मोडेन पण वाकणार नाही..!
गुरूवार दिनांक ०८/०२/२०२४ रोजी रात्री मी माझ्या कामानिमित्त पुण्याकडे जात असताना रात्री १०:१३ वाजता मोबाईल नंबर ७०२०६४४४७५ या क्रमांकावरून ऍड. नितीन खराडे यांनी मला फोन करून यापुढे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात बातमी लावली तर सुट्टी देणार नाही अशी धमकी दिलीय. मात्र अशा कितीही धमक्या आल्या, किंवा समोर अडचणींचा डोंगर उभा केला तरी या हिटलरी प्रवृत्तीसमोर कधीही झुकणार नाही. आंबेडकरी चळवळीतला भीमसैनिक आहे मी, मोडेन पण वाकणार नाही!
अन्याय अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीचा पर्दाफाश करून जनहितार्थ लेखणी चालविणे आणि वस्तुस्थितीदर्शक सडेतोड राजकीय, सामाजिक विश्लेषण करणे हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे काम आहे. आर्टिकल १९ नुसार असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार कुणीही आपले मत मांडू शकतो, लिहू शकतो. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही राजकीय विश्लेषण करीत असताना हे विश्लेषण मोहिते पाटील व त्यांच्या समर्थकांची झोप उडवत आहे. म्हणूनच ऍड. नितीन खराडे यांनी मला फोन करून धमकी दिलीय. २०१५ साली जनसेवा संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार मी नितीन खराडे यांच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वास साळोखे यांनी अकलूजमधील सर्व बेकायदेशीर अतिक्रमण काढले होते. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत अकलूज गेस्ट हाऊसच्या लगत त्यांनी छोटा हत्ती (पिकअप) गाडीत हॉटेल सुरू केले होते. त्यामुळे स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी स्थापन केलेल्या व डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य सुरू असलेल्या जनसेवा संघटनेने निवेदन दिले होते. तेव्हा सर्व वस्तुस्थिती पाहून मी बंडखोरमध्ये बातमी लावली होती. त्यामुळे ऍड. नितीन खराडे यांनी माझ्याविरोधात माळशिरस न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला होता. ती केस अद्यापही सुरू आहे. काही वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना भेटून सदरचे प्रकरण मिटवावे म्हणून आंबेडकरी चळवळीतील नेते नंदकुमार केंगार यांनी विनंती केली होती. तेव्हा विजयदादांनी सांगूनही ऍड. नितीन खराडे यांनी याप्रकरणी आढेवेढे घेतले होते.
वास्तविक पाहता मी माझ्या पत्रकारितेची सुरूवातच गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे एकमेव पाक्षिक बंडखोर असे स्लोगन देऊन केली आहे. आज माझ्या पत्रकारितेची १४ व्या वर्षाकडे वाटचाल सुरू आहे. माळशिरस तालुक्यातील विरोधकांचे कटू अनुभव आल्यामुळे व धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोधक तुमचा केवळ वापर करतात, अकलूजकर म्हणून आपण सोबत राहून चांगले काम करू म्हटल्यामुळे मी मोहिते पाटलांशी जुळवून घेतले होते. नाहीतर मी पूर्वीपासूनच सडेतोड बातमीदारी व विश्लेषण करणारा आंबेडकरवादी पत्रकार आहे. जो आंबेडकरी चळवळीचे बाळकडू पितो तो कुणालाच घाबरत नाही. मग असल्या धमक्यांना कोण घाबरणार? एखादी व्यक्ती खोटं बोल पण रेटून बोल याप्रमाणे मोहिते पाटलांच्या बाजूने भूमिका मांडत असेल तर सत्य बाजू समोर आणणे हे खऱ्या हाडाच्या पत्रकाराचे कामच आहे. मग सत्य समोर आल्यावर इतकी मिर्ची झोंबण्याचे कारणच काय? बंडखोरला लाईक करणाऱ्यांनाही काही बांडगुळं याचा जाब विचारतात हे विशेष आहे. बंडखोरच्या माध्यमातून मी रोखठोक विश्लेषणाची मालिका अखंडपणे सुरू ठेवल्यानंतर ऍड. नितीन खराडे यांनी “लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे काम कसे करताय? तुझं खासदारावर खूपच प्रेम उतू चाललंय, साहेब तुझ्या बाजूने असले तरी कोर्टात सुरू असलेली केस लढवून मी जेलमध्ये नाही पाठवले तर नाव सांगणार नाही. आणि यापुढे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात बातमी लावली तर काही खरं नाही” असा दम दिला. यावरूनच अकलूज परिसरात लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची कशी गळचेपी सुरू आहे हे दिसून येतंय. यापूर्वी मी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात बातमी लावली. पण त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही मनात कसलीही कटुता न ठेवता माझ्याशी मैत्रीचे संबंध ठेवले. तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधातही मी खूप बातम्या लावल्या. मात्र त्यांनीही कधी याबाबत फोन केला नाही. परंतु मी जेव्हा रोखठोक विश्लेषण मांडायला सुरुवात केली तेव्हा मला धमकी आली. मात्र असल्या धमक्यांना भीक घालणारा मी नाही. संघर्ष हेच आमचे जीवन आहे. मी कट्टर भीमसैनिक आहे. कुणापुढे झुकणार नाही, मोडेन पण वाकणार नाही हे हिटलरी प्रवृत्तींनी लक्षात ठेवावे. तूर्त इतकेच!