स्वतःच्या टिऱ्या कुठवर बडवून घेणार?
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबद्दल सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही प्रचंड आदर आहे. कारण सत्तेत असताना विजयदादांनी कामांच्या बाबतीत आपला व परका असा भेदभाव केला नाही. मात्र त्यांचेच काही दिवटे हिमालयाची उंची असणाऱ्या विजयदादांना खाली खेचण्याचे काम करीत आहेत. कृष्णा-भीमा स्थिरीकरण व पंढरपूर-लोणंद रेल्वेची मागणी विजयदादांनी केलीय. मात्र त्यापैकी पंढरपूर-लोणंद रेल्वेचा प्रश्न खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीच सोडवलाय म्हटल्यावर याचे खरे श्रेय त्यांना जाणारच! काम न करता श्रेय घेतले तर समजू शकतो. मात्र सोडविलेल्याच प्रश्नाचे श्रेय घेतल्यानंतर केवळ त्यांचा कमीपणा दाखविण्याच्या उद्देशाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीका करताना विजयदादांच्या मागणीचा दाखला दिला जात आहे. परंतु जे खासदारकीसाठी प्रबळ दावेदार आहेत त्यांनी कुठले प्रश्न मार्गी लावले? कोणती विकासकामे केली? हे मांडले नाही. तर ऐनकेन प्रकारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निव्वळ टीका करायची म्हणून अतिशहाणे दिवटे स्वतःच्या टिऱ्या बडवून घेत आहेत असा प्रश्न अकलूजकरांसह माढा लोकसभा मतदारसंघातील सूज्ञ जनतेतून विचारला जात आहे.राजकारणात कुणी कधीही सक्रीय झाले तरी त्याचे मोजमाप त्यांच्या कर्तृत्वातून केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना वादग्रस्त होते. अनेक देशांनी त्यांना व्हिसा नाकारला होता. मात्र पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळताच जगाला दिपवून टाकणारे ते काम करीत आहेत. तर आपली पूर्ण हयात गेली तरीही केवळ संसद अथवा मंत्रालयात हजेरी लावणारेच अनेक नेते आहेत. भाजपाने अचानक पुढे आणलेल्या नेत्यांनीच जनतेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केल्याचे पहायला मिळत आहे. त्यापैकीच माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरसचे आमदार रामभाऊ सातपुते हे आहेत. पक्षश्रेष्ठी कुठल्याही नेत्याची मोजपट्टी अंदाजे मोजत नसतात. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे टॉप टेनमधील खासदार आहेत असे वक्तव्य तुम्ही चुकीचे कसे ठरवता? यावरून पक्षश्रेष्ठींपेक्षा टीकाकारांचाच जादा अभ्यास आहे असे म्हणावे लागेल. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्य पाहून भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांना पुन्हा एकदा संधी देऊन मंत्री करण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून समजले आहे. त्यामुळे केवळ विरोधाला विरोध करून आपल्याला खासदारकी मिळविण्यासाठी कितीही अट्टाहास केला तरी तो पूर्णपणे वाया जाणार आहे असे बोलले जात आहे.