मोहिते पाटील विरोधी टोळक्याला एकत्र करून निंबाळकरांचा खासदारकीचा बालहट्ट पूर्ण होणार नाही!
स्व. गणपतराव देशमुख व मोहिते पाटील यांचे पक्ष वेगळे असले तरी विकासाच्या मुद्द्यावर अखेरपर्यंत त्यांनी एकमेकांना साथ दिली. तीच परंपरा त्यांची भावी पिढी सुध्दा जपताना दिसत आहे. मोहिते पाटलांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही, सर्वांना सोबत घेऊनच राजकारण केले. परंतु माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या चार लाखाच्या आसपास असताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे धनगर समाजाचे कार्यकर्ते नगण्य असल्याचे दिसून येत आहे. खासदारांनी कोअर कमिटीत, जिल्हा नियोजन समितीत आपल्याच जवळच्या लोकांची नेमणूक केली. परंतु त्यांना यावेळी धनगर समाज दिसला नाही का? हे खासदार धनगर समाजातील कार्यकर्त्यांना महत्वाच्या मिटींगलाही बोलवत नाहीत अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. मात्र मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार म्हणून त्यांच्याबद्दल कुणीही बोलत नसले तरी धनगर समाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना धनगर समाजाची एलर्जी आहे का? असा प्रश्न माढा लोकसभा मतदारसंघातील धनगर समाजातून विचारला जात आहे.
माढा (बंडखोर वृत्तसेवा): पक्षादेश शिरोधार्थ मानून मोहिते पाटलांनी अडगळीत पडलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार केले. तेव्हापासून दारू तीच पण बाटली नवीन याप्रमाणे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी मोहिते पाटलांच्या विकासकामांची नावे बदलून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र टगेगिरीच्या जोरावर या खासदारांनी मोहिते पाटील विरोधी टोळक्याला एकत्र करून मोहिते पाटलांच्या विरोधात कितीही रान उठविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा खासदारकीचा बालहट्ट पूर्ण होणार नाही अशी चर्चा माढा लोकसभा मतदारसंघातील जाणकारांतून होताना दिसत आहे.“उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग” अशी एक म्हण आहे. याच म्हणीचा प्रत्यय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा खासदारकीचा अतिउत्साह पाहून येतोय. राजकारणात संयम, तोंडात साखर व डोक्यावर बर्फ असावा लागतो. मोहिते पाटलांनी अनेक मोठी संकटे पचवली आहेत, कारण ते संयमी आहेत. मग असे कितीही गद्दार निघाले तरी ते धोरणात्मक पध्दतीने राजकारण करीत असतात, सूडभावनेने नाही. विकासाच्या बळावर गावागावातील माणसे जोडत मोहिते पाटलांनी आपली वोट बँक अबाधित ठेवली आहे. स्टंटबाजी करून त्यांनी कधीही राजकारण केले नाही. तर सत्तेच्या माध्यमातून जनतेची कामे करून त्यांनी माणसे जोडली आहेत. म्हणून तर धैर्यशील मोहिते पाटील जातील त्याठिकाणी त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान चमकोगिरी व स्टंटबाजी करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर फुगवटा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असले तरी तो तात्पुरता दिखाऊ फुगवटा आहे. माझ्याकडे चार आमदार आहेत असे ते बढाया मारतात, पण त्यांची ताकद काय आहे हे मागील निकालावरून जनतेला समजलेच आहे. तसेच उत्तमराव जानकर वगळता कसलाही जनाधार नसलेल्या मोहिते पाटील विरोधकांना सोबत फिरवून ते खासदारकीची पुन्हा एकदा दिवास्वप्ने पाहत असतील तर ती त्यांची स्वप्नेच ठरणार आहेत यात तीळमात्र शंका नाही. खास सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा खासदारकीचे तिकीट मिळणार नाही यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. परंतु मोहिते पाटलांना वारंवार विरोध करून निदान आपल्या पदरात विधानपरिषद तरी पडावी हा त्यांचा हेतू आहे. दरम्यान मोहिते पाटलांनी लायकी नसणाऱ्या सध्याच्या दिग्गज नेत्यांना खूप मोठे केले. पण पदे भोगून अतिमहत्वाकांक्षेपोटी ते बेईमान झाले. आता अशाच बहुतांश बेईमान लोकांनी खासदारकीसाठी बालहट्ट धरलेल्या विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बळ देण्याची केविलवाणी धडपड सुरू केली आहे. गेली अनेक वर्षे मोहिते पाटलांवर टीका करून आम्ही मोठे आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करणारे आज मात्र स्वतःच्या अस्तित्वासाठी झटत आहेत. लवकरच त्या लाईनीत खासदार रणजितसिंह नाईक यांचाही नंबर लागेल अशी जनतेत कुजबुज सुरू आहे. मोहिते पाटील घराण्याने जिल्ह्याच्या राजकारणात अनेक चढउतार पाहिले आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मोहिते पाटलांवर टीका ही दुय्यम आहे. कारण मोहिते पाटील टीकेकडे नाही, तर कामाकडे लक्ष देतात. जिल्ह्याच्या राजकारणासाठी उजनी धरण व निरा देवधर धरण ही संकल्पना विजयसिंह मोहिते पाटील यांचीच होती. मोहिते पाटील कुटुंब नेहमी राजकारणामध्ये विकासाच्या मुद्द्यावर ठाम असतात. त्यांनी गेली अनेक वर्षे विकासकामांसाठी नेहमी चांगल्या माणसांना साथ दिली आहे. सूडभावनेने कधीही राजकारण केले नाही. परंतु खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्यावरच सूड उगवतात हे फलटणमधील दिगंबर आगवणे प्रकरणावरूनही दिसून आले आहे. दरम्यान जागतिक बँकेने कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी ३३२६ कोटींचा पहिला टप्पा मंजूर केल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांसह मोहिते पाटील विरोधकांचा जळफळाट झालेला दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी थयथयाट सुरू केला असला तरी मोहिते पाटलांच्या कामांचे श्रेय घेऊन व मोहिते पाटील विरोधी टोळक्याला एकत्र करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदारकीचा बालहट्ट पूर्ण होणार नाही हे त्रिकालाबाधित सत्यच आहे अशा प्रतिक्रिया माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय जाणकारांतून उमटत आहेत.