आयत्या पीठावर रेघोट्या!
लोकशाहीत सरंजामशाही चालत नाही. सामान्यातील सामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान सुध्दा बनू शकतो आणि भारत देशाला शक्तीशाली बनवू शकतो हे एकेकाळी रेल्वे स्टेशनवर चहा विकणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दाखवून दिले आहे. तर मोहिते पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपने ऊसतोड मजूराचा मुलगा रामभाऊ सातपुते यांना माळशिरसचे आमदार केल्यानंतर त्यांनी माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी ‘न भूतो न भविष्यति’ असे योगदान दिले आहे ते सर्वजण पहातच आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे राजघराण्यातील असले तरी त्यांची कामाची धमक पाहूनच त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार केले. यादरम्यान त्यांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामांचा आधार घेतला नाही, तर गटतट न पाहता एक खासदार जनतेसाठी काय करु शकतो? हे त्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांना दाखवून दिले. मात्र सध्या खासदारकीसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विकासकामांचा दाखला देत आयत्या पीठावर रेघोट्या ओढण्याचे काम करीत असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
भाजपाने देशातील अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांची मक्तेदारी मोडीत काढून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देशभरात काम करण्याची संधी दिली आहे. भाजपात कुठलेही शक्तिप्रदर्शन चालत नाही, पक्षावर दबाव चालत नाही. जुन्या कार्यकर्त्यांना व कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींना भाजप संधी देत असतो. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेच जर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देशातील टॉप टेनमधील खासदार असे म्हणत असतील, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळत असतील, तर कुणी कितीही ओरडले तरी फरक पडणार नाही. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकासकामांबद्दल बोलताना काहीजण हे विजयदादांच्या कामांचे श्रेय घेतात असे म्हणत आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी ऍड. सोमनाथ वाघमोडे यांनी पंढरपूर-लोणंद रेल्वे स्टेशन व शेती महामंडळ आदी कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पत्रे कुणी दिली त्यापेक्षा सत्तेत राहून जे पाठपुरावा करतात त्यांचेच खरे श्रेय असते असे त्यावेळी बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सोलापूर जिल्ह्यासाठी राजकीय योगदान खूप मोठे आहे यात वादच नाही. पण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संसदेत आपल्या पत्रान्वये पाठपुरावा केल्याने ते ज्या कामांवर दावा करतात त्या कामांचे श्रेय खासदारांनाच जाते हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाही. वास्तविक पाहता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे ज्यांनी ज्यांनी निवडून दिले आहे त्यांची कामे करतात, त्यामध्ये मोहिते पाटील विरोधक आहेत. आणि विकासकामे करताना आपल्याला कसलेही विश्वासात घेत नाहीत हेच मोहिते पाटलांना खटकतंय. दरम्यान खासदार हे स्वतंत्र विचारसरणीचे आहेत म्हणूनच त्यांना धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून तीव्र विरोध केला जात आहे. पण धैर्यशील मोहिते पाटील हे गाव पातळीवरील नेतृत्व आहे आणि ते बॅनरयुध्दातून सिध्द करीत आहेत. तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे कर्तृत्व आहे. त्यांनी कामांच्या माध्यमातून आपले स्वतंत्र वलय निर्माण केले आहे. माढा मतदार संघात शेकडो गावे असताना अकलूजसारख्या एकाच गावात भावी खासदार
म्हणून बोर्ड उभे करायला लावणे म्हणजे स्वत:
कुपमंडूकवृत्ती जपणे नव्हे का? धैर्यशील मोहिते पाटील यांना जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे असे म्हटले तर माढा मतदार संघात भावी खासदार म्हणून जनतेने किती ठिकाणी बॅनर उभे केले? दरम्यान विजयदादांच्या कामांचे भांडवल करून धैर्यशील मोहिते पाटील हे आयत्या पीठावर रेघोट्या ओढत आहेत. मात्र भाजपा हा कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे, घराणेशाही जोपासणारा नव्हे! हे भाजपावर दबाव निर्माण करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.