भीमा कोरेगाव लढा, आत्मचिंतन करा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १ जानेवारी १९२७ साली भीमा कोरेगांव शौर्यस्तंभाला भेट देऊन आपल्या लढाऊ पूर्वजांना मानवंदना दिली, तेव्हापासून दरवर्षी पूर्वाश्रमीचे महार व आताचे बौध्द यांच्यासह दलित, बहुजन समाजातील लोक त्याठिकाणी अभिवादनासाठी जाऊ लागले. सुरूवातीला अत्यंत कमी संख्येने जाणाऱ्या लोकांची संख्या आता २५ लाखाच्या पुढे गेलेली आहे. पण त्याठिकाणी जाणाऱ्या लोकांनी केवळ गर्दीत सामील होऊन जत्रेचे स्वरूप न आणता आपल्या पूर्वजांना मानवंदना देऊन भीमा कोरेगांव लढ्याचे आत्मचिंतन केले पाहिजे.
स्वातंत्रपूर्व काळात मनगटशाहीच्या जोरावर तलवारीने लढाया होत असत. मात्र विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून आता या लढाईचे स्वरूप बदलून शाईची लढाई सुरू केली आहे. परंतु लढाईचे स्वरूप बदलले असले तरी आजही दलित, शोषित, पिडीत, वंचितांना आपल्या न्याय हक्कासाठी धनदांडग्यांसोबत, जातदांडग्यांसोबत, प्रस्थापितांसोबत लढावेच लागत आहे. दरम्यान अनेकजण आता पहिल्यासारखा जातीयवाद राहिला नाही, त्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे असे म्हणत असले तरी आमचे मित्र एनडीएमजेचे राज्य सचिव वैभव गीते महाराष्ट्रभर जातीय अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढत आहेत. महाराष्ट्रात होत असलेल्या दलितांवरील अन्याय अत्याचाराची त्यांना उपलब्ध झालेली आकडेवारी अंगावर शहारे आणणारी आहे. आजही प्रचंड जातीयवाद आहे, पण त्याचे स्वरूप बदलले आहे. प्रस्थापितांकडून राजकारण व अर्थकारणापासून आंबेडकरी समाजाला कोसो दूर ठेवले जात आहे. त्याचबरोबर एखादा आक्रमक चेहरा पुढे येऊ लागला तर आपल्या सत्तेच्या जोरावर त्याला दाबण्याचे काम केले जाते, किंवा वेगवेगळी आमिषे दाखवून त्याला आपल्याकडे खेचले जाते हे बहुतांशी ठिकाणी पहायला मिळाले आहे. वास्तविक पाहता आंबेकरवाद्यांची ताकद खूप मोठी आहे, परंतु ती विखुरलेली आहे. मात्र ही ताकद दीक्षाभूमी, चैत्यभूमी, भीमा कोरेगांव रणस्तंभ याठिकाणी प्रंचड स्वरूपात दिसून येते. पण याठिकाणी नतमस्तक व्हायला आलेले बांधव समाजाच्या प्रगतीबद्दल कधी आत्मचिंतन करणार? की सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनून एकमेकांची जिरवाजिरवीच करणार? जेव्हा लोकशाही अस्तित्वात नव्हती तेव्हा तलवारीच्या जोरावर सिदनाक महार आपल्या गळ्यातील मडके आणि कमरेला बांधलेली बोराटी काढण्यासाठी प्राणपणाने जुलमी पेशव्यांशी लढला. मात्र आता तलवारीचा जमाना नव्हे, तर पेनाच्या जोरावर आपल्याला लढायचे आहे. पण ही लढाई लढायला कितीजण शिकले आहेत? अनेक लोक त्यात प्रामुख्याने बौध्द बांधव मोठ्या प्रमाणात भारतीय संविधानाची प्रत खरेदी करतात, परंतु त्यातले कितीजणांना समजते? या संविधानावर देश चालतो म्हटल्यावर ती प्रत सर्वांकडे असायला पाहिजेच! पण कितीजण संविधान साक्षर झालेत? दीक्षाभूमी, चैत्यभूमी, भीमा कोरेगांव रणस्तंभ यासह विविध ठिकाणी कोट्यवधींची पुस्तक विक्री होते. अनेक बांधव पुस्तके वाचत असल्याने त्यांनी इतिहास कोळून पिलाय असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. परंतु इतिहासाबरोबरच आपल्या हक्काचा, मूलभूत अधिकाराचा व ठराविक कायद्याचा अभ्यास झालाच पाहिजे. आपला पूर्वेतिहास हा पराक्रमाचा आहे. म्हणूनच बौध्द समाज आक्रमक व प्रखर स्वाभिमानी आहे. आपला स्वाभिमान कुणी दुखावला तर तो अजिबात सहन करीत नाही. जशास तसे उत्तर देण्यासाठी तो नेहमीच तत्पर असतो. कारण आक्रमकपणा त्याच्या डीएनएमध्येच आहे. परंतु आता ठोकशाहीने नव्हे, तर लोकशाहीने लढणाराच जिंकत आहे. त्यासाठी समाजकारण, राजकारण, अर्थकारण याचा यथोचित अभ्यास असणे अत्यावश्यक आहे. आजकाल राजकारणासाठी प्रत्येक जातीने आपापले महापुरूष वाटून घेतले आहेत. परंतु कुठल्याच महापुरूषाने एका जातीसाठी काम केलेले नाही. त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराजांपासून अण्णाभाऊ साठेपर्यंतच्या सर्व महापुरुषांचे साहित्य, खंड वाचून त्यांना समजून घेतले पाहिजे. महात्मा फुले दांडपट्टा चालवत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर दररोज व्यायाम करीत असत. महापुरूषांनी समाजकार्य करीत असताना आपले शरीर मजबूत ठेवण्यावरही भर दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपण त्यांचा आदर्श का घेऊ नये? आपणही आपल्या श्रध्दास्थानांपासून आदर्श घेऊन समाजपरिवर्तनाच्या लढाईसाठी पुस्तकांतून ज्ञान घेण्याबरोबरच बलदंड शरीरयष्टी कमावली पाहिजे. सध्या मनुवाद्यांना चांगलेच बळ आल्याने त्यांची वळवळ वाढली आहे. भीमा कोरेगांवच्या लढ्याला २०० वर्षे झाल्यावर मनुवाद्यांनी दंगल घडवून आणली. त्यामुळे गरज पडलीच तर ठोशास ठोसाही द्यावा लागेल. हा प्रकार भविष्यात कुठेही आणि केव्हाही घडू शकतो. त्यामुळे १ जानेवारीला भीमा कोरेगांव रणस्तंभाला मानवंदना देताना आपला पूर्वेतिहास आठवून त्यापासून प्रेरणा घेत समस्त आंबेडकरवाद्यांनी आत्मचिंतन करावे आणि पुढील सर्व प्रकारच्या लढ्यासाठी सज्ज व्हावे हीच अपेक्षा!