संधीसाधूंनो आरएसएसची दलाली खुशाल करा, पण वैचारिक व्यभिचार नको!
पुणे (बंडखोर वृत्तसेवा): प्रतिस्पर्ध्यांना हरवता येत नसेल तर त्यांच्याबद्दल जनमानसात वैचारिक गोंधळ निर्माण करून त्यांची दिशाभूल करणे ही गोबेल्स निती आहे. त्याप्रमाणेच सत्तेसाठी हपापलेले दलित चळवळीतील काही संधीसाधू झंडू नेते (?) वैचारिक व्यभिचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांबद्दलच संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतून त्यांच्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरएसएसची दलाली खुशाल करा, पण संधीसाधूंनो, वैचारिक व्यभिचार करून इतिहासाची मोडतोड करु नका, तसेच क्रांतीकारी आंबेडकरी विचारांचीही मोडतोड करू नका अशा तीव्र प्रतिक्रिया भीमसैनिकांतून उमटत आहेत.
2 जानेवारी 1940 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड (जि. सातारा) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस भेट दिल्यानिमित्त कोल्हापूर विभाग कार्यवाह विजय जोशी यांनी कराडमध्ये बंधुता परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेस मार्गदर्शक म्हणून माजी खासदार अमर साबळे, बौध्द युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विजय लक्ष्मण गव्हाळे, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे व देहूरोड धम्मभूमी ट्रस्टचे विश्वस्त ॲड. क्षितिज टेक्सास गायकवाड या संधीसाधूंना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत विजय जोशी यांनी कराड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस भेट दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तेथे उपस्थित संघ स्वयंसेवकांसमोर भाषण करताना “काही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणाने पहातो” असे म्हटल्याचा दावा केला आहे. या भेटीबाबतची बातमी पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या केसरी वृत्तपत्रात 9 जानेवारी 1940 रोजी प्रसिद्ध झाली होती असे ते म्हणत असले तरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करुन काही वरील दलालांच्या माध्यमातून खोटा इतिहास निर्माण करायचा ही मनुवाद्यांची जुनीच रणनीती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे काही गल्ली बोळातील कार्यकर्ते नव्हते. त्यांच्याकडे अख्ख्या देशाचे बारीक लक्ष होते. आजपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक चरित्र खंड लिहिले गेले. त्यामध्ये या घटनेचा उल्लेख का आला नाही? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मनुवादी, ब्राम्हणी वर्चस्व विचारांना मानणारा संघ आहे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मनुस्मृती दहन करणारे महापुरुष आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक हा चातुर्वर्ण्य, जातीव्यवस्था व स्त्रीदास्य या व्यवस्थेला मानणारा आहे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विषमतेला मोडीत काढून समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय यावर आधारलेला समाज निर्माण करणारे महापुरुष आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंदू राष्ट्र निर्माण करायचे होते, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सर्वांना समान अधिकार देणारे लोकशाहीवादी राष्ट्र निर्माण करायचे होते. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “जर देशात हिंदू राज्य आलं, तर ते या देशासाठी सर्वात मोठी आपत्ती ठरेल यात शंका नाही. हिंदूंनी काहीही म्हटले तरी हिंदू धर्म हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाला धोका आहे. हिंदू राज्य लोकशाहीशी सुसंगत नाही. हिंदू राज्य कोणत्याही परिस्थितीत रोखलं पाहिजे.” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी ही एससी, एसटी, ओबीसी, भटके विमुक्त यांना मनुस्मृतीप्रमाणे गुलाम करून ब्राम्हणी वर्चस्व यावर आधारलेली व्यवस्था निर्माण करणे हे आहे. असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन संघचालक डॉ. गोळवळकर गुरूजींनी त्यांच्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात व्यक्त केले आहेत. यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अद्याप फारकत घेतलेली नाही. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि प्रसारमाध्यमे यांचेवर ब्राम्हणी लोकांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. वेगवेगळ्या माध्यमातून ते मनुस्मृती प्रणित व्यवस्थेचा पुरस्कार करीत असतात. ९ जानेवारी १९४० रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वय किती? त्यावेळी त्याचा प्रभाव फार कमी होता. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची दखल घेतलेली दिसून येत नाही. वास्तविक पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कराड येथील बंधुता परिषद आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक गोंधळ निर्माण करण्यासाठीच आयोजित केली होती. या परिषदेत मार्गदर्शन करताना प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणतात, दलित आणि ब्राम्हणच जातीयवादाचे खरे बळी आहेत. आजवर पुरोगाम्यांच्या बोलण्यातच बंधुत्व दिसायचं. कृतीतून कधी दिसलंच नाही असे म्हणत त्यांनी भाजपाचे तुणतुणे वाजवून शरद पवारांना टार्गेट केले. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. हेडगेवार हे दोघेही विश्व बंधुत्वाच्या भावनेतून काम करत होते असा नवीन शोध लावून मच्छिंद्र सकटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हेडगेवारच्या रांगेत बसविण्याचा धूर्त प्रयत्न केला. या देशातील एससी, एसटी, ओबीसी, भटके विमुक्त व स्त्रिया या शोषित वर्गाची दिशाभूल करून आरएसएसच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी केला आहे. अशा लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एससी, एसटी, ओबीसीमधील चमचे, दलाल, भडवे म्हटलेले आहे. यावर बोलताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते प्रा. प्रशांत प्रक्षाळे म्हणाले, प्रा. मच्छिंद्र सकटे हे संघ शाखेचे स्लीपर सेल आहेत. आंबेडकरवाद चुकीच्या पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ब्राम्हणी इतिहासकारांनी या देशाचा इतिहास त्यांच्या व्यवस्थेला पूरक होईल अशा पध्दतीने लिहिला आहे. आजही तसेच काम हे लोक करीत आहेत. संघ शाखेतून चाललेला हा खोडसाळपणा आंबेडकरवाद्यांना नेमकेपणाने समजतोय. अशा भ्रामक कल्पनांवर आंबेडकरी समाज विश्वास ठेवणार नाही. दरम्यान प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी आपल्या सोयीच्या राजकारणासाठी मनाला वाट्टेल ते करावे, पण वैचारिक व्यभिचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांबद्दल संभ्रम निर्माण करुन इतिहासाची मोडतोड केलेली आंबेडकरी अनुयायी खपवून घेणार नाहीत. दलित चळवळीची झूल पांघरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चाटुगिरी करीत वैचारिक व्यभिचार करणाऱ्या तुम्हा चौघांना आंबेडकरी चळवळ कदापि माफ करणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन आणि भाषणे खंड 15 च्या पान क्रमांक 560 वर सरदार हुकम सिंग यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अकाली दलासारख्या संघटनांचा उल्लेख करत त्यापैकी काही अतिशय धोकादायक संघटना असल्याचं मत व्यक्त करतात. तर 1952 मध्ये शेड्युल कास्ट फेडरेशनच्या जाहिरनाम्यात शेड्युल कास्ट फेडरेशन आरएसएस आणि हिंदू महासभेसारख्या प्रतिक्रियावादी संघटनांशी कधीही युती करणार नाही असे म्हणतात. यावरूनच त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधातील भूमिका स्पष्ट होतेय. चर्चेसाठी काही वेळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिली असं मानलं तरी आंबेडकरांची आणि संघाची विचारसरणी एकमेकांच्या विरुद्ध आहे. थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये डॉ. आंबेडकरांनी म्हटलं आहे की, कुठल्याही परिस्थितीत हिंदू राष्ट्र होऊ नये. हिंदू राष्ट्राची स्वातंत्र्य आणि समतेच्या विरोधातील आहे. ते लोकशाहीशी कुठल्याही प्रकारे सुसंगत नाही. तरीही मनुवादी दलित चळवळीतील दलालांना हाताशी धरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आरएसएसबद्दल आपलेपणाची कशी भूमिका होती हे एससी, एसटी, ओबीसी आणि स्त्रियांमध्ये बिंबविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अशा कितीही दलालांनी वैचारिक व्यभिचार केला तरी आंबेडकरी चळवळीतील अनुयायी त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. मात्र इतिहासाची मोडतोड करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वैचारिक संभ्रम निर्माण करणाऱ्यांना कधीही माफ करणार नाही हे मात्र निश्चित…!