दलबदलू उत्तम जानकरांसमोर डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचे तगडे आव्हान राहणार!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मोहिते पाटलांशी हातमिळवणी करताना उत्तम जानकरांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी शरद पवारांकडून शब्द घेतला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. यादरम्यान आमदारकीसाठी मोहिते पाटलांच्या मागेपुढे फिरणाऱ्या उत्तम जानकरांवर माळशिरस तालुक्यातील पारंपरिक मोहिते पाटील विरोधक कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळे धनगर समाजासह मराठा, ओबीसी व एससी समाजातील लोकांप्रमाणेच मोहिते पाटील समर्थकांशीही माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचे चांगले संबंध असल्याने दलबदलू उत्तम जानकरांसमोर डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचे तगडे आव्हान राहणार अशी चर्चा राजकीय जाणकारांमध्ये होताना दिसत आहे.
मोहिते पाटील विरोधकाची झूल पांघरून आजपर्यंत दलबदलू उत्तम जानकरांनी संधीसाधूपणाचेच राजकारण केले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या ॲड. सुभाष (अण्णा) पाटील यांनी कधीही राजकीय तडजोड केली नाही. म्हणूनच ते आजही मोहिते पाटील विरोधकांचे आयडॉल आहेत. परंतु दलबदलू आणि संधीसाधू उत्तम जानकरांनी मोहिते पाटलांवर जहरी टीका करीत आपले नेतृत्व बळकट केले, तर ॲड. सुभाष (अण्णा) पाटील यांना अडगळीत टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र वरुन मोहिते पाटील विरोधकाचा बुरखा पांघरला असला तरी वेळोवेळी जनतेला उत्तम जानकरांचे खरे रुप दिसायला लागले आहे. वास्तविक पाहता जेव्हा उत्तम जानकरांनी सुमित्रा पतसंस्थेवर काढण्यात येणारा मोर्चा रद्द केला तेव्हापासूनच त्यांच्याबद्दल जनमत कलुषित झालेले आहे. उत्तम जानकर हे आपल्या शब्दांवर ठाम नाहीत हे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केलेल्या काही वक्तव्यांवरुन अनेकांना दिसून आले. मोहिते पाटलांवर टीका करीत उत्तम जानकरांनी माढेकर व पंढरपूरकरांची मदत घेऊन मोहिते पाटील विरोधक शेतकऱ्यांसाठी कारखाना सुरू केला. परंतु तो काही वर्षांतच विकून त्यांनी माढेकर व पंढरपूरकर यांच्यासह आपल्या सहकाऱ्यांचाही विश्वासघात केला. मात्र वेळापूरात गरुड हवेली बांधली. पण त्यांचा खरा मुखवटा बघून अनेकजण उत्तम जानकरांना सोडून गेले. २०१९ साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकरांना एक लाखापेक्षा जास्त मतं मिळाली. परंतु आमदार रामभाऊ सातपुते हे बाहेरचे उमेदवार व भीमा कोरेगाव दंगलीत सहभागी झालेले आरएसएसचे उमेदवार असा त्यांच्या विरोधात एससी समाजातील काही दिवट्यांनी प्रचार केल्यानेच त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली. त्यामुळे उत्तम जानकरांच्या डोक्यात हवा गेली आणि या मतांच्या जोरावर त्यांनी मांडवलीचे राजकारण करायला सुरुवात केली. मोहिते पाटलांनाही वाटले की, उत्तम जानकरांशी आपण युती केली तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर काढलेल्या आकडेवारीवरुन त्यांचा भ्रमनिरास झाला. दरम्यान मोहिते पाटलांनाही आमदार म्हणून उत्तम जानकर नकोच आहेत. कारण ज्यांनी ज्यांनी आपल्याला मोठे केले त्यांनाच जानकरांनी दगा दिल्याने आमदार झाल्यानंतर ते आपणांस डोईजड होतील हे मोहिते पाटलांनाही ठाऊक आहे. तसेच स्वतःच्या स्वार्थासाठी शिवरत्नच्या वळचणीला गेलेल्या संधीसाधू उत्तम जानकरांवर पारंपरिक मोहिते पाटील विरोधक धनगर समाजासह सर्वधर्मीय स्वाभिमानी जनता चांगलीच भडकली आहे. त्यामुळे याला शह देण्यासाठी डॉ. आप्पासाहेब देशमुख यांची उमेदवारी एक मैलाचा दगड ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.
डॉ. आप्पासाहेब देशमुख हे माळशिरस तालुक्यातील एक प्रभावी नेतृत्व आहे. जिथे काम करण्याची संधी मिळते तिथे ते जीव ओतून काम करीत असतात. माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष झाल्यापासून त्यांनी विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. मितभाषी आणि हसतमुख असलेल्या डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या पाठीशी धनगर समाजासह मराठा, ओबीसी व एससी समाजातील बहुतांशी लोक आहेत. त्यांनी भाजपाचे काम अत्यंत सक्रीयपणे केले. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान माळशिरस येथे आयोजित केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जबाबदारी त्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडली होती. नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख हे भाजपाचे अत्यंत निष्ठावंत असून माणसं जपणारं नेतृत्व आहे. तर उत्तम जानकर हे ज्यांनी मोठं केलं त्यांनाच फाट्यावर मारणारे आहेत. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी झाली असून पारंपरिक मोहिते पाटील विरोधकांतून जानकरांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा परिस्थितीत भाजपाकडून डॉ. आप्पासाहेब देशमुख यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यास उत्तम जानकरांसमोर कडवे आव्हान उभे राहून माळशिरसमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलेल असा सूर राजकीय जाणकारांतून निघत आहे.