अथक प्रयत्नाने खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींचे वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रुपांतर
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): ॲड. सोमनाथ वाघमोडे यांनी खंडकरी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शेती महामंडळाची सहा हजार एकर जमीन मिळवून दिली आहे. खंडकरी शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक तपाहून अधिक काळ लढा दिला. मात्र यादरम्यान शेतकऱ्यांना मिळालेल्या जमिनींची नोंद वर्ग २ मध्ये होती. त्यास वर्ग १ मध्ये आणण्यासाठी ॲड. सोमनाथ वाघमोडे यांनी खूप संघर्ष केल्यानंतर त्यांच्या लढ्याला यश आल्याने खंडकरी शेतकऱ्यांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.माळशिरस तालुक्यातील खंडकरी शेतकऱ्यांना सहा हजार एकर जमीन मिळाली आहे. तर महाराष्ट्रातील खंडकरी शेतकऱ्यांना २७ हजार एकर जमीन मिळाली आहे. याची लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ॲड. सोमनाथ वाघमोडे यांच्या या कामाचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला होता. मात्र खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींची नोंद वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये करण्यासाठी त्यांनी सतत मंत्रालयात पाठपुरावा केला होता. त्यामुळे शासनाने महाराष्ट्र शेत जमीन अधिनियम, १९६१ (सुधारणा) अधिनियम, २०२३ अन्वये उक्त अधिनियमामध्ये कलम २८ १ (अअ) मधील पोट कलम (३) खाली नवीन पोटकलम (३-१अ) अन्वये माजी खंडकरी शेतकरी अथवा त्यांचे कायदेशीर वारसांना वाटप करण्यात आलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग २ वरुन भोगवटादार वर्ग १ करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे. शासनाने काढलेल्या या परिपत्रकात म्हटले आहे की, ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी औद्योगिक उपक्रमांना त्यांच्या खंडाने दिलेल्या जमिनी वर्ग १ भोगवट्याच्या होत्या अशा व्यक्तीस किंवा तिच्या कायदेशीर वारसांना वर्ग २ भोगवट्यावर दिलेल्या जमिनी महाराष्ट्र शेत जमीन अधिनियम, २०२३ महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रथम प्रसिध्द केलेल्या दिनांकापासुन त्यासाठी कोणतेही अधिमूल्य न आकारता, वर्ग १ भोगवट्यावर देण्यात आले असल्याचे मानण्यात येतील. त्यानुसार संबधित तहसिलदार यांनी त्यांच्या स्तरावरुन गावनिहाय आढावा घेऊन या शासन परिपत्रकाच्या दिनांकापासुन एक महिन्याच्या कालावधीत गावनिहाय एकच आदेश करुन गावदप्तरी अंमल घ्यावा. ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी औद्योगिक उपक्रमांना त्यांच्या पट्टयाने (खंडाने) दिलेल्या जमिनी वर्ग २ भोगवट्याच्या होत्या अशा व्यक्तीस किंवा तिच्या कायदेशीर वारसांना वर्ग २ भोगवट्यावर दिलेल्या जमिनी धारणाधिकार भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतर करता येईल. तथापि, त्यासाठी जर अशा जमिनींना लागू असलेल्या संबंधित कायद्यात किंवा त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांमध्ये संबंधित अधिनियम व नियमांच्या तरतुदींनुसार अशा रूपांतरणाबाबत जी कायदेशीर तरतूद असेल त्यानुसार कार्यवाही करणे व त्या कायद्यात निश्चित केलेल्या सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेऊन कार्यवाही करणे आवश्यक राहील. ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांनी वाटप केलेली जमीन परवानगी घेऊन विहीत अधिमुल्य रक्कम भरुन हस्तांतरित केली असेल अशा प्रकरणी प्रस्तुत जमीन भोगवटादार वर्ग २ वरुन भोगवटादार वर्ग १ रुपांतरित करण्याबाबत ज्या खंडकरी शेतकऱ्यांची जमीन खंडाने देतेवेळी भोगवटादार वर्ग १ होती त्याबाबत संबधित तहसिलदार उपरोक्त नमुद (१) प्रमाणे कार्यवाही करतील व ज्या खंडकरी शेतकऱ्यांची जमीन खंडाने देतेवेळी भोगवटादार वर्ग २ होती त्याबाबत उपरोक्त नमुद (२) प्रमाणे कार्यवाही करावी. ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांनी वाटप केलेली जमीन विनापरवानगी हस्तांतरित केली असेल किंवा विहीत अधिमुल्य रक्कम भरलेली नसेल अशा प्रकरणी झालेला शर्तभंग नियमानुकुल करताना उक्त अधिनियमातील कलम २९ मध्ये नमुद केलेली अधिमुल्य रक्कम भरल्यानंतर व जिल्हाधिकारी यांच्या पुर्वमान्यतेने भोगवटादार वर्ग २ वरुन भोगवटादार वर्ग १ रुपांतरित करण्याची कार्यवाही करण्यात यावी. उक्त अधिनियमातील कलम २८-१ (अअ) मधील पोटकलम ३अ मध्ये महाराष्ट्र महसूल संहिता, १९६६ च्या कलम २ च्या खंड (१०) मध्ये परिभाषित केलेल्या गावठाण किंवा गावाच्या जागेच्या हद्दीपासुन ५ किलोमीटर अंतरातील शेती महामंडळाची जमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे. सदर तरतुदीन्वये ग्रामपंचायतीकडुन केवळ गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन किंवा पाणीपुरवठा योजना या सार्वजनिक प्रयोजनार्थच जमीन मागणी अनुज्ञेय राहील असे परिपत्रक महसूल व वन विभागाचे उपसचिव अजित देशमुख यांनी काढले आहे. खंडकरी शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी श्री भानुदास सालगुडे पाटील व दहिगांवचे बी. डी. पाटील यांनी ॲड. सोमनाथ वाघमोडे यांना मोलाची साथ दिली.




