सारथी संस्थेतून मराठा समाजाच्या उन्नतीसाठीच्या योजनांचा विस्तार व्हावा!- आ. रणजितसिंह मोहिते-पाटील
नागपूर (बंडखोर वृत्तसेवा):
आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत आज हिवाळी अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या सत्रात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, वसतिगृहे, सारथीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजना याबाबत प्रश्न उपस्थित केला. याचबरोबर सारथीचे सुसज्ज केंद्र राज्यात मध्यवर्ती ठिकाणी सुरू करण्यात यावे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना तात्काळ हेल्पलाईन अथवा प्रशिक्षणे आदि सुविधा उपलब्ध होतील अशी मागणी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राज्य सरकारकडे केली.
तसेच आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सारथीच्या सन २०२२-२३ या वर्षात राज्य शासनाने मंजूर केलेल्या ३०० कोटी निधीपैकी केवळ ४४ कोटी रुपये खर्च झाल्याचे प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता अजित पवार यांनी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात संस्थेने उपलब्ध निधीपैकी रुपये १३०.८३ कोटी खर्च केले आहेत, तसेच सन २०२३-२४ मध्ये ऑक्टोबर, २०२३ अखेर रुपये ११८.५२ कोटी इतका खर्ची झाल्याचे सांगितले.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेबरोबर शहरात निवासाची सुविधा उपलब्ध व्हावी यादृष्टीने पंजाबराव देशमुख निवास योजनेंतर्गत शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरु करण्याचा निर्णय घेतला असूनही बहुतांश जिल्ह्यात वसतिगृहे अद्यापही सुरु झालेली नाहीत. तसेच भाडेतत्वावर वसतिगृहे सुरू करण्यास विलंब होत आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी याकरीता शासनाने लवकरात लवकर वसतीगृह सुरू करावे म्हणून आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत मागणी केली.
आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, शासन निर्णय दिनांक ९ नोव्हेंबर, २०२३ अन्वये “छत्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हास्तरीय वसतिगृहे संकुल योजना अंतर्गत खाजगी नोंदणीकृत संस्थांचे वसतिगृह चालविण्यास तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेशी संलग्नित करुन सदर योजना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून अंमलात आणण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार खाजगी वसतिगृहे सुरु करणेसाठी इच्छुक नोंदणीकृत संस्थेची निवड करणेची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील समितीकडून करण्यात येत आहे.
मराठा समाजातील पीएचडी करत असलेल्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या २०० वरुन अधिक वाढवण्यात यावी अशी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मागणी केली असता यांविषयी फेरआढावा घेण्यात येईल व बैठक लावून निर्णय घेतला जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी सभागृहात झालेल्या चर्चेत आ. सतेज पाटील, आ. विक्रम काळे, आ. अभिजित वंजारी, आ. भाई जगताप आदि सदस्य सहभागी झाले होते.