दुसऱ्याच्या मुलाला काजू, बदाम चारून आपला मुलगा पैलवान होत नसतो- डॉ. धवलसिंह मोहिते पाटील
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): कुस्तीच्या आखाड्यात उतरायचे असेल तर आपल्याच मुलाला काजू, बदाम चारले पाहिजेत. दुसऱ्याच्या मुलाला काजू, बदाम चारून आपला मुलगा पैलवान होत नसतो असे प्रतिपादन काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले.
डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारदिनाचे औचित्य साधून अकलूजसह परिसरातील पत्रकारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. तेव्हा सोलापूर जिल्ह्यात चाललेल्या सध्याच्या राजकारणावरून पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले की, राजकारणात आपल्या भूमिकेवर ठाम राहून निर्णय घेतले पाहिजेत. आपण बांधलेल्या घरात दुसऱ्यांना राहण्याची परवानगी दिल्यावर त्यांना तेथून बाहेर काढताना त्रास होतच असतो. त्यामुळे अगोदरच आपण इतरांना आपल्या घरात घुसू द्यायचे नसते. मोहिते पाटलांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्षांविरोधात प्रतापगड व शिवरत्नने एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे म्हटल्यानंतर ते म्हणाले की, स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी नेहमीच शिवरत्नच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. पण शिवरत्नने आपल्याच माणसांना वाऱ्यावर सोडून इतरांना हात पाय पसरायला संधी उपलब्ध करून दिली. वेळ कसलीही असली तरी शिवरत्नने परिणामांची पर्वा न करता कार्यकर्त्यांच्या जोरावर ठामपणे लढायला पाहिजे होते. पण त्यांनी भाजपात प्रवेश करून आपल्याच माणसांविरोधात भूमिका घेत राजकारण सुरू केल्याने आता त्यांचे पक्षांतर्गत विरोधक त्यांना डोईजड होऊ लागले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे गोडवे गाऊन त्यांच्या माढ्यातील उमेदवारीला हिरवा सिग्नल दाखविला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता ज्यांच्या भरोश्यावर तुम्ही पक्षप्रवेश केला तेच आता भावी खासदार म्हणून टाकलेल्या पोस्ट चालणार नाहीत असे म्हणून नाराजी व्यक्त करीत असल्याचे दिसून येत आहे. प्रादेक्षिक पक्षात तुम्ही म्हणाल ते चालत होते, मात्र राष्ट्रीय पक्षात तळागाळातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच काम केले जाते. तिथे संयम ठेवून पदासाठी वाट पहावी लागते, कुठल्याही पदासाठी हट्ट धरलेले चालत नाही असे म्हणून आपल्या अस्तित्वासाठी आक्रमक भूमिका घेतली तरच शिवरत्नची गळचेपी थांबेल असे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकीबद्दल आपण इच्छुक आहात का? असे त्यांना विचारताच त्यांनी याबाबत इच्छुक नसल्याचे सांगितले. यावेळी सर्व पत्रकारांना स्नेहभोजन दिल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार यांनी त्यांचे आभार मानले.