लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील अस्तित्व टिकवतील का?
२००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यापासून मोहिते पाटलांचे राजकीय वलय कमी झालंय. २०१४ साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. परंतु माढ्याचे संजय शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला. तेव्हा राष्ट्रवादीने विजयसिंह मोहिते पाटील यांना माढ्यातून खासदार केले. मात्र त्यांच्यावर पक्षांतर्गत कुरघोड्यांचा भडीमार झाला. तेव्हा पक्षांतर्गत कुरघोड्यांना वैतागून मोहिते पाटील यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा मुद्दा पुढे करून भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी तरी रणजितसिंह मोहिते पाटील यांचा खासदारकीसाठी नंबर लागेल असे त्यांना वाटत होते. मात्र फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करून भाजपने त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मोहिते पाटलांवर सोपवली. त्यामुळे राज्यसभेवर अठरा महिने खासदार असणारे रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या आदेशाने माघार घेतात याचे नेमके कारण काय? तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघातूनही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे उमेदवार न देता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू रामभाऊ सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाईलाजास्तव मोहिते पाटलांनी या दोघांनाही निवडून आणले. मात्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार रामभाऊ सातपुते या दोघांनीही मोहिते पाटलांचे अस्तित्वच संपवायला सुरुवात केलीय. खासदार हे राजघराण्यातील असल्यामुळे ते कुणालाही जुमानत नाहीत. खासदार झाल्यानंतर आठच दिवसात त्यांनी बारामतीचे पाणी बंद करून निरा उजव्या कॅनॉलला आपल्या हक्काचे पाणी सोडले होते. तेव्हा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेतून त्यांची खूपच वाहवा झाली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संबंध ठेवून विकासकामांवर भर देत ज्यांनी निवडून दिले त्या सर्व नेत्यांची व कार्यकर्त्यांची ते कामे करू लागले. यात मोहिते पाटील विरोधकांचाही सहभाग असल्याने याबाबत मोहिते पाटलांकडून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विकासाच्या बाबतीत देशातील दहाव्या नंबरचे खासदार म्हणून त्यांचे वेळोवेळी कौतुक केले. तर माळशिरस तालुक्यात भाजपाश्रेष्ठींच्या दौऱ्यादरम्यान ‘आमचं ठरलंय, खासदार फक्त धैर्यशील मोहिते पाटीलच’ असे फ्लेक्स बोर्ड लावल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात राहून पक्षविरोधी कृत्य केलेले खपवून घेणार नाही असे वक्तव्य केले होते. मग हा दम नेमका कुणाला होता? त्याचबरोबर आमदार रामभाऊ सातपुते हे माळशिरस गेस्ट हाऊसवर जनता दरबार घेतात. मोहिते पाटलांना न विचारता ते जनतेच्या विकासासाठी काम करतात. त्यांचे विविध प्रश्न सोडवतात. पूर्वीच्या आमदाराप्रमाणे शिवरत्न बंगल्यावर जाऊन जी जी करत नाहीत. स्वाभिमानी बाण्याने काम करून आमदार रामभाऊ सातपुते यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे ना खासदार आपला ना आमदार आपला हे त्यांनाही कळून चुकले आहे. मोहिते पाटलांनी माढ्यातून एक खासदार व माळशिरसमधून एक आमदार दिल्याने भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेवर घेतले, मात्र मंत्रीपद दिले नाही ही सल त्यांना नेहमी सतावतेय. म्हणूनच आता त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून माढा लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. मात्र धैर्यशील यांना आमदारकीचा सुध्दा अनुभव नसताना खासदारकीला त्यांना का उतरविले जात आहे? असा प्रश्न मतदारांतून उपस्थित होत आहे. तसेच भाजपामध्ये दबावतंत्र चालत नाही. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यापेक्षा भाजपातील वरिष्ठ नेत्यांची पसंती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच आहे हे वारंवार दिसून आले आहे. माळशिरस तालुका सोडल्यास माढा लोकसभा मतदार संघातील किती आमदार शिवरत्नच्या पाठीमागे आहेत? माळशिरसचे आमदार रामभाऊ सातपुते यांचाही काही भरवसा नाही. कारण पक्षश्रेष्ठींच्या आदेशाविरुद्ध ते एकही पाऊल उचलणार नाहीत. मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करायला जाताना खा. उदयनराजे भोसले यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बरोबर घेतले होते.
यावरून त्यांचे वलय आणि प्राबल्य दिसून येते. म्हणूनच ते पूर्ण तयारीनिशी माढा मतदारसंघाच्या मैदानात उतरले आहेत. मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून माढा लोकसभेसाठी रणशिंग फुंकून अस्तित्वाच्या लढाईसाठी धडपडत असलेले मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवतील का? हे येणाऱ्या काळात लवकरच स्पष्ट होईल.
गौतम आप्पा भंडारे
संपादक, सा. बंडखोर