जातचोर जानकरांचे समर्थन करणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांना आंबेडकर जयंतीचे अध्यक्ष होण्याचा अधिकार आहे का?
महाराष्ट्रात आंबेडकर जयंती मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष हे बौध्द समाजातीलच पुढारी असतात. मात्र अकलूजमध्ये तसं नाहीये. याठिकाणी तहहयात आंबेडकर जयंती मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष हे खासदार धैर्यशील मोहिते पाटीलच राहिले आहेत. सामाजिक सलोख्याचा चांगला उपक्रम म्हणून लोक याकडे पहात असले तरी तनाने नव्हे तर मनाने अध्यक्ष होणे गरजेचे आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात २९ ठिकाणी एससी समाजाला २५ वर्षे राजकीय आरक्षण दिलं. या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील एससी समाजाला विधीमंडळात एससी समाजाचे प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळाली. मात्र मोहिते पाटलांनी या संधीवर गंडांतर आणले. कारण खासदार धैर्यशील मोहिते पाटील एकीकडे आंबेडकर जयंती मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष म्हणून काम करतायत आणि दुसरीकडे एससी समाजात घुसखोरी केलेल्या उत्तम जानकरांशी हातमिळवणी करतायत. यादरम्यान आपल्यासाठी कुणालाही शिंगावर घेण्याची तयारी असलेल्या बौध्द-मातंग समाजातील कार्यकर्त्यांची त्यांना आठवण का आली नाही? बौध्द असो की मातंग, यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का? लढायला बौध्द-मातंग आणि चरायला दुसरेच! वाह रे वाह!! बाटलीला लेबल एकाचे आणि बाटलीतला माल दुसराच असंच धैर्यशील मोहिते पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल म्हणता येईल. माळशिरस विधानसभा मतदारसंघ २५ वर्षांसाठी एससी समाजासाठी राखीव झाला, पण १५ वर्षे एससी समाजातील चर्मकार समाजालाच आमदारकीची संधी मिळाली. मोहिते पाटलांनी सलग दहा वर्षे स्व. हनुमंतराव डोळस यांना आमदारकीची संधी दिली, आणि तिसऱ्या टर्मला चर्मकार समाजातीलच विवेक गुजर यांचा त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र भाजपा पक्षश्रेष्ठींनी वरुनच रामभाऊ सातपुते यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी रामभाऊ सातपुते यांना आमदार म्हणून निवडून आणले. रामभाऊ सातपुते हे चर्मकार समाजातीलच असले तरी जातीच्या पलीकडचं त्यांचं काम आहे. पण २५ पैकी १५ वर्षे चर्मकार या एकाच समाजाला आमदारकीची संधी मिळाली, आणि चौथ्या टर्मला जातचोर उत्तम जानकरांना संधी मिळाल्याची खंत बौध्द व मातंग समाजाला आहे. २५ पैकी २० वर्षे गेली. आता पुढची विधानसभा राखीव राहतेय की बदल होतोय असा प्रश्न बौध्द व मातंगांना पडला आहे. नेहमीच आंबेडकरी जनसमुदायात वावरणाऱ्या व दरवर्षी आंबेडकर जयंती मध्यवर्ती समितीचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांनाही कधी बौध्द किंवा मातंग या दोन्ही जातींपैकी आमदार व्हावा असे का वाटले नाही? माळशिरस विधानसभा मतदारसंघात बहुसंख्येने बौध्द व मातंग समाजाची लोकसंख्या आहे. तरीही मोहिते पाटलांनी या दोन्ही समाजाला नेहमी डावलण्याचेच काम केले. मोहिते पाटलांना जातीवंतांपेक्षा जातचोर अधिक महत्त्वाचा वाटला. कारण धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार व्हायचं होतं. मग आरक्षणाचे खरे लाभार्थी असलेल्या बौध्द व मातंग या दोन्ही जाती उध्वस्त का होईनात? आपल्या स्वार्थासाठी एससी समाजाचे हक्क व अधिकार हिसकावून घेणाऱ्या जातचोर उत्तम जानकरांशी हातमिळवणी करून धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांना आमदार करीत बौध्द व मातंग समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम केले आहे. अशा बौध्द व मातंग समाजावर बेगडी प्रेम असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना आंबेडकर जयंती मध्यवर्ती समितीचे अध्यक्षपद भूषविण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्न आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने उपस्थित होतो.