१२ सप्टेंबरपासून जयस्तंभ ते मुंबईपर्यंत निघणार जयस्तंभ सन्मान पायी मोर्चा
पुणे (बंडखोर वृत्तसेवा): कोरेगांव भीमा येथील जयस्तंभ अभिवादनाच्या दरम्यान २०१८ साली हजारो भीमसैनिकांवर झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत यासह जयस्तंभावरील विविध समस्यांबाबत कोरेगांव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी १२ सप्टेंबरपासून जयस्तंभ ते मुंबईपर्यंत पायी जयस्तंभ सन्मान मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात महाराष्ट्रातील हजारो भीमसैनिकांनी बहुसंख्येने सामील व्हावे असे आवाहन यावेळी सर्जेराव वाघमारे यांनी केले आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात सर्जेराव वाघमारे यांनी म्हटले आहे की, मागील ११ वर्षांपूर्वी जयस्तंभावर वीज कोसळली होती. त्यामुळे जयस्तंभावरील वरील भाग खाली कोसळला होता. तो भाग त्यावेळी दुरूस्त केला होता. पण त्याच भागातून दरवर्षी पावसाळ्यात जयस्तंभामध्ये पाणी जाऊन जयस्तंभाच्या सर्व बाजूंनी पावसाचे पाणी बाहेर पडू लागले आहे. त्यामुळे जयस्तंभ फुगलेल्या अवस्थेत दिसतो. ही परिस्थिती अशीच राहिली तर कुठल्याही क्षणी दुर्घटना घडू शकते. म्हणून जयस्तंभाची दुरूस्ती त्वरित करण्यात यावी. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल व ३ जानेवारी २०१८ रोजीचे भारत बंदवेळी आपल्या अंदाजे ३० हजार कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे समिती स्थापन केली होती. मात्र अजूनही गुन्हे मागे घेतले गेले नाहीत. त्यामुळे आपल्या मुलांना शिक्षणात व नोकरीत अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. तरी ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. १ जानेवारी २०१९ रोजी अजितदादा पवार यांनी प्रथमच जयस्तंभ याठिकाणी मानवंदना दिली व जयस्तंभ विकासकामासाठी १०० कोटी रुपयांची घोषणा केली होती. ती रक्कम अजूनही जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात आली नाही, ती रक्कम त्वरित वर्ग करण्यात यावी. तसेच जयस्तंभ शेजारील खाजगी जमीन अधिग्रहण करण्यात यावी. १ जानेवारी २०१८ पासून शौर्यदिन नियोजनासाठी बार्टीच्या माध्यमातून अंदाजे १० कोटी रुपये खर्च करण्यात येतो. तो निधी बार्टीच्या माध्यमातून खर्च न करता १ जानेवारी शौर्यदिनासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी. जयस्तंभ व छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळे पुणे दर्शनमध्ये समाविष्ट करण्यात यावीत व शासनाच्या वतीने जयस्तंभ या ठिकाणी इतिहास फलक लावण्यात यावा. जयस्तंभावर १९७१ चे युध्दातील सैनिकांची काळी पाटी लावण्यात आली आहे ती त्वरित काढून दुसऱ्या ठिकाणी मान सन्मानाने लावण्यात यावी. जयस्तंभ याठिकाणी देशभरातून भीमसैनिक येत असतात. त्यांच्यासाठी पुणे स्टेशन ते जयस्तंभ अशा स्वतंत्र बसेस सोडण्यात याव्यात. तसेच येणाऱ्या लोकांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून पार्किंगसाठी शासकीय जागेवर आरक्षण टाकण्यात यावे. जयस्तंभ हा देशभरातील लढवय्या महार वीरांची अस्मिता असल्याने यासाठी काढलेल्या मोर्चास महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा मोर्चा सरकारची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी बोलताना सर्जेराव वाघमारे म्हणाले.