मला खासदार करणाऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही- खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): माढा, लोकसभा मतदारसंघातून मी निवडणुकीला उभे राहिल्यानंतर मला मोहिते पाटलांनी व त्यांचे विरोधक उत्तमराव जानकर, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, के. के. पाटील यांच्यासह जुन्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि काही अज्ञात शक्तींनी निवडून आणले. मग खासदार झाल्यानंतर मी या सर्वांची कामे करणारच ना! हे सर्वजण माझे कालही मित्र होते, आजही मित्र आहेत व उद्याही मित्रच राहतील असे म्हणून मला खासदार करणाऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही असे प्रतिपादन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
अकलूज येथील गेस्ट हाऊसवर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने त्यांनी उत्तरे दिली. यावेळी माढा लोकसभा उमेदवारीबाबत पत्रकारांनी छेडले असता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, राजकारणात सक्रीय असणार्या प्रत्येक व्यक्तीला वाटते की, मला उमेदवारी मिळावी. मग मला असे वाटू नये काय? मी काही साधू संत नाही, मलाही उमेदवारी मिळावी असे वाटणारच! पण पक्षश्रेष्ठींकडून मला उमेदवारी मिळो अथवा न मिळो, कमळ सोडून मी जाणार नाही. पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम मी प्रामाणिकपणे करणार. आम्ही मोहिते पाटलांच्या विरोधात काम करतोय अशा काहीजण वावड्या उठवत आहेत. परंतु आम्ही कुठल्या प्रथा, परंपरा मोडत नाही व कुणाला विसरत नाही. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना फलटणच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. वेळोवेळी आम्ही भेटत असतो. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यामुळे काहीजण आम्ही मोहिते पाटील विरोधक आहे अशा वावड्या उठवतायत ते पूर्णपणे चुकीच्या आहेत. मोहिते पाटील व आमच्यात कसलाही वाद नसून भाजपा आजही एकसंघ आहे. मी मोहिते पाटलांवर कधीही टीका केली नाही. नेहमी सद्भावनाच व्यक्त केलीय. मी खासदार असल्यामुळे मला जनतेशी संपर्क साधावा लागतो. मग तो आपला आहे की विरोधक आहे हे मी पहात नाही. आणि समर्थक की विरोधक हे न पाहता लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाचे काम करणे हा माझा स्वभाव आहे असे ते म्हणाले.
कृष्णा भीमा स्थिरीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात पाणी वळवायला काही लवादांचा विरोध आहे. त्यामुळे ती योजना सध्या तरी स्थगित आहे. मात्र सध्या जी योजना सुरू आहे ती कृष्णा-भीमा स्थिरीकरणापेक्षा वेगळी आहे. आता जो बोगदा सुरू आहे तो निरेच्या पाण्यासाठी आहे. निरा नदीचे पाणी मराठवाड्याला देण्यासाठी तो बोगदा सुरू आहे. त्याच बोगद्यातून निरा देवधरचे जे चार टीएमसी पाणी शिल्लक आहे ते दुष्काळात किमान माढा व करमाळ्याला पिण्यासाठी देता यावे. पूराचे पाणी हे कुणाच्या मागणीचे नसते हे सरकारचे म्हणणे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृष्णा फ्लड डायव्हर्शनसाठी खूप आग्रही आहेत, त्यांनी यास तत्वतः मान्यता दिलेली आहे. पूराचे पाणी मराठवाड्याला देता यावे हे जे विजयदादांचे स्वप्न होते ते किमान पूराचे पाणी मराठवाड्याला देण्यासाठी आता काम सुरू आहे. कृष्णा फेर नियोजनामध्ये जवळपास आठ टीएमसी पाणी माढा मतदारसंघाला मिळाले आहे. त्यातले अडीच टीएमसी पाणी माण खटावला अर्धा टीएमसी पाणी उत्तर कोरेगांवला आणि पाच टीएमसी पाणी सांगोल्याला मिळाले आहे. सांगोला उपसा सिंचन योजना आहे ती उजनीच्या पाण्याची दोन टीएमसीची योजना ती आता मंजुरीला आहे. निरा देवधर योजनेत माळशिरसबरोबरच आता सांगोला व पंढरपूरचा समावेश केलेला आहे. निरा देवधरची ३९७६ कोटीची योजना आता कार्यान्वित झालीय. त्याचे कामही सुरू झाले आहे. साडेतीन किमी कॅनॉलचा पट्टा दहा दिवसांत खणून झालाय. तसेच फलटणमध्ये धोम बलकवडीची योजना होती ती एक टीएमसी पाणी उचलून तिला बारमाही करायचे ठरवले आहे. दहिगांव उपसा सिंचन योजनेसाठी सव्वाशे कोटी मंजूर करून घेतले त्याचेही काम सुरू आहे. माण तालुक्यातील झे कटापूर योजना होती ती मार्गी लागली असून पहिल्या टप्प्याचे पाणी आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १९ तारखेला पाणीपूजन करण्याचे निमंत्रण दिले आहे. या सर्व योजनांमुळे काही लाख एकर ओलिताखाली येणार आहे. यादरम्यान मी दिलेली जवळजवळ सर्व आश्वासने पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. विकासाच्या बाबतीत माढा लोकसभा मतदारसंघ देशात आठवा आहे. आतापर्यंत माढा मतदारसंघासाठी एक लाख कोटींच्या आसपास विकासनिधी दिला असे म्हणून माढा मतदारसंघातील विकासकामांची त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. तसेच यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, शक्तीप्रदर्शन करून भाजपामध्ये काही उपयोग होत नाही. ऐनवेळी भाजपा पक्षश्रेष्ठी कुणाला उमेदवारी द्यायची ते ठरवत असतात. पक्षश्रेष्ठींनी तयारीला लागायला सांगितल्याने लढायच्या तयारीने मी सर्वांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. तरीही जो पक्ष निर्णय घेईल तो मला मनापासून मान्य असेल असे यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले. याप्रसंगी फत्तेसिंह माने पाटील, सुजयसिंह माने पाटील व लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे उपस्थित होते.